"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर......"
समोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे रहात असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.
"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इन्ट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन् आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्ट्समन"
" ओह्, वेलकम!" मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.
" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इन्ट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज...."
" येस् शुअर, सर"
" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप,यु वुईल एन्जॉय हिज कंपनी. सो, गुड लक"
पुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपिन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अर्थात् त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही!
मी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.
" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा."
" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल"
मला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पहाणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बर्यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या सार्याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते.
मी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: " इथे घरी कोण कोण असतं?" या माझ्या प्रश्नावर त्याने, " मी आणि आमची फॅमिली एवढेंच" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि " आमची फॅमिली" म्हणतांना त्याच्या चेहर्यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला.
मी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून रहात असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिर्हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची.
एकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणार्या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली.
पण दुसर्याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबर्याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.
त्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना कांही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबर्याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसर्या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पहात होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प रहाणार्यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच.
" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं"
" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.
" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉम्प्लीमेन्ट देऊ"
" घरी? घरी कशाला? हो...हो...घरी....घरी.... या ना....जरूर या....फॅमिलीला......." शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.
ऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेशत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणार्याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो? खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ्यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.
पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.
" घ्या सर. पाणी घ्या." शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
" शृंगारपुरे... वहिनी..?" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.
" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय."
" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत."
" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून....."
" अच्छा, अच्छा! कांही विशेष?"
" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"
" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?
" ओह् ! आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला."
" म्हणजे?"
" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस् हर."
"............."
" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"
" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.."
" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन् दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा."
असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.
दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटाव्यातला बायकोचा फोटो दाखवला तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.
चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने..." शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.
बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय ?" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,
" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन् कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर........."
पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.
सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. म्हणून टेबलकडे गेलो. टेबलवर चिरोट्याचा डबा होता आणि डब्याखाली त्याचा चार ओळीचा राजिनामा.
Thursday, May 28, 2009
Sunday, May 17, 2009
वरीस पाडवा
दुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्या खाली उतरू लागला.
एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.
टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,
" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"
" व्हय की. वाढ."
उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,
" बा, तू गावात कंदी जानार?"
" कां रं? "
" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"
" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.
" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."
" काय बोलायचंय! हे कवा आननार अन् ते कवा आननार हेच की."
" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"
" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."
" म्हंजी?"
" घरात न्हाई दाना आन् म्हनं हवालदार म्हना."
" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."
" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
" बरं मग?"
" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत."
" मंग काय करावं म्हन्तीस?"
" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"
भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्क्रीट कामाचे सेन्टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.
" दात काडाया काय झालं?"
" काय न्हाई. ते पवर्याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.
" उटा. चहाटाळपणा बास् झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."
कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.
कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.
" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.
" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."
" कुनी काई आलं न्हाई म्हन्जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय."
" पर आमी काय करावं?"
" म्हंजी?"
" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो."
" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,
" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."
" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."
" ............."
" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"
" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्?"
" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."
" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."
" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"
एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.
दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.
नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.
" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.
" हूं. भेटला."
" काय म्हनाला?"
" काय न्हाई"
" म्हंजी......"
" उंद्याला बंदुबस्त व्हईन"
" म्हंजी......"
" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.
" अवो पर म्हंजी.......कसा? आन् यवडं चिरडायला काय झालं?"
" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."
कौशीनं फणकार्यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.
आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.
दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.
"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?"
" अवो ते कुरकळणी काका"
"कोऽऽन?"
" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"
" बरं मग?"
" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.
" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."
" सांगते! जरा दमानं घ्या की."
" हां बोल."
" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"
" बरं.मग!"
" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."
" बरं. मग!"
" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."
" बरं मग!"
" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."
" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."
" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन् रावसाहेबांचा फाटका जोडा"
" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."
" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"
" पर मला जमंन कां त्ये?"
" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."
" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"
" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."
कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.
ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.
भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.
एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.
टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,
" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"
" व्हय की. वाढ."
उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,
" बा, तू गावात कंदी जानार?"
" कां रं? "
" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"
" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.
" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."
" काय बोलायचंय! हे कवा आननार अन् ते कवा आननार हेच की."
" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"
" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."
" म्हंजी?"
" घरात न्हाई दाना आन् म्हनं हवालदार म्हना."
" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."
" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
" बरं मग?"
" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत."
" मंग काय करावं म्हन्तीस?"
" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"
भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्क्रीट कामाचे सेन्टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.
" दात काडाया काय झालं?"
" काय न्हाई. ते पवर्याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.
" उटा. चहाटाळपणा बास् झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."
कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.
कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.
" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.
" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."
" कुनी काई आलं न्हाई म्हन्जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय."
" पर आमी काय करावं?"
" म्हंजी?"
" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो."
" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,
" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."
" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."
" ............."
" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"
" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्?"
" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."
" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."
" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"
एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.
दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.
नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.
" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.
" हूं. भेटला."
" काय म्हनाला?"
" काय न्हाई"
" म्हंजी......"
" उंद्याला बंदुबस्त व्हईन"
" म्हंजी......"
" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.
" अवो पर म्हंजी.......कसा? आन् यवडं चिरडायला काय झालं?"
" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."
कौशीनं फणकार्यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.
आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.
दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.
"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?"
" अवो ते कुरकळणी काका"
"कोऽऽन?"
" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"
" बरं मग?"
" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.
" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."
" सांगते! जरा दमानं घ्या की."
" हां बोल."
" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"
" बरं.मग!"
" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."
" बरं. मग!"
" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."
" बरं मग!"
" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."
" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."
" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन् रावसाहेबांचा फाटका जोडा"
" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."
" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"
" पर मला जमंन कां त्ये?"
" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."
" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"
" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."
कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.
ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.
भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.
Thursday, May 14, 2009
मौन
अगदी ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेन्ट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादि इत्यादि. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला. योगासन वर्गाला मी तिसर्याच दिवशी रामराम ठोकला. ती कपालभाती केली की मिसळी बरोबर चार चार पाव हाणावे लागायचे. तरीही प्रभात फेरी, ज्याला जनरली मॉर्निंग वॉक असे म्हणतात, त्याला मात्र मी इमाने इतबारे जाऊ लागलो. याला कारणे दोन. एक तर तिथेही चार मित्र मिळवून एका कट्ट्यावर बसून वयाला साजेशा किंवा न साजेशा टवाळक्या करायाला मिळतात आणि दुसरे म्हणजे मग शेवटी घरी परतण्या आधी टपरीवरचा गरमागरम चहा. (चहाला गरमागरम भजी, वडा किंवा तत्सम कांही पदार्थाचे अनुपान दिले नाही तर मला चहा बाधतो).
परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला,
कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.
" टूथ ट्रबल? ओह् जीझस् क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं ‘अरे देवा’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ!" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?
"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक) यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."
मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या.
" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "
तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते. अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.
मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत, मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले.
" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच रम्या अमेरिकेत राहून बदलला होता.
"या!" या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली.
माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग् वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो.
ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती.
पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.
मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले.
रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो.
सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार
आणि त्यातून काय काय प्रसंग उद्भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.
" तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता.
" ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि....
" आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी,
" हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता.
मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती.
तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि..
इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी ‘पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा’ म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मूक (सायलेन्ट) केला.
आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो ‘कुणीसा’ जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता ‘सर्वार्थ’ साधणार होतो. एरवी मी ‘वट्टार वट्टार’ करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित् गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती
अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी ‘ काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?’ असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं.
" बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला.निर्देश माझाकडेच होता. याचं मला आश्चर्य वाटालं.
" काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी.
" फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल.
" अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?"
इति सुभाष कीर्तिकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि,
" अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले.
मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती.
त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता.
पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला,
" हां बोल. " दाभाडे
" बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो.
" मी काय केलं? तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो.
" ए! साला तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला.
" मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता.
" पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा!
" मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला.
सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले.
" पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं, पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?"
" च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." कीर्तिकर
" अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे.
" पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ
"कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं?" पुन्हा दाभाडे.
" पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढं भोसडायचं?" रवी सराफ
" ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ
" काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे
" मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ
" हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे
" आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया कोणाची?" रवी सराफ
" हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी
" घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला
" काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे
" ए, कुठाय् रे हे वडुलं?" गजा कर्वे
" कुठं कां असेना. तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे
" च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा
" काय बरंय?"
"म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सराफ
" तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे
" ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" कीर्तिकर डोळे मिचकावीत.
ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन
तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं,
" ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!"
माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींनी याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच.
आणि मोठ्ठ्याने ओरडलो,
" बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?"
दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?"
"मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला.
परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला,
कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.
" टूथ ट्रबल? ओह् जीझस् क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं ‘अरे देवा’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ!" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?
"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक) यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."
मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या.
" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "
तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते. अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.
मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत, मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले.
" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच रम्या अमेरिकेत राहून बदलला होता.
"या!" या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली.
माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग् वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो.
ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती.
पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.
मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले.
रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो.
सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार
आणि त्यातून काय काय प्रसंग उद्भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.
" तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता.
" ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि....
" आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी,
" हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता.
मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती.
तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि..
इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी ‘पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा’ म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मूक (सायलेन्ट) केला.
आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो ‘कुणीसा’ जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता ‘सर्वार्थ’ साधणार होतो. एरवी मी ‘वट्टार वट्टार’ करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित् गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती
अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी ‘ काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?’ असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं.
" बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला.निर्देश माझाकडेच होता. याचं मला आश्चर्य वाटालं.
" काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी.
" फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल.
" अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?"
इति सुभाष कीर्तिकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि,
" अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले.
मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती.
त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता.
पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला,
" हां बोल. " दाभाडे
" बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो.
" मी काय केलं? तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो.
" ए! साला तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला.
" मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता.
" पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा!
" मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला.
सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले.
" पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं, पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?"
" च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." कीर्तिकर
" अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे.
" पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ
"कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं?" पुन्हा दाभाडे.
" पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढं भोसडायचं?" रवी सराफ
" ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ
" काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे
" मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ
" हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे
" आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया कोणाची?" रवी सराफ
" हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी
" घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला
" काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे
" ए, कुठाय् रे हे वडुलं?" गजा कर्वे
" कुठं कां असेना. तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे
" च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा
" काय बरंय?"
"म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सराफ
" तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे
" ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" कीर्तिकर डोळे मिचकावीत.
ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन
तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं,
" ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!"
माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींनी याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच.
आणि मोठ्ठ्याने ओरडलो,
" बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?"
दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?"
"मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला.
Sunday, December 16, 2007
स्वप्ना
" अवी ऽ !"
आईची हाक आली. ती मी ऐकलीही पण उत्तर द्यावंसं वाटलं नाही. कारण तिला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं आणि तो विषय मला नको होता. तरीही मला ते ऐकावं लागणारच होतं. तिला फार काळ असं टांगणीला ठेवणं आता या पुढे जमणारं नव्हतं. आता मी तिला टाळण्याचा जराही प्रयत्न केला तर दुखावली जाणार होती. बाबा गेल्यापासून ती फारच हळवी झाली होती.
"अरे! ऐकतोयस ना." आई पदराला हात पुसत समोरच येऊन उभी ठाकली.
" हं, बोल "
" मी काय म्हणते.. करंबेळकरांचा काल पुन्हा फोन आला होता."
" बरं ! "
" अरे, बरं काय? मी काय म्हणते... एकदा मुलगी बघायला काय हरकत आहे?"
" हं !"
" कम्माऽल झाली बाई तुझी! तू लग्न करणारेस की नाही? ...ते काही नाही. येत्या रविवारी ते मुलगी आणताहेत, दाखवायला.
मी हो म्हणालेय त्यांना. मुलगी चांगली शिकलेली आहे. इंटीरीयर का कसलासा कोर्सही केलाय आणि खूप देखणी आहे म्हणे."
" देखणी! ....तशी असेल का गं!" मी तंद्रीतच बोललो. आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष होतंही आणि नव्हतंही.
" तशी म्हणजे कशी? तू काय लावलं आहेस हे? तू काय दुसरी एखादी मुलगी बिलगी पाहिलीएस की काय? आणि मग सांगत का नाहीस तसं? "
" तसं काही नाही गं. ठीक आहे. बघू."
" बघू बिघू काही नाही. रविवारी घरीच राहा आपण. आणखी एक मेहेरबानी करा. कशात हरवू बिरवू नका."
आई मला हरवू नका म्हणाली पण मी आताही हरवलेलाच होतो. तिला पाहिल्या पासून या हरवलेलेपणाच्या धुक्यात मी गुरफटून गेलो होतो. या क्षणीही ती जणू माझ्या समोर उभी होती. मी आताही माझा उरलो नव्हतो. एखाद्या कळसूत्राने जणू माझा ताबा घेतल्यागत मी कपाटातून माझी रोजनिशी काढली आणि मागच्या कप्प्यातले तिचे छायाचित्र काढून त्यात हरवलो.
एक जुनाट वाडा. वाडा कसला जणू गढीच. वाड्याच्या मागे एक भलं मोठं परस. परसात एक भली मोठी बारव. परसात झाडझाडोराच माजलेला. वाड्याची तशी बारवेचीही पडझडच झालेली. पण बारव अजून बर्यापैकी तग धरून राहिलेली. वरल्या तोंडाला अष्टकोनी चिरेबंदी घेर. बारवेला एका बाजूने पाण्याच्या डोहापर्यंत उतरत जाणार्या पायर्या. पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भितीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून, काहीशी ओठंगून पण अगदी ऐटीत उभी ती आणि सुंदर हा शब्दही अगदी क्षुद्र ठरावा अशी तिची लोभसवाणी छबी. आणि ते सारं काव्य शेवटच्या पायरीवरून कॅमेर्यात उतरवताना माझी झालेली तारांबळ.
" काय झालंऽ? निघतोय की नाही माझा फोटो?" जणू एक वीणाच झंकारली.
" हं झालं. रेडी?" मी कॅमेर्याची कळ दाबली फक्ककन् फ्लॅश उडाला, आणि दुसर्याच क्षणी,
" आई गं! " एक किंकाळी उठली आणि तिचा तोल गेला. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा मी तिला सावरायला झेपावलो. पण त्या आधीच ती सावरली होती.
" काय झालं? केवढ्याने किंचाळलीस. काय झालं इतकं घाबरायला."
" किंचाळू नको तर काय करू! केवढा मोठा प्रकाश! डोळे दिपून गेले अगदी. आम्हाला तर बाई भीती वाटली अगदी. वाटलं एखादा ताराच कोसळतोय की काय अंगावर."
तिचे ते निरागस विभ्रम पाहून मला हसायला आलं.
" आमचा इकडे जीव जातोय आणि तुम्हाला मात्र हसायला येतंय. जातोच आम्ही कशा ते. बसा तुम्ही हसत."
माझं हसू आवरून होऊन मी तिला काही म्हणेतो ती वार्याच्या झुळकीसारखी पसार झाली.
ती गेली त्या दिशेकडे काळ्यामिट्ट अंधारात पाहत राहिलो ते कसल्याशा आवाजाने. कदाचित एखादी पाकोळी डोक्यावरून फडफडत गेली असावी.भानावर आलो तसा आपसूक काळे वकिलांच्या घराकडे चालू लागलो. काळे वकील. माझ्या बाबांचे जुने मित्र. त्यांनीच मला या गावाकडे बोलावून घेतले होते. गाव कसला! एकही इमारत सरळ आणि धड उभी नाही. भले मोठे मातीच्या भिंतींनी बांधलेली घरं, वाडे. बहुदा सगळेच्या सगळे पडझड झालेले. जे जरा सुस्थितीत असावे असे दिसत होते, ते जुनेच डागडुजी केलेले नाही तर नव्यानेच बांधलेले. कधी काळी या गावात सुबत्ता नांदत होती या वदंतेवर जराही विश्वास बसणार नाही इतकी गावाची रया गेलेली. इंग्रज मायदेशी रवाना झाले त्याच्या नऊ दहा वर्षं आधी गावात जीवघेणा दुष्काळ शिरला आणि पुढेही वीस बावीस वर्षं मधून अधून थैमान घालीतच राहिला. त्याने कर्ती सवर्ती माणसं पोटापाण्यासाठी परागंदा झाली ती झालीच. जे जिथे गेले, तिथेच वसले. पुन्हा गावाकडे अभावानेच फिरकले. मी देखील अशातल्याच एकाचा वारस होतो. इतकाच काय तो माझा या गावाशी संबंध.
पण या संबंधालाही एक नाव होते. पेशकारांचा वाडा. पेशकार माझे आडनाव. पूर्ण नाव अविनाश जनार्दन पेशकार. जनार्दन विश्वास पेशकारांचा आणि पेशकार कुटुंबाचा एकुलता एक विद्यमान वारस. या गावात आमच्या वारसा हक्काचा एक जुनाट, बराचसा भग्नावशेष उरलेला वाडा. माझ्या वडिलांनाही त्यांच्या लहानपणी पाहिलेला. इतका जुना. वाड्याच्या एका बाजूला बर्यापैकी डागडुजी करून नानासाहेब काळे वकील राहत होते. माझ्या वडिलांचे ते मित्र आणि विश्वस्तही. वाड्यात दोन तीन भाडेकरू होते. पण त्यांच्या सगळ्याच्या वर्षाच्या भाड्याएवढ्या रकमेत या गावाकडे येण्याचे प्रवास भाडेही सुटत नसे. त्यामुळे भाडेवसूली, नगरपालिकेचे नैमित्तिक कर भरणे, आणि अशी बाकी सारी व्यवस्था वकील साहेबच बघत. तेही आता गाव सोडून त्यांच्या मुलाकडे जाऊ इच्छित होते. तेव्हा हा वाडा येईल त्या किमतीला विकून टाकावा हा त्यांचा प्रस्ताव होता. वाडा घ्यायला तालुक्यातील एक वखारवाला तयार झाला होता. आणि त्या साठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मी या गावात आलेलो होतो. एखाद दोन दिवसात हे काम आटोपेल असे वाटले होते पण येऊन आठ दिवस उलटून गेले तरी फारशी प्रगती झालेली नव्हती.
सुरुवातीला गाव बघण्यात, गावाबाहेरील महादेवाचे पडके हेमाडपंथी मंदिर, चार दोन शेते बघण्यात वेळ गेला. पण पुढे वेळ जाई ना. वाड्याबद्दलचे कुतूहल मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. मी त्या भल्या मोठ्या वाड्यातील अवशेषातून डोकावू लागलो. असाच एकदा वाड्यामागील भागाकडे गेलो तर एक बर्यापैकी सुस्थितीतील एक विहिरी दिसली. तिला बारव म्हणतात हेही असेच कोणीतरी सांगितलेले. बारवेच्या पायर्या उतरून पाण्यात पाय सोडून शेवटच्या पायरीवर बसलो. बरेचसे अंधारून आलेले होते. पण त्या थंड पाण्याचा स्पर्श इतका सुखावणारा होता की वेळेचे भान न गळाले असते तरच नवल. या गूढ रम्य वातावरणात तिची माझी पहिली भेट होईल असं स्वप्नंही मला कधी पडलं नसतं. पण पुढे जे घडत गेलं ते स्वप्नाहूनही अद्भुत होतं.
" काय हो! जीव द्यायचा विचार चाललाय की काय."
कुठुनश्या आलेल्या आवाजाने आणि पाठोपाठ भिरभिरत आलेल्या हास्याच्या खळखळाटाने मी दचकलोच. आवाजाच्या रोखाने मी वर पाहिले तर एक तरुण मुलगी दिसली. मी अभावितपणे उठून पायर्या चढू लागणार इतक्यात पुन्हा आवाज आला,
" थांबा तिथेच. मीच खाली येतेय."
तिथे त्या ओसाड स्थळी आणि त्या क्षणी कुणी येईल अशी जराही शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटले तरी मी काहीसा भांबावलो होतो. ती मुलगी कधी समोर येऊन उभी राहिली हे समजलंच नाही. पुन्हा एक लोभसवाणा हास्याचा खळखळाट आणि,
" बाई गं! किती घाबरलाहात हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि इथं काय करताय आता, यावेळी."
" मी ... मी.. काही नाही. इथं आलो होतो... सहजच... काही काम होतं... काळे वकिलांकडे आलोय."
" अच्छाऽऽ! तरीऽच!!"
" तरीच...? तरीच काय ?"
" तरीच म्हणजे, बाहेर गावचे दिसताहात. एरवी गावातला कुणी जीव गेला तरी इकडे या ठिकाणी फिरकायचं धाडस करणार नाही."
" का? हे अगदी ओसाड आहे म्हणून? पण मला तर ही जागा फार आवडली. किती शांत आणि छान वाटतंय नाही इथं "
" खरंच तुम्हाला आवडली ही जागा? द्या टाळी! माझीही ही खास जागा आहे."
" म्हणजे तू...आय् मीन...तुम्ही नेहमी येता."
" काही हरकत नाही.. तुम्ही मला तू म्हणालात तरी चालेल. आणि माझं म्हणाल तर ही जागा माझा अगदी स्वर्गच आहे म्हणाना."
" छान! म्हणजे, तू इथे रोज येत असशीलच. आणि नसलीस तरी रोज येत जा, प्लीज! काही कामासाठी आलोय मी या गावात.
पण दोनच दिवसात जीव नकोसा व्हावा इतका कंटाळलोय.तू निदान चार शब्द बोलशील तरी."
" खरंय तुमचं. अगदी वेगळा आहे हा गाव. पण तुम्ही इथे कशासाठी आलाय?"
" सांगतो. पण मला आधी सांग, हे मी कोणाला सांगणार आहे?" मी किंचित गमतीने म्हणालो.
" इश्श्य! कोणाला म्हणजे काय? मला....आणखी कोणाला!"
"............." मी काहीच न बोलता मिस्किलपणे तसाच पाहत राहिलो.
" अच्छाऽ ऽ! म्हणजे फिरकी घेताय आमची. आलं लक्षात! सरळ नाव विचारा ना!" तिचे गोबरे गाल फुगवीत आणि टप्पोरे डोळे वटारीत ती म्हणाली.
" आलंय ना लक्षात! मग सांग ना!"
" आम्ही नाई जा! तुम्हीच ओळखा पाहू! काय नाव आहे आमचं!" ही अशी बाजू माझ्यावरच उलटवेल असं वाट नव्हतं. पण मलाही गंमत सुचली.
" ओळखू? अंऽ ऽ ऽ स्वप्ना! स्वप्ना नाव असणार तुझं."
" अय्या, ...काय जादुगार आहात की काय? कसं ओळखलंत नाव तुम्ही माझं? सांगा ना!" हर्षातिरेकाने ती नखशिखान्त थरथरत होती. थक्कच झालो मी. पण तरीही काही तरी सुचलंच.
" त्यात कसलीये जादू. ही जागा, ही बारव, ही मागची कमान, त्या वेली, हे पाणी हे सारं एक स्वप्नच आणि त्यात तू ! ही अशी अचानक अवतरलेली स्वप्नपरी! मग तुझं नाव स्वप्ना!! यापेक्षा आणखी काही वेगळं असू तरी शकेल का."
काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.
त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.
अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या. अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलो.
" का रे? काय झालं? काही हवंय का?
"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."
" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.
" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.
" फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग
आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता. माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न् तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्यांवर तासन् तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी. जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."
काकूंच्या शेवटच्या वाक्याने कानात प्राण एकवटले. माझ्या हाताने नकळतच जिथे कॅमेरा ठेवला होता ती जागा चाचपली. ’मी काढीन शोधून तिला..मी काढीन शोधून माझ्या सर्वस्वाला, माझ्या स्वप्नाला’ मनात एकच कल्लोळ उसळला.
" काकू, निघतो मी. गाडीची वेळ होत आली."
"अरे, हो रे. खरंच की. मनात एक वाफ दबून राहिली होती. तू विषय काढलास. भानच हरपलं माझं. बरंय! ये तू आता. घरी पोहोचलास की पत्र टाक." काकूंनी मला निरोप दिला.
तालुक्याचे सोपस्कार आटोपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात मनात स्वप्नाशिवाय दुसरं काही नव्हतंच. लगेचच स्वप्नाचा शोध घ्यावा, मगच घरी जावं, असं अनेकदा मानांत आलं. पण ते शक्य नव्हतं वाड्याचा विक्रीतली एक बर्यापैकी मोठी रक्कम रोखीने घेतली होती. ती बॅगेत तळाशी ठेवली होती. ती लगोलग घरी आईच्या स्वाधीन करणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते.
गाडी स्टेशनांत पोहोचली तसा मी आधी तडक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत गेलो. कमेर्यातला रोल त्याच्या स्वाधीन केला आणि त्यावर लगेच प्रक्रिया करून छायाचित्रांच्या प्रतीही लगेचच काढ असे म्हणालो. तिथून घरी आलो. गावाकडे काय काय घडले ते आईला शक्य तितके सविस्तर, फक्त स्वप्ना वगळून, सांगितले आणि पुन्हा फोटो स्टुडिओ कडे निघालो. माझी उडालेली धांदल आईच्या नजरेतून सुटली नव्हती. पण त्या क्षणी ती मला काही विचारणार नव्हती. तसा तिचा स्वभावच होता. माझ्या उडालेल्या धांदलीचे कारण तिने मला नंतरच विचारायला हवे होते. पण ती छायाचित्रे पाहिल्या शिवाय मला काहीही बोलता येणार नव्हते.
मित्राने माझ्या हाती दिलेली छायाचित्रांची चळत मी पुन्हा पुन्हा चाळली. माझ्या चर्येवरची उत्कंठा मावळून एक संभ्रमाची छटा पसरते आहे हे माझ्या मित्राच्या नजरेतून सुटले नाही.
" का रे? काही चुकलं आहे का?"
" नाही, नाही, तसं काही नाही. पण तू सगळे प्रिन्टस् काढलेस ना?"
" भलेऽऽ! म्हणजे काय? अरे प्रिन्टस् मोजून पाहा ना. या वन-ट्वेन्टीच्या रोलमध्ये बाराच प्रिन्टस् निघणार ना? "
" हो, हो, आहेत, आहेत. बरं चल येतो मी." मी तिथून काढता पाय घेतला नि घरी आलो. गठ्ठ्यातल्या शेवटाच्या दोन प्रिन्टस् माझ्या रोजनिशीच्या मागच्या कप्प्यात ठेवून दिल्या.
करंबेळकरांकडे फोन झाला. आईने मला तसं आतूनच ओरडून सांगितले. ते छायाचित्र माझ्या हातातच होते. आई कधी मागे येऊन उभी राहिली ते तंद्रीत समजलंच नाही.
" कसला रे फोटो? बघू. "
त्या जुनाट वाड्याच्या मागची बारव. बरवेच्या पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भिंतीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून..... .
" आपल्या वाड्याचा का रे फोटो? काय डौलदार कमान आहे नाही? पण, कमानी खाली कुणी उभं राहिलं असतं ना, तर खूप छान दिसलं असतं."
कमानी खाली कुणीतरी होतं, ते आईला......तिलाच काय कुणालाही दिसणार नव्हतं. पण मला ती आताही दिसत होती. ती तिथेच होती.
स्वप्ना !
आईची हाक आली. ती मी ऐकलीही पण उत्तर द्यावंसं वाटलं नाही. कारण तिला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं आणि तो विषय मला नको होता. तरीही मला ते ऐकावं लागणारच होतं. तिला फार काळ असं टांगणीला ठेवणं आता या पुढे जमणारं नव्हतं. आता मी तिला टाळण्याचा जराही प्रयत्न केला तर दुखावली जाणार होती. बाबा गेल्यापासून ती फारच हळवी झाली होती.
"अरे! ऐकतोयस ना." आई पदराला हात पुसत समोरच येऊन उभी ठाकली.
" हं, बोल "
" मी काय म्हणते.. करंबेळकरांचा काल पुन्हा फोन आला होता."
" बरं ! "
" अरे, बरं काय? मी काय म्हणते... एकदा मुलगी बघायला काय हरकत आहे?"
" हं !"
" कम्माऽल झाली बाई तुझी! तू लग्न करणारेस की नाही? ...ते काही नाही. येत्या रविवारी ते मुलगी आणताहेत, दाखवायला.
मी हो म्हणालेय त्यांना. मुलगी चांगली शिकलेली आहे. इंटीरीयर का कसलासा कोर्सही केलाय आणि खूप देखणी आहे म्हणे."
" देखणी! ....तशी असेल का गं!" मी तंद्रीतच बोललो. आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष होतंही आणि नव्हतंही.
" तशी म्हणजे कशी? तू काय लावलं आहेस हे? तू काय दुसरी एखादी मुलगी बिलगी पाहिलीएस की काय? आणि मग सांगत का नाहीस तसं? "
" तसं काही नाही गं. ठीक आहे. बघू."
" बघू बिघू काही नाही. रविवारी घरीच राहा आपण. आणखी एक मेहेरबानी करा. कशात हरवू बिरवू नका."
आई मला हरवू नका म्हणाली पण मी आताही हरवलेलाच होतो. तिला पाहिल्या पासून या हरवलेलेपणाच्या धुक्यात मी गुरफटून गेलो होतो. या क्षणीही ती जणू माझ्या समोर उभी होती. मी आताही माझा उरलो नव्हतो. एखाद्या कळसूत्राने जणू माझा ताबा घेतल्यागत मी कपाटातून माझी रोजनिशी काढली आणि मागच्या कप्प्यातले तिचे छायाचित्र काढून त्यात हरवलो.
एक जुनाट वाडा. वाडा कसला जणू गढीच. वाड्याच्या मागे एक भलं मोठं परस. परसात एक भली मोठी बारव. परसात झाडझाडोराच माजलेला. वाड्याची तशी बारवेचीही पडझडच झालेली. पण बारव अजून बर्यापैकी तग धरून राहिलेली. वरल्या तोंडाला अष्टकोनी चिरेबंदी घेर. बारवेला एका बाजूने पाण्याच्या डोहापर्यंत उतरत जाणार्या पायर्या. पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भितीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून, काहीशी ओठंगून पण अगदी ऐटीत उभी ती आणि सुंदर हा शब्दही अगदी क्षुद्र ठरावा अशी तिची लोभसवाणी छबी. आणि ते सारं काव्य शेवटच्या पायरीवरून कॅमेर्यात उतरवताना माझी झालेली तारांबळ.
" काय झालंऽ? निघतोय की नाही माझा फोटो?" जणू एक वीणाच झंकारली.
" हं झालं. रेडी?" मी कॅमेर्याची कळ दाबली फक्ककन् फ्लॅश उडाला, आणि दुसर्याच क्षणी,
" आई गं! " एक किंकाळी उठली आणि तिचा तोल गेला. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा मी तिला सावरायला झेपावलो. पण त्या आधीच ती सावरली होती.
" काय झालं? केवढ्याने किंचाळलीस. काय झालं इतकं घाबरायला."
" किंचाळू नको तर काय करू! केवढा मोठा प्रकाश! डोळे दिपून गेले अगदी. आम्हाला तर बाई भीती वाटली अगदी. वाटलं एखादा ताराच कोसळतोय की काय अंगावर."
तिचे ते निरागस विभ्रम पाहून मला हसायला आलं.
" आमचा इकडे जीव जातोय आणि तुम्हाला मात्र हसायला येतंय. जातोच आम्ही कशा ते. बसा तुम्ही हसत."
माझं हसू आवरून होऊन मी तिला काही म्हणेतो ती वार्याच्या झुळकीसारखी पसार झाली.
ती गेली त्या दिशेकडे काळ्यामिट्ट अंधारात पाहत राहिलो ते कसल्याशा आवाजाने. कदाचित एखादी पाकोळी डोक्यावरून फडफडत गेली असावी.भानावर आलो तसा आपसूक काळे वकिलांच्या घराकडे चालू लागलो. काळे वकील. माझ्या बाबांचे जुने मित्र. त्यांनीच मला या गावाकडे बोलावून घेतले होते. गाव कसला! एकही इमारत सरळ आणि धड उभी नाही. भले मोठे मातीच्या भिंतींनी बांधलेली घरं, वाडे. बहुदा सगळेच्या सगळे पडझड झालेले. जे जरा सुस्थितीत असावे असे दिसत होते, ते जुनेच डागडुजी केलेले नाही तर नव्यानेच बांधलेले. कधी काळी या गावात सुबत्ता नांदत होती या वदंतेवर जराही विश्वास बसणार नाही इतकी गावाची रया गेलेली. इंग्रज मायदेशी रवाना झाले त्याच्या नऊ दहा वर्षं आधी गावात जीवघेणा दुष्काळ शिरला आणि पुढेही वीस बावीस वर्षं मधून अधून थैमान घालीतच राहिला. त्याने कर्ती सवर्ती माणसं पोटापाण्यासाठी परागंदा झाली ती झालीच. जे जिथे गेले, तिथेच वसले. पुन्हा गावाकडे अभावानेच फिरकले. मी देखील अशातल्याच एकाचा वारस होतो. इतकाच काय तो माझा या गावाशी संबंध.
पण या संबंधालाही एक नाव होते. पेशकारांचा वाडा. पेशकार माझे आडनाव. पूर्ण नाव अविनाश जनार्दन पेशकार. जनार्दन विश्वास पेशकारांचा आणि पेशकार कुटुंबाचा एकुलता एक विद्यमान वारस. या गावात आमच्या वारसा हक्काचा एक जुनाट, बराचसा भग्नावशेष उरलेला वाडा. माझ्या वडिलांनाही त्यांच्या लहानपणी पाहिलेला. इतका जुना. वाड्याच्या एका बाजूला बर्यापैकी डागडुजी करून नानासाहेब काळे वकील राहत होते. माझ्या वडिलांचे ते मित्र आणि विश्वस्तही. वाड्यात दोन तीन भाडेकरू होते. पण त्यांच्या सगळ्याच्या वर्षाच्या भाड्याएवढ्या रकमेत या गावाकडे येण्याचे प्रवास भाडेही सुटत नसे. त्यामुळे भाडेवसूली, नगरपालिकेचे नैमित्तिक कर भरणे, आणि अशी बाकी सारी व्यवस्था वकील साहेबच बघत. तेही आता गाव सोडून त्यांच्या मुलाकडे जाऊ इच्छित होते. तेव्हा हा वाडा येईल त्या किमतीला विकून टाकावा हा त्यांचा प्रस्ताव होता. वाडा घ्यायला तालुक्यातील एक वखारवाला तयार झाला होता. आणि त्या साठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मी या गावात आलेलो होतो. एखाद दोन दिवसात हे काम आटोपेल असे वाटले होते पण येऊन आठ दिवस उलटून गेले तरी फारशी प्रगती झालेली नव्हती.
सुरुवातीला गाव बघण्यात, गावाबाहेरील महादेवाचे पडके हेमाडपंथी मंदिर, चार दोन शेते बघण्यात वेळ गेला. पण पुढे वेळ जाई ना. वाड्याबद्दलचे कुतूहल मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. मी त्या भल्या मोठ्या वाड्यातील अवशेषातून डोकावू लागलो. असाच एकदा वाड्यामागील भागाकडे गेलो तर एक बर्यापैकी सुस्थितीतील एक विहिरी दिसली. तिला बारव म्हणतात हेही असेच कोणीतरी सांगितलेले. बारवेच्या पायर्या उतरून पाण्यात पाय सोडून शेवटच्या पायरीवर बसलो. बरेचसे अंधारून आलेले होते. पण त्या थंड पाण्याचा स्पर्श इतका सुखावणारा होता की वेळेचे भान न गळाले असते तरच नवल. या गूढ रम्य वातावरणात तिची माझी पहिली भेट होईल असं स्वप्नंही मला कधी पडलं नसतं. पण पुढे जे घडत गेलं ते स्वप्नाहूनही अद्भुत होतं.
" काय हो! जीव द्यायचा विचार चाललाय की काय."
कुठुनश्या आलेल्या आवाजाने आणि पाठोपाठ भिरभिरत आलेल्या हास्याच्या खळखळाटाने मी दचकलोच. आवाजाच्या रोखाने मी वर पाहिले तर एक तरुण मुलगी दिसली. मी अभावितपणे उठून पायर्या चढू लागणार इतक्यात पुन्हा आवाज आला,
" थांबा तिथेच. मीच खाली येतेय."
तिथे त्या ओसाड स्थळी आणि त्या क्षणी कुणी येईल अशी जराही शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटले तरी मी काहीसा भांबावलो होतो. ती मुलगी कधी समोर येऊन उभी राहिली हे समजलंच नाही. पुन्हा एक लोभसवाणा हास्याचा खळखळाट आणि,
" बाई गं! किती घाबरलाहात हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि इथं काय करताय आता, यावेळी."
" मी ... मी.. काही नाही. इथं आलो होतो... सहजच... काही काम होतं... काळे वकिलांकडे आलोय."
" अच्छाऽऽ! तरीऽच!!"
" तरीच...? तरीच काय ?"
" तरीच म्हणजे, बाहेर गावचे दिसताहात. एरवी गावातला कुणी जीव गेला तरी इकडे या ठिकाणी फिरकायचं धाडस करणार नाही."
" का? हे अगदी ओसाड आहे म्हणून? पण मला तर ही जागा फार आवडली. किती शांत आणि छान वाटतंय नाही इथं "
" खरंच तुम्हाला आवडली ही जागा? द्या टाळी! माझीही ही खास जागा आहे."
" म्हणजे तू...आय् मीन...तुम्ही नेहमी येता."
" काही हरकत नाही.. तुम्ही मला तू म्हणालात तरी चालेल. आणि माझं म्हणाल तर ही जागा माझा अगदी स्वर्गच आहे म्हणाना."
" छान! म्हणजे, तू इथे रोज येत असशीलच. आणि नसलीस तरी रोज येत जा, प्लीज! काही कामासाठी आलोय मी या गावात.
पण दोनच दिवसात जीव नकोसा व्हावा इतका कंटाळलोय.तू निदान चार शब्द बोलशील तरी."
" खरंय तुमचं. अगदी वेगळा आहे हा गाव. पण तुम्ही इथे कशासाठी आलाय?"
" सांगतो. पण मला आधी सांग, हे मी कोणाला सांगणार आहे?" मी किंचित गमतीने म्हणालो.
" इश्श्य! कोणाला म्हणजे काय? मला....आणखी कोणाला!"
"............." मी काहीच न बोलता मिस्किलपणे तसाच पाहत राहिलो.
" अच्छाऽ ऽ! म्हणजे फिरकी घेताय आमची. आलं लक्षात! सरळ नाव विचारा ना!" तिचे गोबरे गाल फुगवीत आणि टप्पोरे डोळे वटारीत ती म्हणाली.
" आलंय ना लक्षात! मग सांग ना!"
" आम्ही नाई जा! तुम्हीच ओळखा पाहू! काय नाव आहे आमचं!" ही अशी बाजू माझ्यावरच उलटवेल असं वाट नव्हतं. पण मलाही गंमत सुचली.
" ओळखू? अंऽ ऽ ऽ स्वप्ना! स्वप्ना नाव असणार तुझं."
" अय्या, ...काय जादुगार आहात की काय? कसं ओळखलंत नाव तुम्ही माझं? सांगा ना!" हर्षातिरेकाने ती नखशिखान्त थरथरत होती. थक्कच झालो मी. पण तरीही काही तरी सुचलंच.
" त्यात कसलीये जादू. ही जागा, ही बारव, ही मागची कमान, त्या वेली, हे पाणी हे सारं एक स्वप्नच आणि त्यात तू ! ही अशी अचानक अवतरलेली स्वप्नपरी! मग तुझं नाव स्वप्ना!! यापेक्षा आणखी काही वेगळं असू तरी शकेल का."
काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.
त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.
अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या. अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलो.
" का रे? काय झालं? काही हवंय का?
"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."
" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.
" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.
" फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग
आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता. माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न् तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्यांवर तासन् तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी. जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."
काकूंच्या शेवटच्या वाक्याने कानात प्राण एकवटले. माझ्या हाताने नकळतच जिथे कॅमेरा ठेवला होता ती जागा चाचपली. ’मी काढीन शोधून तिला..मी काढीन शोधून माझ्या सर्वस्वाला, माझ्या स्वप्नाला’ मनात एकच कल्लोळ उसळला.
" काकू, निघतो मी. गाडीची वेळ होत आली."
"अरे, हो रे. खरंच की. मनात एक वाफ दबून राहिली होती. तू विषय काढलास. भानच हरपलं माझं. बरंय! ये तू आता. घरी पोहोचलास की पत्र टाक." काकूंनी मला निरोप दिला.
तालुक्याचे सोपस्कार आटोपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात मनात स्वप्नाशिवाय दुसरं काही नव्हतंच. लगेचच स्वप्नाचा शोध घ्यावा, मगच घरी जावं, असं अनेकदा मानांत आलं. पण ते शक्य नव्हतं वाड्याचा विक्रीतली एक बर्यापैकी मोठी रक्कम रोखीने घेतली होती. ती बॅगेत तळाशी ठेवली होती. ती लगोलग घरी आईच्या स्वाधीन करणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते.
गाडी स्टेशनांत पोहोचली तसा मी आधी तडक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत गेलो. कमेर्यातला रोल त्याच्या स्वाधीन केला आणि त्यावर लगेच प्रक्रिया करून छायाचित्रांच्या प्रतीही लगेचच काढ असे म्हणालो. तिथून घरी आलो. गावाकडे काय काय घडले ते आईला शक्य तितके सविस्तर, फक्त स्वप्ना वगळून, सांगितले आणि पुन्हा फोटो स्टुडिओ कडे निघालो. माझी उडालेली धांदल आईच्या नजरेतून सुटली नव्हती. पण त्या क्षणी ती मला काही विचारणार नव्हती. तसा तिचा स्वभावच होता. माझ्या उडालेल्या धांदलीचे कारण तिने मला नंतरच विचारायला हवे होते. पण ती छायाचित्रे पाहिल्या शिवाय मला काहीही बोलता येणार नव्हते.
मित्राने माझ्या हाती दिलेली छायाचित्रांची चळत मी पुन्हा पुन्हा चाळली. माझ्या चर्येवरची उत्कंठा मावळून एक संभ्रमाची छटा पसरते आहे हे माझ्या मित्राच्या नजरेतून सुटले नाही.
" का रे? काही चुकलं आहे का?"
" नाही, नाही, तसं काही नाही. पण तू सगळे प्रिन्टस् काढलेस ना?"
" भलेऽऽ! म्हणजे काय? अरे प्रिन्टस् मोजून पाहा ना. या वन-ट्वेन्टीच्या रोलमध्ये बाराच प्रिन्टस् निघणार ना? "
" हो, हो, आहेत, आहेत. बरं चल येतो मी." मी तिथून काढता पाय घेतला नि घरी आलो. गठ्ठ्यातल्या शेवटाच्या दोन प्रिन्टस् माझ्या रोजनिशीच्या मागच्या कप्प्यात ठेवून दिल्या.
करंबेळकरांकडे फोन झाला. आईने मला तसं आतूनच ओरडून सांगितले. ते छायाचित्र माझ्या हातातच होते. आई कधी मागे येऊन उभी राहिली ते तंद्रीत समजलंच नाही.
" कसला रे फोटो? बघू. "
त्या जुनाट वाड्याच्या मागची बारव. बरवेच्या पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भिंतीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून..... .
" आपल्या वाड्याचा का रे फोटो? काय डौलदार कमान आहे नाही? पण, कमानी खाली कुणी उभं राहिलं असतं ना, तर खूप छान दिसलं असतं."
कमानी खाली कुणीतरी होतं, ते आईला......तिलाच काय कुणालाही दिसणार नव्हतं. पण मला ती आताही दिसत होती. ती तिथेच होती.
स्वप्ना !
Wednesday, April 18, 2007
वाळूचे वादळ, एक असेंही..
वाळूचे वादळ, एक असेंही..
अरुण वडुलेकर रवि, १८/०२/२००७ - ११:०६. » कथा | अनुभव
मनोगतवर जयश्री अंबासकर यांचा ' वाळूची वादळे ' हा लेख वाचला आणि मीही असांच एकदा वाळुच्या वादळांत सांपडलो होतो त्या स्मृती जाग्या झाल्या. ती चित्तरकथा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यावेळी मी मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशांत नोकरी साठी गेलेलो होतो. आवासांमधील हवा थंड करणाऱ्या संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची वेळोवेळी देखभाल होत राहील अशी व्यवस्था लावणे ही माझी कार्यकक्षा होती.
तो १९८१ सालांतील मार्च महिना असावा. मी मुख्य शहराबाहेरील दूरच्या लहानशा गावातील एका शेखच्या निवासांतील संयंत्राची पाहाणी करून परतत होतो. त्या वास्तूल निवास म्हणायचे पण जणू कांही राजवाडाच होता तो. संयंत्रतांत कांही दोष नव्हताच पण शेख तसा चिकित्सकच होता. त्यच्या शंका कुशंकांना तोंड देता देता संध्याकाळ होत आलेली. परत निघालो तेंव्हा आकाशांत बऱ्यापैकी प्रकाश होता. मला आमच्या आस्थापनेकडून दिली गेलेली मोटार गाडी चालवत सुमारें ११० कि.मी. चा प्रवास करून माझा निवास गाठायचा होता.
परतीचा रस्ता प्रधस्त, रुंद व चांगला होता. पण एकाकी आणि निर्मनुष्य होता. संध्याकाळ असल्याने वाटेने रहदारी असण्याची शक्यता नव्हतीच. मागे किंवा पुढे एकही वाहन दिसण्याची शक्यता फार विरळ होती. पण मनांत त्याची काळजी नव्हती. कारण कधीं एकदां घरी जाऊन पडतो असें झाले होते.
अशांतच, साधारण तीसेक कि.मी. चा प्रवास झाला असेल नसेल तोंच वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. सहसा अशा वादळाची पूर्वसूचना सकाळी तेथील स्थानिक आकाशवाणीवर दिली जते. पण मी ती ऐकली नव्हती. वाळूही अशी की धड जाढी नाहीं आणि अगदी पीठही नहीं. साधारण बारीक रव्यासारख्या वाळुचे लोट समोरून येऊन पुढील कांचेवर आदळून पसार होऊ लागले. सुरुवातीचे कांही क्षण अचंभ्यात गेले. मग कांही क्षण मौजही वाटून गेली. जणू मी वळिवाची सर अंगावर घेत होतो. पण पुढच्या क्षणी सारा आसमंत त्या धुराळ्याने भरून गेला. रस्ताच काय पण आजूबाजूचे सारे दिसेनासे झाले. धुक्यांत हरवावं तसं झालं होतं. प्रतिक्षिप्त क्रीयेने गाडी बंद केली गेली. भय केवळ मनांतच नाही तर सर्वांगावर पसरू लागलं. गाडीच्या सर्वांगावर धूळ-वाळूचा थर दाट होऊ लागला होता. खिडकेची कांच खाली करून बाहेर पाहाण्याच प्रयत्न केला. तो एक मूर्खपणाच झाला. जराशी कांच खाली होतांच वाळूचा एक जोरदार फवारा आंत घुसला आणि नाकातोंडावरुन झरपटून गेला. झटकन कांच पुन्हा बंद केली. अशा वेळी वायपर्स वापरतात की नाही ? कोणस ठाऊक ! कांही सुचण्यच्या पलिकेडे मी गेलेलो. वायपर्स चालू केले तर कांचेवर वाळू पाण्याचे सारवण होऊन राडाच झाला. वादळ थांबे पर्यंत स्वस्थ बसणे क्रमप्राप्त होते.
आणि मग स्वस्थ बसण्यातली अस्वस्थता दाटूं लागली. हे वादळ कधी थांबणार ? की थांबणाराच नाही ?? नाही थांबलं तर काय होईल ? मी गाडीसकट वाळूत गाडला जाईन की काय ? गाडीचा एसी चालू असला तरी हवेचा वास बदलल्याचे जाणवत होते. प्राणवायू कमी होतोय की काय ? मी गुदमरून मरणार? मग एका एकी मायदेशातील माझी पत्नी, मुलं, घर, माझी वाट पाहात असलेली बहिण, सारं सारं आठवायला लागलं. रडू यावं, धाय मोकलून रडावं असं वाटत होतं पण रडू फुटत नव्हतं. एकदा वाटलं गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडावं.गाडीत गुदमरून मरण्यापेक्षां बाहेर मरावं. मृत्यु निदान लवकर तरी येईल.
असा शून्यमनस्क किती वेळ बसून राहिलो तें कळलंच नाही. वादळाची गाज कमी झालीशी वाटली तसा दरवाजा हंळूच उघडून बाहेर आलो. वादळ शमलं होतं. तरी वारा जोराचा झोंजावत होताच. दाट अंधारून आलेलं होतं. पुढच्या कांचेवरील वाळुचा कसाबसा साफ करून गाडी सुरूं करूं गेलो तर काय ! धक्काच बासला. गाडी सुरूं झालीच नाहीं; होणारही नव्हती. कारण मी इंजीन बंद करायला विसरलो होतो, शिवाय एसी आणि हेडलाईटस चालूच राहिले होते. बॅटरी साफ उतरली होती. काय करणार ! मोठी पंचाईत झाली होती. कुणाची मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपत्कालीन इशारा (hazzard signal) चालू करून ठेवला आणि बाहेर येऊन उभा राहिलो.
अचानक दूरवर आकाशांत एक लाल पिवळा दिवा लुकलुकूतांना दिसू लागला आणि पाहतां पाहतां तो माझ्या दिशेने सरकू लागला.तें एक खूप खालून जाणारे हेलिकॉप्टर आहे हें धान्यांत येईतो तें माझ्या डोक्यावरून घोंघावत निघूनही गेले. मी वेड्यासारखा त्याच्या मागे ओरडत हातवारे करत धांवलो. पण उपयोग झाला नाही. पुन्हा तोच अंधार, भयाण पोकळी, गलितगात्र असा मी !
त्यानंतर तासभर गेला असेल नसेल, अशांतच एक विलक्षण घटना घडली. पुन्हा दूरवर लाल निळे ठिपके चमकू लागले. यावेळी ते खूपसें खाली क्षितिजालगत होते. लांबून येणारे एखादे वाहन असावें असें वाटले. कीं तो एक भास होता ? या विचारांची तंद्री मोडली ती डोळ्यांवर आदळणाऱ्या प्रकाश झोतांनी.
तो प्रकाश अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मोटरीच्या दिव्यांचाच होता इतकेंच नव्हे तर त्या मोटारीवरही एक दिवा होता जो लाल निळ्या प्राकाशाचे झोत फिरवत होता. हर्षातिरेकाने मी एक आरोळीच ठोकली. ती गाडी पोलीसांची (अरबी भाषेत पोलीस = शुरता) होती. ती कां आली होती तें समजलं आणि तेथील शासनव्यवस्थेला मनोमन सलाम ठोकला.
मघाशीचं हेलिकॉप्टर अशा वादळानंतर आपद्ग्रस्तांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर होतं आणि त्याने दिलेलेल्या माहितीनुसार हे दोन पोलीस अधिकारी माझी सोडवणूक करण्यासांठी आलेले होते.
कसं कुणास ठाऊक आता मला रडूं फुटलं होतं.मी रडत रडत, मला येत असलेल्या मोडक्या तोडक्या अरबी भाषेंत " शुकरंद रफिक " (धन्यवाद मित्रा) असं एक सारखं म्हणत होतो. त्यांना माझी भाषा येत नव्हती आणि मला त्यांची येत नव्हती. पण तरी तेंव्हा जो संवाद झाला तो शब्दांच्या पलिकडचा होता. माझी गाडी तिथेंच सोडून दिली.(ती दुसऱ्या दिवशी कंपनीच्या तंत्रज्ञाने आणली)
मी त्यांच्यासोबतीने सुखरूप परत आलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेंच खरे.
अरुण वडुलेकर रवि, १८/०२/२००७ - ११:०६. » कथा | अनुभव
मनोगतवर जयश्री अंबासकर यांचा ' वाळूची वादळे ' हा लेख वाचला आणि मीही असांच एकदा वाळुच्या वादळांत सांपडलो होतो त्या स्मृती जाग्या झाल्या. ती चित्तरकथा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यावेळी मी मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशांत नोकरी साठी गेलेलो होतो. आवासांमधील हवा थंड करणाऱ्या संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची वेळोवेळी देखभाल होत राहील अशी व्यवस्था लावणे ही माझी कार्यकक्षा होती.
तो १९८१ सालांतील मार्च महिना असावा. मी मुख्य शहराबाहेरील दूरच्या लहानशा गावातील एका शेखच्या निवासांतील संयंत्राची पाहाणी करून परतत होतो. त्या वास्तूल निवास म्हणायचे पण जणू कांही राजवाडाच होता तो. संयंत्रतांत कांही दोष नव्हताच पण शेख तसा चिकित्सकच होता. त्यच्या शंका कुशंकांना तोंड देता देता संध्याकाळ होत आलेली. परत निघालो तेंव्हा आकाशांत बऱ्यापैकी प्रकाश होता. मला आमच्या आस्थापनेकडून दिली गेलेली मोटार गाडी चालवत सुमारें ११० कि.मी. चा प्रवास करून माझा निवास गाठायचा होता.
परतीचा रस्ता प्रधस्त, रुंद व चांगला होता. पण एकाकी आणि निर्मनुष्य होता. संध्याकाळ असल्याने वाटेने रहदारी असण्याची शक्यता नव्हतीच. मागे किंवा पुढे एकही वाहन दिसण्याची शक्यता फार विरळ होती. पण मनांत त्याची काळजी नव्हती. कारण कधीं एकदां घरी जाऊन पडतो असें झाले होते.
अशांतच, साधारण तीसेक कि.मी. चा प्रवास झाला असेल नसेल तोंच वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. सहसा अशा वादळाची पूर्वसूचना सकाळी तेथील स्थानिक आकाशवाणीवर दिली जते. पण मी ती ऐकली नव्हती. वाळूही अशी की धड जाढी नाहीं आणि अगदी पीठही नहीं. साधारण बारीक रव्यासारख्या वाळुचे लोट समोरून येऊन पुढील कांचेवर आदळून पसार होऊ लागले. सुरुवातीचे कांही क्षण अचंभ्यात गेले. मग कांही क्षण मौजही वाटून गेली. जणू मी वळिवाची सर अंगावर घेत होतो. पण पुढच्या क्षणी सारा आसमंत त्या धुराळ्याने भरून गेला. रस्ताच काय पण आजूबाजूचे सारे दिसेनासे झाले. धुक्यांत हरवावं तसं झालं होतं. प्रतिक्षिप्त क्रीयेने गाडी बंद केली गेली. भय केवळ मनांतच नाही तर सर्वांगावर पसरू लागलं. गाडीच्या सर्वांगावर धूळ-वाळूचा थर दाट होऊ लागला होता. खिडकेची कांच खाली करून बाहेर पाहाण्याच प्रयत्न केला. तो एक मूर्खपणाच झाला. जराशी कांच खाली होतांच वाळूचा एक जोरदार फवारा आंत घुसला आणि नाकातोंडावरुन झरपटून गेला. झटकन कांच पुन्हा बंद केली. अशा वेळी वायपर्स वापरतात की नाही ? कोणस ठाऊक ! कांही सुचण्यच्या पलिकेडे मी गेलेलो. वायपर्स चालू केले तर कांचेवर वाळू पाण्याचे सारवण होऊन राडाच झाला. वादळ थांबे पर्यंत स्वस्थ बसणे क्रमप्राप्त होते.
आणि मग स्वस्थ बसण्यातली अस्वस्थता दाटूं लागली. हे वादळ कधी थांबणार ? की थांबणाराच नाही ?? नाही थांबलं तर काय होईल ? मी गाडीसकट वाळूत गाडला जाईन की काय ? गाडीचा एसी चालू असला तरी हवेचा वास बदलल्याचे जाणवत होते. प्राणवायू कमी होतोय की काय ? मी गुदमरून मरणार? मग एका एकी मायदेशातील माझी पत्नी, मुलं, घर, माझी वाट पाहात असलेली बहिण, सारं सारं आठवायला लागलं. रडू यावं, धाय मोकलून रडावं असं वाटत होतं पण रडू फुटत नव्हतं. एकदा वाटलं गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडावं.गाडीत गुदमरून मरण्यापेक्षां बाहेर मरावं. मृत्यु निदान लवकर तरी येईल.
असा शून्यमनस्क किती वेळ बसून राहिलो तें कळलंच नाही. वादळाची गाज कमी झालीशी वाटली तसा दरवाजा हंळूच उघडून बाहेर आलो. वादळ शमलं होतं. तरी वारा जोराचा झोंजावत होताच. दाट अंधारून आलेलं होतं. पुढच्या कांचेवरील वाळुचा कसाबसा साफ करून गाडी सुरूं करूं गेलो तर काय ! धक्काच बासला. गाडी सुरूं झालीच नाहीं; होणारही नव्हती. कारण मी इंजीन बंद करायला विसरलो होतो, शिवाय एसी आणि हेडलाईटस चालूच राहिले होते. बॅटरी साफ उतरली होती. काय करणार ! मोठी पंचाईत झाली होती. कुणाची मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपत्कालीन इशारा (hazzard signal) चालू करून ठेवला आणि बाहेर येऊन उभा राहिलो.
अचानक दूरवर आकाशांत एक लाल पिवळा दिवा लुकलुकूतांना दिसू लागला आणि पाहतां पाहतां तो माझ्या दिशेने सरकू लागला.तें एक खूप खालून जाणारे हेलिकॉप्टर आहे हें धान्यांत येईतो तें माझ्या डोक्यावरून घोंघावत निघूनही गेले. मी वेड्यासारखा त्याच्या मागे ओरडत हातवारे करत धांवलो. पण उपयोग झाला नाही. पुन्हा तोच अंधार, भयाण पोकळी, गलितगात्र असा मी !
त्यानंतर तासभर गेला असेल नसेल, अशांतच एक विलक्षण घटना घडली. पुन्हा दूरवर लाल निळे ठिपके चमकू लागले. यावेळी ते खूपसें खाली क्षितिजालगत होते. लांबून येणारे एखादे वाहन असावें असें वाटले. कीं तो एक भास होता ? या विचारांची तंद्री मोडली ती डोळ्यांवर आदळणाऱ्या प्रकाश झोतांनी.
तो प्रकाश अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मोटरीच्या दिव्यांचाच होता इतकेंच नव्हे तर त्या मोटारीवरही एक दिवा होता जो लाल निळ्या प्राकाशाचे झोत फिरवत होता. हर्षातिरेकाने मी एक आरोळीच ठोकली. ती गाडी पोलीसांची (अरबी भाषेत पोलीस = शुरता) होती. ती कां आली होती तें समजलं आणि तेथील शासनव्यवस्थेला मनोमन सलाम ठोकला.
मघाशीचं हेलिकॉप्टर अशा वादळानंतर आपद्ग्रस्तांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर होतं आणि त्याने दिलेलेल्या माहितीनुसार हे दोन पोलीस अधिकारी माझी सोडवणूक करण्यासांठी आलेले होते.
कसं कुणास ठाऊक आता मला रडूं फुटलं होतं.मी रडत रडत, मला येत असलेल्या मोडक्या तोडक्या अरबी भाषेंत " शुकरंद रफिक " (धन्यवाद मित्रा) असं एक सारखं म्हणत होतो. त्यांना माझी भाषा येत नव्हती आणि मला त्यांची येत नव्हती. पण तरी तेंव्हा जो संवाद झाला तो शब्दांच्या पलिकडचा होता. माझी गाडी तिथेंच सोडून दिली.(ती दुसऱ्या दिवशी कंपनीच्या तंत्रज्ञाने आणली)
मी त्यांच्यासोबतीने सुखरूप परत आलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेंच खरे.
Tuesday, April 17, 2007
आखाती मुशाफिरी
’वाळूचे वादळ असेही एक’ या लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहून मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशातील माझे आणखी कांही अनुभव लिहिण्याला हुरुप आला.
-----------------------------------------------------------------------
राक्षसांशी मैत्री-
दोहा-कतार हा देश ब्रिटीशांच्या जोखडातून नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या जोखडाखालील हा देश खूपसा मागास होता. किंबहुना ब्रिटीशांनी तो मागासच कसा राहील याचीच काळजी घेतली होती. तेच त्यांच्या मतलबाचे होते. थोडयाफार फरकाने भारताच्या बाबतीत असेच घडले होते. भूगर्भातल्या तेलाने देशाला महामोर संपत्ती मिळवून दिली होती. आता गरज होती ती साधनांची, पायाभूत सुविधांची. यांत स्वकीयांचा (नेटीव्ह) उपयोग तसा नगण्य होता. याचे कारण मागासलेपण तर होतेच पण वेगाने सुरु झालेल्या संपत्तीच्या ओघाने आणि पैसा फेकला की जगात कांहीही विकत घेता हे समजल्या मुळे लोक आळसावले होते. चैन, ऎशोआराम यालाच चटावले होते. मग पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अन्य देशातून तंत्र, तंत्रद्न्य, मनुष्यबळ आयात करणे क्रमप्राप्तच होते. उच्च तंत्रासाठी युरोपीय देश आणि तंत्रद्न्य, कुशल कामगार, मनुष्यबळ या साठी भारत, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणीस्तान वगैरे आशियाई देश हा तरणोपाय झाला. भारत त्यातले त्यात प्रगत देश म्हणून जरा अधिक महत्व मिळाले. भारतातून केवळ भारवाहू, केवळ कष्टाची कामें करणारे फार कमी गेले. गेले ते कुशल कारागीर. पण मग कष्टाची कामें करणारे मजूर लागणारच. त्या कामासाठी निवड झाली ती धिप्पाड, काटक, अफगाणी पठाणांची, ज्यांची बौद्धिक क्षमता, पातळी अप्रबुद्धच असायची. विनोदाने आपण ’मल्लभेजा’ म्हणतो तसे. या लोकांकडून कामे करून घ्यायची म्हणजे फार अवघड. वृत्तीने अत्यंत रासवट, भडक माथ्याचे, अरेबिक आणि पुश्तु शिवाय भाषा माहिती नाही. त्यातही अरेबिक पेक्षा पुश्तुचाच प्रभाव अधिक. बोलायला लागले की चार सहा अरेबिक शब्दांनंतर पुश्तु सुरू व्हायचे. आधी अरेबिक समजायचीच मारामार त्यात पुश्तु म्हणजे ’कानडीने केला मराठी भ्रतार’ याहून भयंकर. माझे अरेबिक म्हणजे ’व-हाड निघालय लंडनला’ मधल्या बबन्याच्या इंग्रजी सारखं. त्यामुळे अशा पठाणांशी संबंध कधीच येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत असे. पण देवालाही एखादा ’मिस्ड् कॉल’ गेला असावा आणि एका सुप्रभाती ते संकट दत्त म्हणून् पुढे उभं येऊन ठाकलंच.
आमची कंपनी म्हणजे वर उल्लेख केला त्याप्रमाणे पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रकल्पातील बांधकामापासून ते वीज-पाणी-वातानुकूलित करणारी संयंत्रे इत्यादि बहुविध सेवा पुरविणारी म्हणजे अगदी इमारतीचा पाया खणण्यापासून ते अगदी न्हाणीघरातील शेवटचा नळ बसवून देण्यापर्यंत सेवा परविणारे अवाढव्य आस्थापन होते. त्यात अनेक निरनिराळे विभाग होते. आपत्कालीन परिस्थीतीत कर्मचा-यांची तातपुरती बदलीही होत् असे. असेंच एकदा मला माझे विहित काम सोडून
एका दूरच्या कार्यस्थळावर वीज-वाहिनी (केबल) जमीनेखाली टाकण्याचे काम करणा-या अफगाणी मजूरांच्या जथ्थ्यावर देखरेख करण्याची, त्यांच्याकडून् काम करून घेण्याची कामगिरी सोपवली गेली. त्या कामाचा प्राधिकारी (इनचार्ज) अचानक दुसरीकडे आणि मी त्याच्या जागी अशी योजना झाली.
या नवीन कामगिरीचा भार (चार्ज) मला देणारा प्राधिकारी पाकिस्तानी होता. भरभक्कम शरीरयष्टीच्या आणि अरेबिक, पुश्तु सकट इंग्लीश, फ्रेंच इत्यादि भाषा लीलया बोलू शकणा-या या माणसाने माज्या डाळ-भात्या शरीरप्रकृतीकडे अतीव करुणार्द्र नजरेने पाहात, आस्थापनेच्या अशा बिनडोक निर्णयाबद्धल केवळ ’अफसोस’ या एकाच पण अत्यंत परिणामकार शब्दात नापसंती व्यक्त करीत मला कार्यभार दिला आणि याच्या कांही मौलिक सूचनाही दिल्या. त्याही विलक्षण होत्या. तो म्हणाला,
" हरून, (इथे माझ्या अरुण या नावाचा असा अपभ्रंश झालेला होता) त्या माणसांना माणूस म्हणशील तर खुदाही कदाचित नाराज हॊईल. अगदी राक्षस आहेत ते. तुला नवल वाटेल पण जुन्या इंग्रजी सिनेमात गुलामांना जसें हंटरने मार मारून कामाला लावलेले दाखवलेले असायचे तसें करावे लागते. तू तिथे गेलास की माझ्या टेबलावर तुला एक वेताची काठी दिसेल. ती तुला हातात घेऊनच फिरावे लागेल. तुझ्या हातात ती काठी नसली तर ते कदाचित संधी साधताच तुला मारायलाही कमी करणार नाहीत. परमेश्वर तुझं रक्षण माझ्या मित्रा !" असं म्हणून तो माझा नवा मित्र (!) माझ्या उरांत धडकी भरून गेला. त्या रात्री मी माझ्या पत्नीला जे पत्र लिहिले त्यात हे सारे लिहिले पण सकाळी पत्र फाडून टाकले आणि कामाला निघालो.
कार्यस्थळावर पोहोचलो तर तिथे आमच्या विभागाचा ’मुदीर’ (मॅनेजर) माझ्या आधी हजर झालेला. अदमासे चाळीसेक पठाणांचा जथ्थाही जवळच उभा होता. मुदीर मला कामाचा तपशील इंग्रजीतून् समजाऊन सांगत होता त्यावेळी हे पठाण आमचे संभाषण कुतुहलाने ऐकत होते, आपसात काहीं कुजबुजतही होते हे माझ्या ध्यानात् आले. मुदीरचा वेश, तोकडी तुमान-टीशर्ट असा कांहीसा अमेरिकन वळणाचा होता, भाषेचा लहेज़ाही तशाच वळणाचा होता.
मुदीर त्याचे काम आटोपून ताड्कन् गेला आणि मी ’सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुच्यति’ अशा अवस्थेत त्या आर्यावर्ती महाजनांना सामोरा गेलो. मी कांही शब्द उच्चारायचा क्षणाचाही अवधी न देता त्यापैकी एकान मला पुश्तु भाषेत एक भले मोठे वाक्य ऐकवले. तो माझा परिचय करून घेण्याला उत्सुक असावा, कदाचित तो माझ्या देशाबद्धल कांही विचारीत मला वाटले. कारण त्याच्या बोलण्यात एकदां ताजमहाल असा शब्द आला होता. भारताबाहेरील ताजमहालाबाबतचे कुतुहल मला माहिती होते. जरा संभ्रमित अवस्थेत मी ’ हैवा !’ (होय) असें म्हणून् गेलो मात्र, सगळे पठाण गडबडाटी हसायला लागले. कांहींना हसूं इतके आवरेनासें झाले की ते हात वर करून नाचू लागले. एक नक्की समजलं की त्यांनी माझी मस्त खिल्ली उडवली होती. भांबावून मख्ख उभे राहण्यापलिकडे मी कांही करू शकत नव्हतो. इतक्यात एका उंच माणसाने आपला उजवा हात उंच केला त्यासरशी बटण बंद केल्या नंतर विजेचा सिवा बंद व्हावा तसा तो हास्यकल्लोळ थांबला आनि तो इसम माझ्या रोखाने पुढे सरकला. माझ्या पुढ्यांत उभा ठाकून त्याने सवाल ठोकला,
"अन्ता अमरीकी ?" प्रश्न मला समजला आणि
"लॅ, अना हिन्दी ! " उत्तर निघून गेलं.
कां कोणास ठाऊक त्या म्होरक्याच्या चेह-यावर मघाशी कांहीसा तिरस्कार दिसलासा वाटल होता तो निवळल्या सारखा वाटला. किंचितसे स्मित मुद्रेवर उमलवीत त्याने
"अस्सलाम-व-आलेकुम !" म्हणत हस्तालोंदनासाठी हात पुढे केला. ती तेथील सर्वसामान्य प्रथा आहे हे मला माहिती होता आणि
"व-आलेकुम अस्सलाम" म्हणत मी त्याच हात हातात घेतला. त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला त्या वेळी समजला नव्हता. तो नंतर कळाला
क्रमश:
त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला समजला नव्हता. तो नंतर कळाला.
----------------------------------------------------------------------
त्यानंतर तो माणूस चक्क मला समजेल अशा भाषेत बोलू लागला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.
" मुआफ करना रफिक. पठानको अमरीकी बिल्कूल नापसंद. हरामी हमारा मुलुक बरबाद किया. तुम हिन्दी, या हबीबी ! हमारा दोस्त! इंद्रा (इंदिरा गांधी) हमारा दोस्त! मा फिकर." (काळजी करू नको)
जिवात जीव आला. पठाण मोडकं तोडकं कां होईना पण मला समजेल असं उर्दू बोलू शकत होता. त्यांचा अमेरिकेवर राग होता हेही लक्षात आलं. तो स्वाभाविक असावा. कारण आंतराष्ट्रीय राजकारण थोडेफार सामान्यपणे मला महिती होते. महासत्ता बनण्याच्या हव्यासापायी अमेरिकेने इराण. इराक, अफगाणीस्तान अशा अनेक मुस्लिमी देशांत हस्तक्षेप केला होता. त्या कारवाईमुळे तेथील जनतेला नाहक भीषण परिस्थीतीला सामोरे जावे लागले होते. कायमची युद्धसदृष परिस्थिती, अतिरेकी तालिबानींना आधी दिलेले प्रोत्साहन आणि नंतर त्यांचीच झालेली होरपळ हे मी वर्तमानपत्रातून वाचले होते. मी संभाषण वाढवायचं ठरवलं.
" मेरा नाम हरून. इधरका रब्बानी साब दूसरा कामपे गया. अब हम काम देखेगा. तुम हमारी मदद करेगा." नकळत मी त्याचीच भाषा बोलू लागलो.
"लाज़ीम,लाज़ीम रफिक" (अवश्य,अवश्य मित्रा) त्याने मला दिलासा दिला आणि नंतर बाकी पठाणांना संबोधून पुश्तु भाषेत कांहीतरी ओरडला. त्या सरशी तो जथ्था कामाच्या दिशेने सरकू लागला. पण तरीही बरेचसे पठाण मंद गतीने सरकत होते. मागे वळून वळून पाहात होते. आपसात कुजबुजत होते. जमीनीत चर खोदणारी चारचाकी ट्रॅक्टरसारखी यंत्रे सुरु झाली होती. भला मोठा केबलचा रीळ एका यंत्रावर ठेवलेला होता कांही पठाण ते यंत्र चालु करत होते. त्यावर स्वार होत होते. जवळच कार्यस्थळावरचे चाकावरचे कार्यालय होते.(मोबाईल पोर्टा कॅबीन) तिथे जाऊन मला रेडिओ फोनने मुख्यालयाला रिपोर्ट करावयाचा होता. मी त्या दिशेने वळणार इतक्यात असलेला प्यून माझाच दिशेने पळर्त आला आणि रेडिओ वाजत असल्याचे ओरडून सांगू लागला. मी धावतच केबीन गाठली आणि काम सुरु झाल्याची खबर देउ लागलो. ’कांही अडचण तर नाही ना?’ या पुन्हा पुन्हा विचारला गेलेल्या प्रश्नाला माझे ’नाही’ हे उत्तर मुदीरचे समाधान झालेसे वाटले नाही. पण मग ’सध्या तरी कांही समस्या नाही’ असे म्हणालो तेंव्हा रेडिओ बंद झाला. प्यूनने एव्हाना थंड पाणी आणि कॉफीचा कप समोर ठेवलेला होता.
कॉफी संपवून कामाच्या आखणी-आलेखावर(प्रोग्रॅम चार्टवर) नजर टाकू लागलो. तेथील सारी कामे फार सूत्रबद्ध असतात, आलेखाप्रमाणे आमलात आणावीच लागतात. इथे तर काम चार दिवसांनी मागे पडलेले दिसत होते. तो बाजूला सारून मी कामाच्या ठिकाणावर जावे म्हणून केबीनच्या बाहेर पडलो तर मघाचा तो पठाण म्होरक्या समोर हजर आणि तिकडे मंडळी काम सोडून निवांत गप्पा छाटत बसलेली तर कांही शिवाशिवासारखा खेळ खेळण्यात गढलेली. त्या म्होरक्याला मी कांही विचारणार इतक्यात तो तीरासारखा कॅबीन मधे शिरला, टेबलवरील ती वेताची छडी घेऊन त्या कामचुकार कामगारांवर धावत गेला आणि एकेकावर छडीचे वार करू लागला. मी सर्द होऊन पाहातच राहिलो. कांही पठाणांनी आपसात झोंबाझोंबी सुरु केली. मात्र कांही मिनिटातच, तो म्होरक्या पठाण मेंढपाळाने मेंढरं वळावीत असा आरडाओरडा करीत पळापळ करीत पठाण वळित होता आणि काम सुरु झालेलं होतं. सकाळपासून जे कांही पहिलं होतं, अनुभवलं होतं त्याने डोकं गरगरायला लागलं होतं.
क्रमश: -
आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?
------------------------------------
दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.
नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला,
" पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो,
" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे).
नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.
टळटळीत उन्हात मी कामाची देखरेख करू लागलो. डोक्यावर फेल्ट हॅट, कमरेला ती काठी तलवारी सारखी खोचलेली. त्या अवतारांत माझा फोटो काढला गेला असता तर करमणूकीला एक विषय झाला असता. मी, केबीन मधे न जाता कामाची पाहाणीच करीत राहण्याचे ठरविलेले होते.
यंत्राच्या साहाय्याने जमीनीत चर खोदायचा, चराच्या तळाशी सीमेंटच्या विटांची ओळ मांडायची, त्यावर केबल ओढून घ्यायची, तिच्यावर आणखी एक विटांचा थर द्यायचा आणि बुलडोझरने वर माती (वाळूच) लोटायची. लोटलेल्या मातीवरून रोलर फिरला की झाले काम. ही सारे एका क्रमाने चालायचची. खोदकाम करणारे यंत्र पुढे चालायचे, त्या मागून केबलचा रीळ असलेली गाडी, तिच्यामागून तळाशी विटा मांडणारे मजूर, मांडलेल्या विटांवर गुरुत्वाकर्षणाने पडत जाणारी केबल, त्यावर दुसरा विटांची ओळ मांडणारे मजूर, त्यानंतर माती ढकलणारा बुलडोझर आणि सरते शेवटी माती दाबणारा रोलर. या क्रमात जराही खंड पडला तरी सारे काम ठप्प व्हायचे. कामचुकार पठाण ही सांखळी खंडित करण्याचा प्रयत्न करीत आणि सारे काम ठप्प झाले की आराम, मौज करीत.
जेवणाच्या सुटीला एक तास रहिला होता इतक्यात केबल सोडणारी/ओढणारी गाडी बंद झाली. चालवणारा इसम मोठ्या मोठ्याने ओरडा करत खाली उतरला. मातीत गडाबडा लोळू लागला. मी त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत गदारोळ झालेला. जो तो पुश्तु भाषेत आरडत होता. गडाबडा लोळणारा मजूर पोटदुखीने विव्हळत होता असे समजले. मी त्याला माझ्या केबीनमधें नेण्याचा हुकूम सोडला. इतक्यात नुरूल माझ्या कानाजवळ " जूठा तमाशा करता है हरामी" असें कांहीसे पुटपुटला. मी साईटवरच्या ट्रक ड्रावव्हरकडे माझा गाडीची चावी फेंकत त्या पोटदुख्या पठाणाला इस्पितळांत घेऊन जायला सांगितेल. आणि ’ चला कामाला लागा परत ’ अशा अर्थाने जोरात ओरडू लागलो. अचानक चेहरा पार उन्हाने करपलेला, आडदांड असा पठाण माझ्यासमोर उभा ठाकला. हातवारे करत तावा तावाने कांहीतरी सांगू लागला. मी चमकून नुरुलकडे पाहिले. नुरुल पुढे येऊन सांगू लागला, त्या पोट दुखी झालेल्या मोईनचा हा भाऊ आहे आणि त्याला इस्पितळात पाठवल्यामुळे तो संतापला आहे. इस्पितळात गेलेल्या माणसाचे नांव मोईन आहे इतके समजले, पण याला कां राग आला ते नाही समजले. पण माझ्या दृष्टीने योग्य वाटले ते मी केले यात मला तरी शंका नव्हती. मला तो वाद नकोच होता. मला काम पूर्ववत चालू कसे होईल याची काळजी होती. पण या गोंधळात जेवणाची सुटी झाली आणि सारा जथ्था ’ हैया हो ’ अशा गर्जना देत ट्रक मधे बसून जेवणासाठी लेबरकँपवर गेला. माझी त्यांनी टर उडवली हे नक्कीच. मोईनची पोटदुखी खोटी होती, काम टाळण्याचा बहाणा होता हे समजलं होतं. मी खजील झलो होतो. मुख्यालयाला हा सारा प्रकार कळवावा आणि काम पुन्हा सुरू होई पर्यंत विसावा घ्यावा म्हणून केबीनकडे वळलो आणि या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार करू लागलो.
केबिनमध्ये पोहोचतो न पोहोचतो तोंचा रेडिओ फोन घणघणला. फोन रब्बानीचाच होता. कामाची प्रगती विचारत होता. त्याचे बरोबर होते, खरा प्राधिकारी तोच होता. माझी नेमणूक तशी तात्पुरतीच होती. मी काम व्यवस्थित चालले आहे असे सांगितले. कारण त्याच्या विचारण्यात कांही खोच असावी असें वाटून गेले. त्याला लेबरकॅंपवरून कांही खबर लागली असण्याची शक्यता होती. पण त्याचे बोलणे इतर विषयाकडे वळले तसा मी सुस्कारा सोडला. त्या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार आता मागे पडला. कांहीही करून काम सुरळीत चालणे महत्वाचे होते.
तीन वाजतां कामगारांची गाडी येऊन दाखल झाली तसा मी त्यांना सामोरा गेलो. ते आपापसात बोलत उभेच होते. मी काम सुरू करण्याचा इशारा दिला त्यासरशी तो मोईनचा भाऊ माझ्या पुढ्यात येऊन गरजला,
" क्या काम करेगा ? मकिना क्या तेरा बाप चलाएगा ?"
(म्हणजे यालाही उर्दू येत होते) त्यासरशी नुरूल त्याच्यावर धांवला. बाकी पठाणांमधे हंशा पिकला होता. मी नुरूलला हातानेच शांत रहाण्याचा इशारा केला. शांतपणे त्या पठाणाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो,
" मकिना तेरा बाप चलाएगा! बर्रा (चालता हो)! जाव अपना काम शुरू करो" असें म्हणुन मी त्या यंत्राच्या दिशेने सरकलो. आता मी कुणाकडे पाहातही नव्हतो. सरळ त्या यंत्रावर चढलो, चालकाच्या जागेवर बसलो आणि यंत्र चालू केले. मगच वर पाहिले. भयचकित झालेले पठाण लगबगीने कामाला लागत होते. तो पर्यंत मी त्या यंत्राच्या आवश्यक त्या कळा दाबून ते मला नीट चालावता येते की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या सायंकाळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याने तोपर्यंत बिनबोभाट काम झालेले पाहिले.
काम संपवून लेबरकँपवर जाण्यासाठी गाडीवर चढण्यापूर्वी तो उग्र पठाण पुन्हा माझ्यासमोर ठाकला आणि म्हणाला,
"याद रक्खो, तुम पठानका बच्चाका चालीन किया. कल देखेगा. तुम क्या साबूत रहेगा और क्या काम करेगा. खुदा हाफीज़ !"
पण मी इतका थकलो होतो की तो नक्की काय म्हणाला त्याचे आकलन होण्या पलिकडे गेलो होतो.
ते मला उद्या कळणार होते. ' चालीन ' म्हणजे काय तेंही समजणार होते.
क्रमश:
--------------------------------------------
तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.
पठाणांचा जथ्था माझ्या स्वागताला उभाच होता. तो कालचा पठाण सामोरा आलाच." कैफ हालुक मुदीर ?" चेह-यावर एक प्रकारचे छ्द्मी हास्य ठेवीत त्याने विचारले." झैन ! अल हमदुल्लिलाह " मी कोणताही कडवटपणा न ठेवता म्हणालो."वल्लाह ! अस्सलाम-व-आलेकुम !" तो. त्याचा संस्कार जागा झाला असावा.
" व-आलेकुम अस्सलाम. लेकिन तुम अपना नाम नही बोला !" या माझ्या वाक्यासरशी
" हम कादर खान ! " तो उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर एक दिलखुलास हास्य पसरलेले दिसले. कालच्यापेक्षा आजचा दिवस कमी कटकटीचा असावा याची ती नांदी आहे की काय असे मला वाटून गेले. मी संभाषण पुढे चालू ठेवले.
'' कादरखान, कल हमने पाठानका बच्चाको चालीन किया ऐसा तुम बोला. वो चालीन का मतलब ?''
''चालीन का मतलब.....मतलब....'' तोही घुटमळलाच. मग मलाच सुचलं;
''चॅलेंज ??''
''वल्लाह ! दुरुस्त. एकदम दुरुस्त.'' त्याच्या या उत्तरासरशी कांही पठाण एकाएकी
फेर धरून नाचू लागले. मला एक शब्दही न कळणाऱ्या भाषेत गाऊ लागले.
एका एकी हे काय चालले आहे? मी हबकूनच गेलो.
हा काय प्रकार आहे, मी नुरूलला विचारले. तो हसत सांगू लागला, कादरखान मला धडा शिकवण्याचा चंग बांधून आला होता. सुरुवातच तो मारामारीने करणार होता. पण देव दयेने ती वेळ आली नव्हती. सुरुवात छान संवादाने झाली होती आणि कादरखान निवळला होता. राक्षसातील माणूस जागा झाला होता. मारामारी झाली तर ती कांही जणांना नको होती. ती झालेलीही नव्हती. त्यामुळे तो गट आता सुखावला होता. अशा वेळी आनंदाने गाण्याची, नाचण्याची त्यांची ती प्रथा होती.
मी अनेक प्रकारच्या माणसांत वावरलो. अनेक चित्रविचित्र अनुभव घेत गेलो. त्यांत ही आणखी एक भर. या माणसांना मी गुलामा सारखे वागवावे असा मला सल्ला देण्यात आला होता. तसेंच वागावे लागते की काय अशी परिस्थितीही समोर आली. पण कुठे तरी आंत, माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती. म्हणून मला माणसांबद्धल कणव होती. किंवा मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. एक मात्र निश्चित होते. ते म्हणजे माझ्यावर सोपविलेले काम मला व्यवस्थित झालेले पहायचे होते. मला दिलेले काम मी नीट करू शकलो नाही असे यापूर्वी कधी झालेले नव्हते आणि आताही तसें व्हायला नको होते.
साईटवर कामाची सुरुवात झाली होती. केबलच्या यंत्रावर स्वत: कादरखान बसला होता.
याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी तिथे येण्याच्या आधी फार पूर्वीपासून काम चालू होते. कादरखानच काय पण आणखीही चार सहा जणांना ती सगळीच्या सगळी यंत्रे चालवता येत असणारच.
’अथा तो ब्रह्मजिद्न्यासा’ हे काय फक्त हिन्दुस्थानीच म्हणू शकतात काय?
प्रत्येक काम मला आलेच पाहिजे हा अट्टाहास करणारा मी काय एकटाच असूं शकतो काय?
मी केबीनमधे जाऊन किती काम झाले, किती बाकी आहे याची उजळणी करून घेतली आणि सरळ कादरखान जवळ जाऊन बसलो. आजवर कोणी अधिकारी असा काम करणाऱ्याजवळ बसला नसावा. तो आधी थोडा संकोचला पण नंतर सैलावला. मग
'' यल्ला! यल्ला !! रफिक. यल्ला, जल्दी, जल्दी !'' असे इतर कामगारांवर ओरडून
कामाला चेव आणू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. मी मोईनची कांहीच खबरबात घेतलेली नव्हती. पण त्याने घेतलेली होती. सांगू लागला तो त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने काल नाटक केले होते. पण त्याला खरेंच पोटदुखीचा त्रास होता. दवाखान्यात जाण्याची परवानगी अनेकदां मागितली होती पण दिली गेलेली नव्हती. पठाण माणूस म्हणून वागवले जात नव्हते आणि म्हणून ते माणसांसारखे वागत नव्हते. हे दुष्टचक्र संपणार की नाही, हा त्याचा प्रश्न होता.
हे असे सुखेनेव चालले काम साधारण चाललेले काम पुन्हा अचानक थांबले तेंव्हा
जेवण्याच्या सुटीला जेमतेम एक तासच उरला होता. कालही काम याच वेळी बंद झाले होते. हा काय प्रकार आहे. यंत्र बंद करून मी आणि कादर खाली उतरून पहातो तो,
दूरवर, बुलडोझरपाशी पठाणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी लागलेली. एकाने दुसऱ्याची कांही खोडी काढली होती आणि मस्करीची कुस्करी झाली होती. प्रकरण नुसतेच हातघाई वर आलेले नव्हते तर दोन चार जण चांगले रक्तबंबाळ झाले होते.
मला आता मात्र वैताग आला. उद्वेगाने मी केबीनकडे कूच केले आणि हे असें याच वेळेला कां होते याच विचार करू लागलो.
कदाचित या वेळेला ऊन इतके तापते त्या मुळे माणसे प्रक्षोभक होत असावीत. कामाची वेळ थोडी बदलता येइल कां? सकाळी सहा वाजता काम सुरु केले तर कांही फायदा होईल का? मी कामाचा आंखणी-आलेख आणि झालेले काम पडताळून पाहिले. कामाच्या वेगात थोडी सुधारणा होती पण एकुणात काम मागेच होते. मी मुख्यालयाशी बोललो. पण कामाच्या वेळेत बदल करण्याची परवानगी मिळाली नाही.
दरम्यान कामगार जेवणाची सुटी संपवून परत कामावर आलेले होते. मी नुरुलखानला, त्याच्या जागी आणि कादरखानच्या जागी दुसरी माणसे लावून, आणखी दोन शहाणी माणसे घेऊन केबीनमध्ये येण्यास सांगितले. थोड्याच वेळात खरोखर चार डोकी केबीनमध्ये हजर झाली. जणू मी एक लहानशी बैठक घेत होतो.
सगळ्यात आधी मी त्यांचे काम छान चालले आहे, मला कांही तक्रार नाही असे
सांगून एकूण कामाची व्याप्ती, झालेले काम आणि राहिलेले काम याची माहिती दिली. उरलेले काम किती दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे हेही विषद केले आणि काय करता येईल या बाबत त्यांचेपाशी कांही सूचना असतील तर त्या द्याव्यात अशी विनंती केली. हा सारा प्रकार त्यांना नवीन होता. योजना प्रक्रियेत त्यांच्या सारख्या मजूरांनाही सहभागी करण्यात येत आहे याचे त्यांना नवल वाटत होते आणि कौतुकही.
कांही मिनिटे त्यांनी खालच्या आवाजात पुश्तुमधे कांही चर्चा केली ती मला समजली नाही. मात्र सरते शेवटी कादरखान म्हणाला,
"इन्शा अल्लाह, एक तरकीब हो सकती है. लेकीन हम सोचेगा. कबिलाके साथ बात करेगा. कल बताएगा. झैन ?''
मी म्हणालो
"झैन !" चालेल.
नियोजन प्रक्रियेत कामगार प्रतिनीधींना सहभागी करून घेण्याचा हा माझा मार्ग मला पुरोगामी वाटला तरी त्याचे परिणाम काय होतील याचा तो पर्यंत तरी मी नीट विचार केलेला नव्हता.
आता कादरखान उद्या काय ’तरकीब’ सुचवतो ते पहायचे होते.
ते मला उद्या कळणार होते.
------------------------------------------------------------------------
कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.
त्यानंतरच्या सकाळी मी कामावर दाखल झालो तेंव्हा ही अशी चलबिचल, काहूर मनांत घेऊनच. कादरखान मनात काहीं तरकीब घेऊन आला होता हे मला त्याच्या उजळलेल्या चर्येवरून दिसत होते. पण मात्र चर्चेसाठींसुद्धा एक मिनिटही वाया घालवण्याची माझी तयारी नव्हती. सर्वांना मी आधी कामाला लागण्याचा आदेश दिला. कादरखान तेवढ्यातही मला कांही सांगू पहात होता. पण मी त्याला ’शुई सबर’ (जरा थांब) असा इशारा दिला. सगळ्या जथ्थ्यामधे ती चर्चा झालीही असावी. कारण उत्सुकतेची अस्फुट रेषा मला जवळ जवळ प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मी पण मी कामाचाच 'यल्गार' केला आणि सारे बिनबोभाट कामाला लागलेही. आज मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळापळ करून कामावर देखरेख करणे पसंत केले. आज कुणी कालच्यासारखी गडबड करू धजावला तर त्याला वेळीच खीळ घालण्याचा माझा अंतस्थ हेतू होता. ठीक अकरा वाजतां (बरोबर जेवणाच्या एक तास आधी)मी काम बंद करण्याचा इशारा दिला. सारा जथ्था अचंभ्यात आणि मी, तोपर्यंत एकही मिनिट वाया न घालवता, जितके काम व्हायला हवे होते ते झालेले आहे या समाधानात!
कांही कामगार इकडे तिकडे पांगले. मात्र कादरखान, नुरुलखान आणि आणखी साताठ जण घोळका करून, दबक्या आवाजात चर्चा करीत उभे. त्यांना केबीनकडे येण्याचा इशारा देऊन मीही केबीन कडे वळालो. कालचे चार आणि आज अधिक दोघेजण असे सहाजण केबीनमधे आले. सर्व प्रथम मी शीत्कपाटातून एक पाण्याची बाटली काढून त्यांच्या रोखाने भिरकावली आणि दुसरी घेऊन मी खुर्चीत बसलो. माझी आणि सगळ्यांचे पाणी पिऊन झाल्यावर,
'' हां, बोलो खान '' म्हणत मी सुरुवात केली.
'' साब, धूपका बहोत तकलीफ. एक तरकीब ये के सुबह येक घंटा जल्दी छूटेगा. जो (जैसे) आज छूटा.. और शामको येक घंटा जियादा काम कुबूल.''
म्हणजे उन्हाचा त्रास होतो हा माझा अंदाज बरोबर होता.
'' लेकिन खान, ये नामुमकीन. मुदीर नही मानेगा. मकतब (मुख्यालय) नही मनेगा.''
'' तो फिर येक बाकल कम करो '' बाकल म्हणजे (ब्लॉक) सीमेंटच्या विटा.
'' मतलब? हम समझा नही !''
'' साब, जमीं कुल्लुश सखत. नीचे बाकल लाज़मी नही''
जमीन कडक असल्याने केबल खालील विटांची गरज नाही. असं त्याला म्हणायचं होतं. बरोबर आहे. ते काम कमी झालं तर वेळ वाचणार होता आणि एकूण कामाची गती वाढण्यासारखी होती. पण हा निर्णय मी कसा घेणार ? कामाची प्रमाणें (स्पेसीफिकेशन्स) बदलणे माझ्या अधिकारांत येत नव्हते. मी म्हणालो,
'' खान, येभी नामुमकीन. तुमको मालूम, ये सब गोरा (ब्रिटिश डिझायनर) मख्ररूर किया. हम के करेगा.''
'' साब ये सब पहले नही होता. रब्बानी चालु किया. ''
'' लेकिन ये सब यूं नही हो सकता. कागज़, फतुरा देखना होगा. हम दरख्हास्त करेगा. लेकिन तबतक तुम्हारा पहला तरकीब हो सकता.''
'' तो करो. हम तैयार. '' 'तो करो' म्हणण्याची त्याची लकब माजेशीर होती.
'' लेकिन मुदीरके साथ बात करना लाज़मीं है.''
'' तो करो.''
ते सगळे जेवणासाठी लेबरकॅंपकडे रवाना झाले. विटांचा तळाचा एक थर गाळणे हा उपाय मंजूर होण्या सारखा नव्हताच. कामाच्या वेळा बदलणे याचा विचार करणे शक्य होते. पण मुख्यालयाच्या गळी ही गोष्ट उतरवायची तर समक्ष जाणे गरजेचे होते. फोनवर बोलणे औधत्त्याचे मानले जाण्याची शक्यताच अधिक. मी मुख्यालयाला फोन करून अडचणीची त्रोटक कल्पना दिली आणि भेटीची वेळ मागितली. ते लगेच या म्हणाले. एव्हाना दोन वाजले होते. तीन वाजतां पठाण परत कामावर येणार आणि मी जागेवर नाही हे पाहून मौज मस्तीच करणार. कारण मी तीनच्या आंत परत येणे शक्यच नव्हते.
क्षणभर विचार केला, गाडी काढली आणि सरळ लेबरकँप गाठला. मी तिथे पोहचलो तों पठाण गाडीत (ट्रक) चढतच होते. मला पाहिल्याबरोबर जे खाली होते त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे केले. हा बाबा असा इथे कसा उपटला याचे नवल प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. कादरखान गाडीजवळ आलाच. मी मुख्यालयाशी बोलून परत येत आहे तोपर्यंत काम चालूच राहिले पाहिजे; ती जबाबदारी त्याची. असे बजाऊन मी मुख्यालयाकडे मोहरा वळवला. मुख्यालयात सर्वप्रथम मी साईट सोडून आलो त्याबद्धल खरडपट्टी झाली.
माझ्या आखातातील वास्तव्यात मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती. अधिकारी सहसा ब्रिटिश असत आणि आम्हां भारतीयांना झापायची, तासायची एकही संधी ते सोडीत नसत. मग कर्तृत्वाच्या नावाने ते स्वत: शून्य कां असेनात. हे देश एकेकाळी त्यांच्या वसाहतीत, त्यांच्या अधिपत्त्याखाली होते. पुढे इतका अवाढव्य व्याप सांभाळणे अशक्य झाले आणि भारतापाठोपाठ बहुतेक वसाहतीत स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे या देशांना स्वायत्तता द्यावीच लागली. तरी पराभवाचा तो सल प्रत्येक गोरा मनांत ठेऊन असे. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रभुत्व दाखवले होत. सिद्ध केले होते म्हणून ते जरा वचकून होते. पण एखादा कमकुवत दुवा दिसला की ते ’ब्लडी इंडियन, ब्लडी निग्गर्स’ म्हणून हेटाळणी करण्यात भूषण मानीत.
मुख्यालयातील चर्चा असफलच झाली. स्पेसीफिकेशनमधे तळाचा विटांचा थर पूर्वी नव्हता पण रब्बानीने, केबलला मातीत खाली झोळ (सॅग) अशी भलतीच भीती घालून ती सुधारणा आमलांत आणून शेखी मिरवलेली होती. हे तो स्टीव्ह मेकॅन्झी नावाचा गोरा मान्य करत होता पण मला पूर्ववत बदल करूं द्यायला तयार नव्हता. कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभाही नाकारण्यात आली.उलट काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली गेली. निराश मनाने मी साईटवर परतलो. वाटेत साईटवर तरी काय उजेड (!) पडला असेल या चिंतेत होतो.
साईटवर पोहोचतो आणि पाहातो तो काय !
क्रमशः
साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !
-------------------------------------
तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान मुद्रेने उभे.
मी आधी सगळ्यांना जरा दूर् एका जागी व्हायला सांगितले. एकजण काय़ झाले ते मला विषद करण्यासाठी जरासा पुढे सरकला. मी त्याला हाताच्या इशा़ऱ्यानेच थांबवले. सूर्य मावळतीला अजून बराच वर होता. सेनापती सैन्याच्या तुकडीला सुचना देण्यासाठी जसा संमुख होतो तसा मी त्यांच्या समोर सूचना वजा भाषण देण्यासाठी उभा राहिलो.
" दोस्तो, एक अज़ीबो-गरीब हकीकत सामने आयी है. कोई तूफान परश्त इन्सानकी ज़मीनमें गढी हुई लाश या लाशके हिस्से हम देख रहे है. ऐसे रेगिस्तानमें ऐसा हादसा कोई नयी बात नही है. जो हालात, इन्शाल्ला, सामने आये है, उसको वाज़िब अंजाम दें ये हमारा फर्ज़ ....." माझे बोलणे मध्येच तोडत एक पठाण ओरडला,
" लेकिन हम क्युं मुरदाफरोशी करे ? क्या पता कौनसी कौमका है बदनसीब. क्या अंजाम देगा इसको. और ये काम हमारा नही. तुम शुरताको (पोलीस) खबर करो. "
मी भानावर आलो. देवाशपथ, त्या पठाणानाने मला एका नव्या संकटातून वाचवले होते. मी भलअत्याच् उत्साहात त्या अवशेषांचे दफन किंवा अन्य कांही वासलात लावण्याच्या विचारात होतो. कायदेशीर बाबीचा मला विसर कसा पडला याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. तो पर्यंत सुटीची वेळही झाली होती. पठाण आपसुक त्यांना नेणा-या गाडीकडे परतले आणि मी माझ्या केबीनकडे. मात्र कादरखान आणि नुरुलखानला मी मागे ठेऊन धेतले. पोलिसांना खबर करण्यासाठी मी रेडिओ फोन सुरु करणार इतक्यात कादरखानने भिवया उंचावत पृच्छा केली,
" शुरताको फुन करेगा ?" मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
".........."
" लॅ. मकतबको (मुख्यालयाला) इतिल्ला करो "
अरे, किती खरं होतं ते. कां मी इतका भांबावलो होतो ? की अशा मूलभूत चुका होताहेत हे ध्यानातच आलं नव्हतं? किती खरं होतं कादरखानचं बोलणं. मी कोण पोलिसाना खबर देणारा ? ती जबाबदारी माझी नक्कीच नव्हती. ही साईट, ही जागा कंपनीच्या अखत्यारीतली होती. या जागेच्या आवारात अशी कांही घटना झाली तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही कंपनीची जबाबदारी होती. माझी नव्हे. किती योग्य सल्ला दिला होता त्याने. आणि आम्ही या लोकांना अडाणी समजत होतो. सारासार विचार करण्याची पात्रता आणि सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता काय केवळ पुस्तकी शिक्षणानेच येते कां! कादरखानचा सल्ला मला मनोमन पटला. मी मुख्यालयाला फोन लावला. आज जुम्मेरात (गुरुवार), उद्या शुक्रवारची साप्ताहिक सुटी, त्यातून आता संध्याकाळ म्हणजे मुख्यालयात कुणी असेल की नाही शंकाच होती. तरीही अगदी योग्य माणूस फोनवर मिळाला. तो म्हणजे कंपनीचे सर्व विधी-व्यवहार (लीगल मॅटर्स) सांभाळणारा अधिकारी, हुसैनी! हुसैनी पूर्वी पोलिसातच होता. त्याला झालेली घटना सांगितली. तो म्हणाला निश्चिंतपणे घरी जा मी उद्या पहातो काय ते. माझा जीव भांड्यात पडला. कादरखान जर तेंव्हा तिथे नसता तर मी भलतीच बिलामत अंगावर घेतली असती हे नक्की.
माझे आणि हुसैनीचे झालेले बोलणे मी कादरखानला सांगितले तेंव्हा त्याच्याही चेह-यावर समाधान दिसले. हा एक विषय मार्गी लागला तसा त्याने मुख्यालयात काय झाले याची विचारणा केलीच. मी जे झाले ते सांगताच तो म्हणाला,
" मा फिकर. कुच सोचेगा. परसो बताएगा "
" क्या करेगा खान? काम तो होना दूर यहाँ मुसीबतेंही खडी हो रही है"
" तो क्या मायूस बैठेगा? खान कुच ना कुच करेगा. चलो बेत रो (घरी चला)"
एव्हाना चांगलं अंधारून आलेलं होतं. मी दोन्ही खान माझ्या गाडीत घेऊन शहराकडे निघलो. त्यांना कामगार-तळावर (लेबर कॅंप) सोडून घरी जाणार होतो. पण त्यांना सोडल्यावर खान जाऊ देई ना. थोडा पहुणचार घ्या. निदान सरबत तरी घ्या म्हणून हटून बसला. म्हणाला,
"वै (अहो) पठानका मेहमान लाखिदमत (पाहुणचार न घेता) जा नहीं सकता. जाएगा तो बिरादरी हमपर थूकेगा "
मी थक्क झालो. आणि आम्ही यांना जंगली, राक्षस समजत होतो. त्यांनाही संस्कृती असू शकते आणि तिचा त्यांना अभिमानही असूं शकतो याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती, म्हणून मला माणसांबद्धल कणव होती की मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. ही माणसे अडाणी आहेत हे दिसत होतेच. अफगाणीस्तानातील युद्धांमुळे, तालीबानी चळवळीची सुरुवात असली तरी, त्यांनी केलेली नासधूस, जनतेची झालेली ससेहोलपट मी टीव्हीवर, डॉक्युमेंटरीतून पाहिली होती. मुळात हा समाज मूलतत्ववादी, कर्मठ असला तरी ही माणसे बदलत्या, पुढारलेल्या जगाबरोबर कां चालत नाहीत? त्यांनाच इच्छा नाही की सत्तेवरील राजवट अशा सुधारणा घडूच देत नाही? या माणसांना असे रासवट वागण्यातच मौज वाटते की काय? ही खरीच राक्षसें आहेत कां? या माझ्या चिंतनाला इथे छेद जात होता. मी सरबत घेण्याचे मान्य केले तेंव्हा त्यांना झालेला आनंद पाहिला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो.
सरबत घेऊन झाले तर खान जेवून जा म्हणून आग्रह करू लागला. त्याला मात्र मी शक्य तितक्या नम्रपणे नकार दिला. खरी भीती निराळीच होती. मी शाकाहारी माणूस. ते मांसाहारा शिवाय दुसरं काही खात नाही असं ऐकलेलं. पण खानानं माझ्या मनांतली ती भीतीही हेरली असावी.म्हणाला,
" कोई बात नहीं हुजूर. कलकी दावत कुबूल करो. साग-खबूस (भाजी-भाकरी) खिलाएगा. कल जुम्मा. शामको तुम्हारा इंतजार रहेगा."
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?
क्रमशः
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?--------------------------------------------------------
शुक्रवार उजाडला.
जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली, अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच. साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते.
पठाणांचे सेनापतित्व स्वीकरल्यापासून झालेल्या शारिरीक आणि मानसिक श्रमाने गळाठा आल्यासारखे झाले होते. पण दूरध्वनीची घंटा घणघणली तसा पांघरूण भिरकावत उठावेच लागले. कोण तडमडला आता, म्हणत फोन घेतला तर दोनच शब्द ऐकायला आलेले. " येऊ कां? " लहान पणी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकतांना त्यातले एखादे भूत असेंच विचारायचे. त्यावेळी आजी खर्जातला असा कांही आवाज काढायची की काळजाचा एक ठोका चुकलाच म्हणून समजा. हा आवाजही तसाच होता. पण टरकी बिरकी वाटण्यातला नव्हता. उलट आज तरी वैतागायला लावणारा होता. " ये " म्हणण्याखेरीज गत्यंतर नव्हते. तो आवाज वश्या डोंगर-याचा होता.
लौकिकात या आसामीला वसंत गडकरी असें नामाभिमान होते. तो एकटाच येणार नव्हता सगळी ’परदेशस्थ सडेफटिंग युनियन’ माझ्याकडे धुडगूस घालायला येणार होती. वश्या त्या युनियनचा आद्य प्रवर्तक होता. त्याचं काय झालं की मी नवीनच जेंव्हा या देशांत आलो तेंव्हा फार हुरहुरल्यासारखं (होमसिक) झालं होतं. जागा, वातावरण, माणसे सगळंच नवीन. मुलांची, पत्नीची, घराची आठवण सतत मनांत जागती असायची. कुठून ही परदेशी येण्याचे अवदसा आठवली असं वाटत रहायचं. एकतरी मराठी माणूस बोलाचालायला मिळावा असं वाटायला लागलं. मी जरा तशी चौकशी केली तर एका केरळ्याने एका नॅशनल हॉटेल नावाच्या जागेचा पत्ता दिला.
परदेशस्थ भारतीयांचे एकमेकांची भेंट घेण्याची ते एक मेलनस्थळ (त्या केरळ्याच्या शब्दांत ’रान्देवू’) होते. एका शुक्रवारी मी अधिरतेने तिथे गेलो तर, एका रस्त्याला दोन फांटे फुटून इंग्रजी वाय आकारात झालेल्या रस्त्यांच्या बेचकीत एक टपरीवजा हॉटेल आणि त्याच्या बाहेर अनेक माणसें घोलक्या घोळक्याने गप्पा छाटीत उभी असलेली. मी जत्रेत चुकलेल्या माणसासारखा उगीचच इकडून तिकडे भटकू लागलो. इतक्यात, " काय मुंबईकर कधी आल्ले कतारले ?’ असा एक घणाघाती वैदर्भीय आवाज कानावर आदळला. आवाजाचा उगम, सदरा-तुमानीत बळेंच कोंबून बसवलेली असावी अशी एक देहयष्टी होती. मी मुंबईकर आहे हे या सदगृहस्थाला कसे कळाले असावे हा प्रश्न मला पडला पण भांबावण्या पलिकडे माझी दुसरी कोणतीही अवस्था होणे शक्य नव्हते. आणि मग ’ या इकडे ’ म्हणत त्या इसमाने माझा हातच धरला आणि एका घोळक्याकडे घेऊन गेला.
जवळपास माझ्याच वयाचे सहा सात तरूण गप्पा मारीत उभे होते. आम्ही जवळ जातांच एकाने विचारले, " काय गडकरी, पाहुणे कोण ?" " जांवय शोधायले आल्ले. पोट्टीये थ्यांची लग्नाची, करतोस ?" आणि त्यापाठोपाठ एक हास्यक्ल्लोळ. (इथे मला पुलंच्या रावसाहेबांसारखं ’हांग अस्सं’ असं ओरडावसं वाटलं) आपली नाडी, गण, गोत्र, प्रवर इथे बरोबर जुळणार याची खात्री झाली. पण मग विनोदाचा तास संपला आणि रितसर ओळखीचा कार्यक्रम झाला. पुढें अनेकदा नॅशनलपाशी गांठीभेटी आणि मग माझे निवासस्थान शुक्रवारी सहसा रिकामे असतें म्हणून ’अड्डा’ इथे जमायला लागला. त्यांतही त्यांनी सामग्री आणायची आणि पाकसिद्धी मी करायची असा कबुलिनामा होता. कारण त्यातले त्यांत सुगरणीचा स्वयंपाक मीच करू शकत होतो.
त्या जमावात नागपूरचा हा वश्या-वसंत गडकरी (त्याच्या आकारमानामुळे त्याला ’डोंग-या’ ही संज्ञा लाभलेली होती) होता, सोलापूरचा किशा-किशोर करपे होता, कुडाळचा पेशवा-माधव महाबळ होता, मुंबईचा श-या-शरद गांगल आणि कोण कोण होते. आता सगळी नांवे आठवतही नाहीत. पण त्या मित्र मंडळीनी मला जें कांही दिलं त्या आधारावरच मी तो तीन वर्षांचा वनवास सुखेनेव भोगला हे मात्र नक्की. एक एक करत अड्ड्याचा कोरम पूर्ण झाला. मी किती दमलो आहे ते न सांगताही कळत होते. भटारखानाचा ताबा वश्याने घेतला. वडाभात करतो म्हणाला. किशोर कोशिंबीरीच्या पाठीमागे लागला. आणि मग सगळेजण कांही ना कांही करू लागले. शरदने तर माझे कपडेसुद्धा धुतले. या सा-या करामातींच्या पार्श्वभूमीवर माझ्या गेल्या कांही दिवसांतल्या अनुभवाचं कथाकथन. अगदी थेट पठाणांच्या दावतनाम्यापर्यंत. त्यात मधून मधून त्यांची टिप्पणी चालूच. किशा तर एकदा उसळून कडाडला, " तुलाच लेका नसती कुलंगडी गळ्यात बांधून घ्यायची हौस. ही हिरोगिरी करायची काय गरज होती ? चार पाट्या टाकायच्या आणि गप पडायचं. नाही तरी तो रब्बानी का फब्बानी, काय वेगळं करीत होता !" पेशवा म्हणाला " ते जेवायला बिवायला मुळीच जायचं नाही हां, सांगून ठेवतो."शरदने तर माझ्या त्या हाडाच्या सापळ्याला मूठ माती देण्याच्या कल्पनेची कल्पनेची यथेच्च टिंगल केली. म्हणाला. " च्यामारी, या भोटमामाला (हे माझं टोपणनांव) आपण एवढं ग्रेट मानतो पण हे येडं असा कधी कधी बावळटपणा काय करतं रे. बरं झालं त्या पठाणाने याची शेंडी उपट्लीन तें !" " पेशव्या, तू काय सांगतं बे याले जेवाले जाऊ नको म्हणून? तुला काय वाटते, हा जाणार नाही? हा भोटमामा काय सांगतो बे, थे पठाण याच्या वास्ती भाकरी गिकरी करतीन म्हणून.मी सांगतो, लिहून ठेवा बाप्पाहो, हा तिथे हड्डी गिड्डी चघळाले मिळन म्हणून चाल्लाहे, लाळ गाळीत. याचा काय भरोसा नै भौ!" इति वसंतराव गडकरी.
तेंव्हा पठाणांच्या वसतीवर जेवायला जाण्याचा माझा विचार बहुमताने धिक्कारला गेला.मी माणुसकीची, विश्वबंधुत्वाची भलामण निकराने केली. पण एकही हरीचा लाल माझ्या बाजूने उभा राहीना. संध्याकाळचे चार वाजायला आले तसें हें चित्रविचित्र पक्षी आपापल्या कोटरी परतण्यास सिद्ध झाले. मात्र मी गनीमी काव्याने पठाणास फितुर होईन या आशंकेने, मशारनिल्हे वसंत गडकरी आमचे अंगरक्षक म्हणुन नेमले गेले. त्या भोजनाला जाण्या पूर्वी मला एक काम करावयाचे होते. त्याची वाच्यता मी अद्याप केलेली नव्हती. ती केली असती तर या माझ्या मित्रमंडळींनी मला खाटेला बांधूनच ठेवले असते. ते काम म्हणजे सरकारी रुग्णालयात जाऊन आजारी मोईनखानचा समाचार घेणे. त्यालाही वसंतरावांनी कडाडून विरोध केलाच. पण अखेर तयार झाला.
कतारमधे त्यापूर्वी खाजगी वैद्यकांना वैद्यकी करण्याची मुभा होती. पण तिथे राजेशाही होती आणि राजेशाहीचा एवंगुण विशेष लहरीपणा याला अपवाद नव्हता. आले राजाजीच्या मना तेथें कुणाचे चालेना, असा खाक्या तिथेही होताच. कोणत्याही गोष्टीला मज्जाव करावयचा झाला, तर एक फतवा काढला की झाले! एके काळी भारतीयांना वाहन चालवण्य़ाचा परवाना, त्यांचा भारतीय वाहन चालवण्याचा परवाना ग्राह्य मानून लगोलग दिला जात असें. पण असाच एक फतवा निघाला आणि भारतीयांना तेथील शासकीय संस्थेतून एक महिना वाहन चालविण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य केले गेले. खाजगी वैद्यक असेंच एका फतव्यानिशी बरखास्त केले गेले. इतकेच नव्हे तर भारतीय भिषग्वर्यांना केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुद्त देऊन हद्दपार करण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयाला पर्याय नव्हता.
मोईनखान ज्या रुग्णालयात दाखल केला होता तेथील अवस्था शासकीय रुग्णालयात जशी असावी तशीच होती. ब्रिटीशांच्या प्रभावाने बाहेरील जग झकपक झाले होते. कारण ते मूळ, प्रथमश्रेणी देशवासियांच्या उपभोगासाठी होते. त्यांचे एवढेसें दुखले खुपले तर सरळ विमानांत बसून भारत गांठणे त्यांना शक्य होते. मुंबईला पंचतारांकित रुग्णालयात मोठ्या मिजाशीने उपचार घेणारे अरब आम्ही पहात होतोच. द्वितीय, तृतीय श्रेणी आणि विशेषत: अनिवासी परदेशियांसाठी अशी शासकीय रुग्णालये निर्माण केली गेली हेंच पुरेसे होते. येमेन, युगांडा, झिम्ब्वाब्वे, आर्मेनिया, अशा देशांतुन आयात केलेले सुमार अकलेचे नीम-हकीम असे वैद्य (डॉक्टर्स) आणि अत्यंत अल्प वेतनावर काम करावयास तयार झालेले केरळी, फिलिपिनी परिचारक आणि परिचारिका. तेथे बरें होऊन घरी सुखरूप गेलेल्या रुग्णांपेक्षा, एखाद्या सांसर्गिक रोगाचा शिक्का मारून हद्दपार (डी-पोर्ट) केले गेलेल्या रुग्णांचेच दाखले अधिक. काविळीचा किंवा पीतज्वराचा शिक्का बसला तर मग विचारायलाच नको. आपल्याकडे कुष्ठरोग्याच्या वाटेला येणारी निर्भत्सना कितीतरी सौम्य वाटवी अशी निर्भत्सना तशा रुग्णांच्या वाट्याला येई. पन मोईनखानला उपचार देणारा वैद्य गोव्याचा होता. डेरिक अलेमाव त्याचे नांव होते. फतव्या नंतर या गृहस्थाने नाईलाजाने सरकारी नौकरीचा पर्याय स्वीकारला होता.
मोईनखानला घरीच घेऊन जा असा त्याने आग्रह धरला.नाही तर तोही हद्दपार केला गेला असता. नाईलाजाने मी तो मान्य केला. वसंताला आधी हें सारे अजिबात आवडले नव्हते. मी अजूनही कांही तरी अगोचरपणा करतो आहे अशीच त्याची धारणा होती. पण मोइनखानची असहाय्य अवस्था पाहून तोही द्रवला. खानाला घेउन मी वसंतासह वर्तमान पठाण वसाहतीवर दाखल झालो तेंव्हा मोईनखानला माझ्यासोबत पाहून त्यांनी जो जल्लोष केला तो पाहून वसंता सर्दच झाला. त्या आसंमंतातून शिजू घातलेल्या खाद्यपदार्थाचा दरवळ येत होता. पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.क्रमश:
पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.
------------------------------------------------------------------
पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका
मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध
एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी
एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर
संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले.
" कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे, भ++ ! तुलेच फाडून खातीन ते. पैन लाव."
वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती.
" कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.
" मरहब्बा या हबीबी " म्हणत कादरखानाने पुढे होत आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी.
तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.
या कामगारांच्या निवासासाठी एक भली मोठी खोली, प्रत्येक खोलीत सहा दुमजली खाटा (बंकर बेड), म्हणजे बारा असामी एका खोलीत.खोलीला एक वातशीतक आणि वसाहतीच्या मागे सामाईक स्वच्छतालये. अशी सोय केलेली असें. त्यापैकी एका खोलीतील सामानाची थोडे हलवाहलव करून
दावतीसाठी जमीनीवर एक भली मोठी चटई अंथरलेली. सगळे कडेने बसले. कादरखान आणि नुरुलखान बाहेरून खाद्यपदार्थांची भांडी आणून मधल्या जागेत मांडू लागले. मुसलमानात साळे एकाच थाळीत जेवतात असें मी ऐकले होते आणि आपण भारतीय तर वेगळी थाळी घेऊन जेवतो. आता कसें काय होणार या विवंचनेत वश्या तर असणारच होता पण मीही तशी वेळ आली
तर कसें तोंड द्यायचे याचा विचार करू लागलो. पण जेंव्हा पदार्थांच्या हंड्या मधें मांडून झाल्यावर प्रत्येकासमोर एकेके थाळी मांडली आणि दोन दोन कटोरे आले तेंव्हा जीव भांड्यात पडला. केलेले सगळे पदार्थ एकाच वेळी पण भरपूर वाढले गेले आणि सगळे जेवायला बसले. जेवणाची सुरुवात जरा दाटसर सूप असावे अशा पदार्थाने झाली.त्याला शोरबा म्हणतात असें समजले. गांवी आई निरनिराळ्या डाळींच्या भरड्याचे (कळण्याचे) कढण करीत असें तसा तो प्रकार होता. पण फार चविष्ट
होता. दोन प्रकारच्या भाज्या, एक कोशिंबिरीसारखा प्रकार त्यात सफरचंदाचे तुकडे आणि सुक्यामेव्याचेही तुकडे होते. लुबनानी खबूस म्हणजे लांबट आकाराची मैद्याची खरपूस भाजलेली आपल्या नानसारखी जाड रोटी. ती इथे बेकरीत तयार मिळे. तिचे दोन तुकडे करून लोण्यावर (बटर) जराशी शेकलेली. आणि तुपावर परतून पाकात घोळवलेले खजुराचे काप असा एक गोड पदार्थ. असा एकूण बेत होता. भाज्या मात्र जरा तिखटच आणि तेलच तेल असलेल्या. वश्या मात्र सुरुवातीला जरा धास्तावलेला. मी खातोय की नाही हे पहातच जेवत होता. भाजीची एकेके तुकडा बोटाने दाबून पाही. जेवतांना कांही हलके फुलक्या गप्पा चाललेल्या. मात्र एक गोष्ट मला आवडलेली. गप्पा मोडक्या तोडक्या होईना उर्दूतून चाललेल्या. कांहींना बोलता येत नसले तरी दाद देत होते. त्याअर्थी त्यांना बोलणे समजत होते. तेथील चालीरीती, हुकुमतीची राजवटीचे कांही एककल्ली विनोदी मासले. अनिवासी परदेशियांना, मग तें मुस्लिमी देशंतुन आलेले असले तरी, मिळणारी दुय्य्म दर्जाची वागणूक असें कांही बाही विषय होते. इतका वेळ वश्या गप्पच होता. शेवटी कादरखान म्हणाला
" शाजी, ये मेहमानको बुत क्युं बनाके रक्खाए. इस्को बोलनेकी जुबान हय के नही. के तारीफ है तुम्हारे दोस्त की "
खरच एक चूक झालेली होती. खरं म्हणजे ज्याची त्याने स्वत:च ओळख करून द्यायची हा इथला प्रघात. वश्या आधीच भांबवलेला त्याला हे सुचणार नव्ह्तंच. आणि सुचलंच तो काय म्हणणार होता !
" ही तरकारी कायची केल्ली हो भौ. थे आलु गिलु घातले वाट्टे. लेकिन थे अदरक गिदरकचा ज़ायका काई येऊन नही राह्यला बाप्प्पा. अन थे सांभारचाही काही ठिकाना लागला नाही. काऊन हो भौ ?"
आता वश्याची ही रसवंती ऐकल्यानंतर त्या पठाणाची काय अवस्था झाली असती ते एक अल्लाच जाणे. कारण वश्याला फक्त दोनच भाषा येतात असा माझा समझ होता. एक इंग्रजी आणि ही असली मराठी. त्याचं इंग्रजीही फक्त शेक्स्पिअरलाच समजलं असतं. ’ मला माहित नाही ’
या वाक्याचं भाषांतरही तो ’ आय डझ्नॉट नो ’ असं करीत असे. मात्र त्या नंतर वश्या उर्दूतून असा कांही ’पेश’ आला की, तें अमीर खुश्रो, मीर, गालिब बिलिब नागपूरला धंतोलीत याच्या शेजारीच राहत होते आणि रोज पान खायला वश्याच्या घरी येत होते.
" बंदेको वसंत केहते है. वसंतका मतलब है बहार. आपने जो खातिरदारी पेश की वो काबिले तारीफ है. ता कयामत हम आपके शुक्रगुज़ार रहेंगे " वगैरे वगैरे.
वश्याची ही रसवंती माझ्या तर पार डोकयावरून गेली. पण पुढे आश्चर्य असें की त्या बैठकीचा वश्याने ताबाच घेतला. त्याच्या भौगोलिक सामन्यज्ञानाचे अद्भुत दर्शन आम्हा सर्वांनाच घडले. त्याला कज़गिस्तान, अफगाणिस्तान,तुर्कमेनिस्तान, इराण, इराक, या देशांबद्धल बरीच माहिती होती. हे पठाण बहुतांशी पाकिस्तानच्या सरहदी लगतच्या गांवतून आलेले होते हे त्याला माहिती होते. तुर्कमेनिस्तानामधून वहात अफगणिस्तानमधें येणा-या मर्गब, अमन्दर्या सारख्या नद्यांची त्याला माहिती होती. त्याला अबेस्तादा सरोवर, हिंदुकुश पर्वताच्या रांगा, सिन्काई हिल्स जवळील ज़बुक, मध्य अफगाणिस्तान मधील गज़नी, तिच्या उत्तरेकडील काबूल,कंदाहार सारखी शहरे, ख्वाजा मोहम्मद नांवाचे धर्मस्थळ, असं आणि यापेक्षा कितीतरी अधिक माहिती होती. बापरे. मी तर थक्कच झालो. पठाणांचे तर विचारायलाच नको. या तिनशे पौंडाच्या ऐवजाला त्यांनी डोक्यावर घेउन नाचायचेच बाकी ठेवले होते.
अखेर हात तसेंच खरकटे ठेऊन रंगलेल्या गप्पांना आवर घातला गेला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरा रस्त्याने घरी जाणे सोपे नव्हते. गस्त घालणारे पोलीस किती ’प्रेमळ’पणें वागतात याची कल्पना होती. वश्याला त्याच्या ठिकाणावर सोडून आलो ते मनोमन त्याची तारीफ करतच.
या मस्त रंगलेल्या मेजवानीची कुणकुण दुसऱ्या दिवशी मुख्यालयाला लागेल आणि तो गुन्हा समजला जाऊन मला चौकशीसाठी बोलवलं जाईल असं स्वप्नही त्या रात्री मला पडलं नाही. मस्त झोप लागली. वास्तवाला तोंड देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळ पर्यंत.
क्रमश:
वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.
-------------------------------------------------------
दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो. आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी
दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून
एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.
मुख्यालयात मार्स्टर्न साहेबांच्या कक्षापर्यंत पोहोचलो तर त्यांच्या स्वीय सहायिकेने सांगितले की साहेब मजकूर माझी वाट पहातच आहेत. तिने ज्या चर्येने सांगितले ती पाहून मी आधीच एक ग्लास पाणी पिऊन घेतले आणि साहेबांच्या कक्षात गेलो साहेबांच्या कक्षाच्या दरवाजावर टक टक केले. साहेबाने परवानगी दिल्यावर आंत गेलो आणि त्याच्यासमोर उभा राहिलो. साहेब सुमारे अर्धातास बोलला. तो बहुदा आयरिश असावा. त्याचे इंग्रजीचे उच्चार समजणे महा कठिण. त्याने
उच्चारलेल्या एका शब्दाचा उच्चार समजाऊन घेऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत हा पाठ्ठ्या चार वाक्ये पुढे गेलेला असायचा.
गोष्ट अशी होती की मी काल लेबर कॅंपवर पठाणांनी दिलेल्या मेजवानीला गेलो ही गोष्ट षट्कर्णी झालेली होती आणि ती जेंव्हा साहेबमजकूरांपर्यंत गेली तेंव्हा ते आवडलेले नव्हते. मुळातच वर्णभेदाचा अंगिकार आणि पुरस्कार करणाऱ्या या गोऱ्यांना माझें बहुजनांत मिसळणे मान्य होणारे नव्हते. समाज श्रेणींतील भेदाभेद कटाक्षाने जपणाऱ्या ही पाश्चिमात्य संस्कृतीत माणुसकीचा लवलेशही नसणे स्वाभाविक होते. हें मला ज्ञात नव्हते असें नाही. पण त्या विचारसरणीला
इतक्या क्षुल्लक पातळीवर आणून ठेवले जाईल असें मला कधी वाटले नाही. उलट हुकुमशाही प्रवृत्तीच्या या माणसांना माझे माणुसकीला धरून वागणे द्रोहाचे वाटणेच शक्य होते. त्यात साम्यवादाची भीती शोधू पाहणारी भीरुता नक्कीच होती. अगदी साध्या भाषेंत सांगायचे तर पायातली वहाण पायातच ठेवली पाहिजे या तत्वज्ञानाची भलामण त्यांच्या पथ्थ्यावर होती.
मार्स्टर्न साहेबांच्या बौद्धिकाचा सरळ अर्थ असा होता की, मी पठाणच काय पण इतर कोणाचीही वागतांना पायरी सोडून वागू नये. कामगारांना मी कामगारासारखेंच वागवले पाहिजे. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक मान आणि सवलती देउ नये. हा खटला एकतर्फी होता. त्यात मला माझी बाजू माझी बाजू मांडण्याची मुभा असण्याचा प्रश्नच नव्हता. तूर्तास तोंडी समज दिली गेली. तिचे उल्लंघन म्हणजे गंभीर परिणाम! कदाचित् निरोपाचा नारळ. मी खिन्न मनाने कार्यस्थळावर परतलो.
कार्यस्थळावर आल्यावर मात्र खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. पठाण अत्यंत जोमाने काम करीत होते. कामाचा मागील अनुशेष जवळ जवळ भरून निघाला होता. कालच्या मेजवानीचा हा परिणाम असावा वाटून गेले. ते एक कारण होतेच पण आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जिथे
तो अस्थिपंजर सांपडला होता तेथपासून पुढे जमीन भुसभुशीत लागलेली होती. पण पठाणांची तर्कमिमांसा निराळीच होती. कादरखान म्हणाला,
" अच्छा हुवा जो उस मरहूमकी साया निकाल बाहर हो गई. वो सखत
जमीन उस सायाका अंज़ाम. अब सारा काम मुकम्मल होगा. "
ही भुताखेताची भीती हास्यास्पद नक्कीच होती. पण ती तशीच राहू देणे हिताचे होते. त्या भीतीनें कां होईना. काम भराभर होत होते.
जेवणाच्या सुटीला थोडा अवधी बाकी होता. एवढ्यात कादरखान माझ्या जवळ आला. विचारू लागला,
" क्या हुवा मक्तब में ? "
मुख्यालयात झालेला प्रकार खरा खरा सांगून टाकावा असें एकदा वाटले. पण मी एक लोणकढी ठेऊन दिली.
" हमारा काम इन्शाल्ला, बाअंदाज अच्छा चल रह है खान! मुदीरको बहुत खुशी है. ये काम जल्दी जल्दी तमाम करो. आगे दूसरा काम करना है. हुकूमतका ज़दीद (मोठें) कलोनी (निवासी आवास संकुल) बनानेका काम मिला है. हमारा कारवॉं उधर जाना होगा. सुकून मिलेगा."
खान खुश झाला. उड्या मारीतच जेवायला पळाला.
गोरे कांही म्हणोत पण माझ्या पद्धतीने मी कामगारांशी जवळीक साधत होतो. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येत होते. साहेबांचा धर्म निराळा होता. त्यांचे तंत्र निराळे होते. माझ धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा श्री कृष्ण माझा आदर्श होता.
सहनाववतु सह नौ भुनक्तौ सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वीना वधितवमस्तु मा विद्विशावहै ॥
हा माझा मंत्र होता.
क्र्मशः
माझा धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा
श्री कृष्ण माझा आदर्श होता.
--------------------------------------------
त्यानंतर लागोपाठ तीन दिवस काम सुखेनेव चालले. जमीन भुसभुशीत लागली होती ही एक जमेची बाजू होती. शिवाय कांही अपवाद सोडले तर बहुतेक पठाण सरळ वागत होते. मध्येच कधी तरी दोन पठाणांमध्ये एखादी ठिणगी उडे, मग बाचा बाची ही आलीच. पण कादरखान ती समस्या परस्पर हाताळत असें. एक कादरखानच काय पण बाकी बहुतेक पठाण समजदारीने आणि सामंजस्याने वागत होते. त्यांच्यातील जे वाद कादरखानाला हाताळता येत नाहीत असें त्याला वाटले, त्यांचा निवाडा करणे माझ्यापर्यंत पोहोचले.
प्रक्षोभक झालेले कामगार माझ्याकडे आले की मी त्यांना केबीनमधें पाचारण करी. कांही बोलणे सुरूं करण्याआधी त्यांना एक पेलाभर थंड पाणी दिले की प्रक्षोभाची धार जरा बोथट होते हे माझ्या लक्षांत आले होते. मग त्यानंतर त्यांचा आवेश आपसुकच जरा मंदावलेला असायचा. त्यांच्या समस्याही तशा वैयक्तिक आणि बऱ्याचदा अगदी पोरकट असायच्या. त्यांचे त्यांच्या गावाकडची किंवा कौटुंबिक भांडणे हेही एक कारण असायचे. कारण बरीचशी मंडळी एकाच गांवातून आलेली असायची. तसेंच ते एकमेकांचे नातेवाईकही असायचे. जसें आपल्या कोकणातून एखादा चाकरीसाठीं म्हमईला गेला की तो संधी मिळतांच आणखी चारदोन गांववाल्यांना म्हमईत कुठे ना कुठे तरी चिकटवून देण्याच्या प्रयत्नांत असतोच. तसाच प्रकार या पठाणांच्या बाबतीत घडलेला दिसायचा. त्यांत एक सासरा-जांवईही होते. सासऱ्याने कबूल करूनही (मेहेर) हुंडा दिलेला नाही म्हणून इथें हें असले कष्टाचे काम करायला आलो हा जांवयाचा दावा. तर या नालायक जांवयाला देण्याचा पैसा कमवण्यासाठीं घरदार सोडून वाळवंटात आलो हे सासऱ्याचे गाऱ्हाणे. हे दोघे तर नेहेमी भांडायचे. कधी कधी तर मामला मुद्यावरून गुद्यावरही यायचा. बरं या दोघांचेही समर्थक त्याच घोळक्यात असणार आणि मग त्यांचेही शक्तिप्रदर्शन. मी आपला कधी दादा पुता करून तर कधी हद्दपारीची शिफारस करण्याचा धांक दाखऊन ती भांडणे मिटवीत असें.
माझें हें उपद्व्याप मी एकदा आमच्या सडेफटिंग युनियनच्या सदस्यांना सांगितले तर मी ’घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे तात्काळ बंद करावे’ हा ठराव सर्वानुमते पास झाला. डोंगऱ्या तर ’ आ बैल मुझे मार ’ नांवाचा चित्रपट काढणार होता आणि त्या चित्रपटाचा नायक अर्थात् मीच असणार होतो. या त्याच्या विनोदामागे एक तिरकसपणही होता हे जाणवत होते. हें असें करण्यात मी एक प्रकारें आत्मप्रौढी, शेखी मिरवत आहे असा त्याचा आरोप होता.
पण तसें कांही मी बुद्ध्याच करीत नव्हतो. कामगारांत मित्रत्वाच्या नात्याने मिळून मिसळून वागण्याची माझी जुनी संवय होती. मी लहानपणा पासूनच कांहीसा मवाळ होतो. जरा हळवा आणि भाबडाही असेन कदाचित. मात्र माणसे जोडूनच कांही साध्य करतां येतें या विचारावर माझा भरवसा होता. आमचा पेशवा मात्र म्हणाला, " जें कांही करायचे असेल तर कर पण सेन्स ऑफ प्रपोर्शन सोडू नकोस आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वत:चा ’पोपट’ होऊ देऊ नकोस". या माधव महाबळला आम्ही दिलेली पेशवा ही उपाधी तो अशी सार्थ करीत असे.
असाच एकदा पठाणांचा एक वाद मिटवीत होतो इतक्यात एक मोटार आल्याची चाहूल लागली. पठाणांना कामाकडे पिटाळून मी सामोरा झालो. एक अलिशान अमेरिकन मोटार जवळ येऊन थांबली आणि संपूर्ण अरबी वेशातली काळा चष्मा लावलेली एक असामी गाडीतून बाहेर पडली. मोटारीला स्वतंत्र चालक होता हे माझ्या ध्यानात आले. म्हणजे ती व्यक्ती कोणीतरी उच्च दर्जाची अधिकारी होती हे नक्की. कारण सहसा मोठमोठे अधिकारीही इथें आपली मोटार स्वत:च चालवीत. मी पुढें होत अभिवादन केले. माझ्याशी हस्तांदोलन करीत त्या व्यक्तीने अस्खलित आङ्ग्ल भाषेत आपला परिचय दिला. आमच्या आस्थापनेचा तो ’अल् मुदीर’ म्हणजे जनरल मॅनेजर होता. क्षणभर हा महाभाग इथें कां अवतरला असेल याचे मनांत आश्चर्य वाटले आणि थोडी भीतिही. हे साहेब कामाची पाहणी करण्यासाठीं आलेले होतेच पण मी कामगारांशी फालतू जवळीक करीत आहे अशी तक्रार त्याच्या पर्यंत पोहोचली होती. मेजवानीची खबरही त्याला मिळाली होती. आणि त्याची चौकशी करण्यासाठीं दस्तुरखुद्द जातीने आले होते. त्यांनी आधी मी तिथें येण्यापूर्वीच्या आणि माझ्या अखत्यारीत झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्या तूलनेत माझे काम समाधानकारक असल्याचे पाहून तो बराच निवळला. माझ्याबद्धल त्या गोऱ्या अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती तिच्यातील फोलपणा त्याच्या लक्षांत आला असावा. कारण त्यानंतर तो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही गेला आणि पठाणांशीही बोलला. काय बोलला हे मात्र मला समजले नाही कारण तें संभाषण अरबी भाषेंत झालें. अखेर जातांना मला शुभेच्छा देऊन गेला तेंवढे मात्र मला समजले.
तो गेल्यानंतर कादरखान माझ्याजवळ आला. त्याचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी त्याला कारण विचारले तर म्हणाला,
" मुदीर बोला, तुमारा काम बिल्कूल मुश्तमाम. खराब काम किया तुम. तुम पठानको मारा पीटा. तुमको मुदीर इंडिया वापस भेजेगा. "
असं म्हणून दोन्ही हात वर करून आकाशाकडे पहात ओरडला " रहेम या खुदा, रहेम !" आणि गडगडून हंसायला लागला.
त्याच्या पहिल्या दोन वाक्यांनी मी चक्रावलो होतो पण त्याचा पुढचा तमाशा माझ्या लक्षांत आला. त्याच्या पोटांत एक जोरदार ठोसा लगावीत मी पण ओरडलो,
" बर्रा, वै शैतान बर्रा !" (चालतो हो, राक्षसा चालता हो!)
सगळे पठाण हात उंचावीत मला कांहीतरी सांगू इच्छित होते. काय तें मला कांही समजत नव्हते. मात्र ते आनंदात असावेत असें दिसले. मीही आनंदात होतो पण थकवाही जाणवत होता. आता कामाचा वेगही वाढला होता. या वेगाने झाले तर काम, फार फार तर चार दिवसांत पूर्ण होणार होते. किती दिवस झालें मी हें काम सुरू करून? कांही समजत नव्हते.
जणू हा एक कबड्डीचा डाव चालला होता. त्यांत मी कधी हरत होतो तर कधी जिंकत होतो. मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
क्रमश:मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
--------------------------------------
मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,
"मेहमाननवा़ज़ी हा प्रत्येक सच्च्या मुसलमानांचाच काय पण साऱ्या जगाचा आद्य धर्म आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ असला पहिजे. एक माणूस म्हणून तुमचा नवा साहेब कसा आहे तें तुमचे तुम्हीच ठरवा. तो माणूस असेल तर तुम्ही माणूस बना. नाही तर तुम्ही राक्षस तर आहातच. तुम्ही केलेले कामही उत्तम आहे. हे काम लवकर संपवा. मी तुम्हा सर्वांना खास बक्षीश देणार आहे."
हे सारे मोईनखानने सांगितले. तें ऐकून माझ्या मनांत मुदीरबद्धल आदर निर्माण झाला. आखातातील आतापर्यंतच्या मुशाफिरीत मी पाहिलेला तो पहिला सहृदय माणूस होता. शिवाय त्याला कामगारांचे मानसशास्त्र चांगलेच अवगत असावे. कामगारांना प्रोत्साहित (motivate) करण्याची त्याची हातोटी मला फार आवडली. त्याने बक्षीश देण्याचे कबूल केले त्याचे मात्र मला नवल वाटले नाही. मुदीर किंवा शेख खुश झाला तर कांही ना कांही बक्षीस नक्की देत असें. इथें तशी पद्धत होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि आजही इथे सरंजामशाही होतीच. देशाला राजा होता आणि संस्थानिकही होते. बक्षीसे देणे हे राजेशाही औदार्याचे आणि मिजाशीचे लक्षण होते. बक्षीस सहसा रोख रकमेंतच असायचे. ते सामुदायिक असेल तर सहसा त्याचा विनियोग जल्लोषी मेजवानीसाठीं केला जाई.
मोईनखान आताशा तो माझ्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न करीत असे. त्याची प्रकृती आता बरी होती. जी कांही औषधयोजना त्याला सरकारी दवाखान्यातून मिळाली होती त्यामुळे त्याला बरें वाटत होते. खरें तर यांत मी कांहीच केले नव्हते पण तो उगीचच माझे आभार मानीत असे. या पठाणांना वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असूनही ती त्यांना दिली जात नव्हती. इथें कष्ट करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस तंदुरुस्त असायलाच पाहिजे हे तत्व बरोबर होते. पण वेळ कांही सांगून येत नाही. त्याला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे असें मला वाटें. पण त्याचा काय उपयोग होता. इथें कामासाठीं येणाऱ्या सर्वच माणसांना कमीअधिक प्रमाणांत गुलामासारखेंच वागवले जात होते. सगळेंच कांही मुदीर सारखे नव्हते. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग इतरांना छळण्यासाठी वापरण्याची हौसच अधिक दिसून येते आणि या विकृतीला बळी न पडणारा विरळाच.
वीज वाहिनी जमीनीतून टाकण्याचे काम जसजसें संपत आले तसतसा कामाचा जोश वाढत गेला. कांही अडचण आली तरच मी कामाच्या ठिकाणी असावे. एरवी मी केबीनमधें निवांत वसावे, आराम करावा असा आता पठाणांचा आग्रह असें. पण माझा बहुतेक वेळ त्यांच्या वरोवरच जात असें. कारण कांही काम न करता बसून राहण्याची संवय नव्हती. तो माझा स्वभाव नव्हता. काम जसें एक दिवसावर येऊन ठेपले तसे कामगारांची गडबड वाढली आणि वातावरणच बदलले. ज्या गांवासाठी ती वीजवाहिनी टाकली जात होती तें गांवही जवळ आल्याने कांही गांवकरीही आता कुतुहलाने कामाच्या ठिकाणी घोळक्याने फिरकत. त्यांत पोरेटोरेच अधिक. आपल्याकडेंही असेंच चित्र अनेकदा दिसते. खेडेगांवात अगदी पोस्टमन जरी बटवड्यासाठी गांवात आला तर चिल्ली पिल्ली त्याच्या सायकलच्या मागे पळणारच आणि शहरांतही एखादी जरा वेगळी विदेशी असामी दिसली की भल्याभल्यांनाही आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहाण्याचा मोह आवरत नाही. माणसाच्या नाविन्याच्या या नैसर्गिक कुतुहलाचे मला नेहमीच नवल वाटत आले.
अशाच एका संध्याकाळी. कांही कामागार राहिलेले काम उरकण्याच्या मागे आणि कांही शेवटी न लागणाऱ्या साहित्याची आवरासावर करण्यात मग्न. सगळ्यांनाच कधी एकदा हे उघड्यावरचे उन्हातान्हातले काम संपवतो असें झाले होते. कारण त्यानंतरचे काम इतके जिकिरीचे असणार नव्हते. तसें कुणालाच कांही माहिती नव्हते. पण पण यापुढील वीजवाहिन्या आरोहित्राला (transformer) जोडणे, गांवात त्या आधीच विस्तारलेल्या कमी दाबाच्या वाहिन्या आरोहित्राला जोडणे अशी कांमे सुरु होणार होती. श्रम त्या मानाने कमी होणार होते. शिवाय कामांत विविधता असणार होती. कामातील विविधताही मनोरंजक असते आणि श्रमांचा ताण जाणवत नाही. सगळेच पठाण त्यासाठी लागणार होते असें नव्हते. पण कोण कुठे जाईल याची उत्सुकता होती. अशा रितीने सारे कांहींना काहीं व्यवधानात होते. एवढ्यात कामाच्या शेवटच्या टोकाशी कांही तरी अघटित घडले असावा असा कोलाहल झाला. सगळे हातातले काम टाकून तिकडे धावले. मीही कामाच्या गस्तीसाठी मिळालेली जीप तिकडे पिटाळली.
शेवटच्या टप्प्यातली धांदल, बघ्यांची झालेली गर्दी. त्यातून अति उत्साही कार्टी चरावरून इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. त्यांना हांकारताना पठाणांची दमछाक झालेली. अशातच एक कार्टं चरांत पडलं. त्याला वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या भरांत एक पठाण माती ढकलणाऱ्या यंत्राच्या चाकाखाली आला. चाक कसले ते! चाक म्हणायचे पण रणगाड्याला असतो तसा तो कांटेरी चाकावर फिरणारा पोलादी पट्टाच असतो. आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ते यंत्र तात्काळ थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यांत ते एकाबाजूने चरांत घसरले. बघे घाबरून पळाले. मात्र काम ठप्प झाले.
कांही क्षण कोलाहलात गेल्यावर कोलाहल थांबला आणि शांतता पसरली. जो तो एकमेकाकडे पहात होता, यदृच्छयेने झालेल्या अपघाताचा विचार करू लागला. माती-ढकल्या (बुलडोजर)चा एक भाग घसरून चरांत टाकलेल्या वीज वाहिनीवर पडला होता. वीज वाहिनीवर विटांची रांग होती म्हणून तिला सध्यातरी कांही इजा पोहोचलेली नव्हती. तो पुन्हा चालू करून बळाने वर काढता येणे शक्य होते पण विटा चक्काचूर होऊन वीज वाहिनीला चांगलीच इजा पोहोचणार होती. आता ते धूड उचलून सरळ करणे भाग होते. त्यासाठी क्रेन लागणार होती. क्रेन खूप दूरच्या एका दुसऱ्या साईटवर होती. तिला निरोप देऊन ती येई पर्यंत कदाचित् दीड-दोन दिवस लागणार होते. साऱ्यांचा हिरमोड झाला होता. क्रेन येईपर्यंत बाकी आवरासांवर करून घ्यावे म्हणून कामगार बेसकॅंपवर पिटाळले आणि मीही फोन करून अपघाताची खबर मुख्यालयाला द्यावी म्हणून केबीनकडें वळालो.
मी केबीनामधे जातांच आधी दोन पेले पाणी घटाघटा प्यालो आणि खुर्चीत बसलो. खरं म्हणजे मी अगदी चिडून गेलो होतो. अडचणी माझी पाठ सोडीत नव्हत्या. आता हे क्रेन मागवण्याचे प्रकरण म्हणजे वैताग होता. काय झालें, कसें झालें याचा जाब जबाब देणे, चौकशी झालीच तर तिलाही तोंड देणे. या सगळ्या तपशीलाची नोंद करणे. अहवाल तयार करणे. मला ही असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण ’ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा’ या म्हणीचा प्रत्यय येणार होता. मुख्यालयाला खबर देण्यासाठी फोन लावणार इतक्यात एक आडदांड पठाण केबीनमधे घुसला आणि अरबी भाषेंत तावाने कांही तरी सांगू लागला. मी आधीच इतका वैतागलेला, त्यात हा माझ्या वैतागात भर टाकायलाच जणू आलेला. मी त्याला हाकलून देण्याच्या विचारात असतांनाच पाठोपाठ कादरखान अवतरला आणि सांगू लागला,
" शाबजी ये महंमदखान! कुच तर्कीब ले के आया है. "
हा आता आणखी काय दगडाची तरकीब सांगणार होता कुणास ठाऊक! पण म्हटले, सांग बाबा ! त्याच्या तरकीबीने क्रेनचा द्राविडी प्राणायाम वाचणार असेल तर तो मला हवाच होता. मग त्या दोघांचा अरवी भाषेत एक लडिवाळ संवाद झाला आणि कादरखान मला ती तरकीब सांगू लागला. ती अशी होती की, केबल ओढणारे यंत्र सुटे करून घ्यायचे. साईटवरच्या भांडारात एक भली मोठी पोलादी दोरी (sling) होती ती या यंत्राच्या आणि अपघातग्रस्त यंत्राच्या मधे बांधायची आणि या यंत्राने ते यंत्र (बुलडोजर) ओढून धरायचे. ते पुरेसे वरती उचलले गेले की निर्माण होणाऱ्या सांपटीत विटांचा केबलवर संरक्षक थर टाकायचा आणि नंतर ती पोलादी दोरी काढून घ्यायची. केबलवर विटांचा संरक्षक थर दिला तर बुलडोजर चालू करून बाहेर काढून घेता येणार होता. मी जरासा विचार केला, कल्पना चांगली आहे, पण जरा धाडसाची आहे. केबल ड्रम उतरवणे आणि पुन्हा वर
-----------------------------------------------------------------------
राक्षसांशी मैत्री-
दोहा-कतार हा देश ब्रिटीशांच्या जोखडातून नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या जोखडाखालील हा देश खूपसा मागास होता. किंबहुना ब्रिटीशांनी तो मागासच कसा राहील याचीच काळजी घेतली होती. तेच त्यांच्या मतलबाचे होते. थोडयाफार फरकाने भारताच्या बाबतीत असेच घडले होते. भूगर्भातल्या तेलाने देशाला महामोर संपत्ती मिळवून दिली होती. आता गरज होती ती साधनांची, पायाभूत सुविधांची. यांत स्वकीयांचा (नेटीव्ह) उपयोग तसा नगण्य होता. याचे कारण मागासलेपण तर होतेच पण वेगाने सुरु झालेल्या संपत्तीच्या ओघाने आणि पैसा फेकला की जगात कांहीही विकत घेता हे समजल्या मुळे लोक आळसावले होते. चैन, ऎशोआराम यालाच चटावले होते. मग पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अन्य देशातून तंत्र, तंत्रद्न्य, मनुष्यबळ आयात करणे क्रमप्राप्तच होते. उच्च तंत्रासाठी युरोपीय देश आणि तंत्रद्न्य, कुशल कामगार, मनुष्यबळ या साठी भारत, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणीस्तान वगैरे आशियाई देश हा तरणोपाय झाला. भारत त्यातले त्यात प्रगत देश म्हणून जरा अधिक महत्व मिळाले. भारतातून केवळ भारवाहू, केवळ कष्टाची कामें करणारे फार कमी गेले. गेले ते कुशल कारागीर. पण मग कष्टाची कामें करणारे मजूर लागणारच. त्या कामासाठी निवड झाली ती धिप्पाड, काटक, अफगाणी पठाणांची, ज्यांची बौद्धिक क्षमता, पातळी अप्रबुद्धच असायची. विनोदाने आपण ’मल्लभेजा’ म्हणतो तसे. या लोकांकडून कामे करून घ्यायची म्हणजे फार अवघड. वृत्तीने अत्यंत रासवट, भडक माथ्याचे, अरेबिक आणि पुश्तु शिवाय भाषा माहिती नाही. त्यातही अरेबिक पेक्षा पुश्तुचाच प्रभाव अधिक. बोलायला लागले की चार सहा अरेबिक शब्दांनंतर पुश्तु सुरू व्हायचे. आधी अरेबिक समजायचीच मारामार त्यात पुश्तु म्हणजे ’कानडीने केला मराठी भ्रतार’ याहून भयंकर. माझे अरेबिक म्हणजे ’व-हाड निघालय लंडनला’ मधल्या बबन्याच्या इंग्रजी सारखं. त्यामुळे अशा पठाणांशी संबंध कधीच येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत असे. पण देवालाही एखादा ’मिस्ड् कॉल’ गेला असावा आणि एका सुप्रभाती ते संकट दत्त म्हणून् पुढे उभं येऊन ठाकलंच.
आमची कंपनी म्हणजे वर उल्लेख केला त्याप्रमाणे पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रकल्पातील बांधकामापासून ते वीज-पाणी-वातानुकूलित करणारी संयंत्रे इत्यादि बहुविध सेवा पुरविणारी म्हणजे अगदी इमारतीचा पाया खणण्यापासून ते अगदी न्हाणीघरातील शेवटचा नळ बसवून देण्यापर्यंत सेवा परविणारे अवाढव्य आस्थापन होते. त्यात अनेक निरनिराळे विभाग होते. आपत्कालीन परिस्थीतीत कर्मचा-यांची तातपुरती बदलीही होत् असे. असेंच एकदा मला माझे विहित काम सोडून
एका दूरच्या कार्यस्थळावर वीज-वाहिनी (केबल) जमीनेखाली टाकण्याचे काम करणा-या अफगाणी मजूरांच्या जथ्थ्यावर देखरेख करण्याची, त्यांच्याकडून् काम करून घेण्याची कामगिरी सोपवली गेली. त्या कामाचा प्राधिकारी (इनचार्ज) अचानक दुसरीकडे आणि मी त्याच्या जागी अशी योजना झाली.
या नवीन कामगिरीचा भार (चार्ज) मला देणारा प्राधिकारी पाकिस्तानी होता. भरभक्कम शरीरयष्टीच्या आणि अरेबिक, पुश्तु सकट इंग्लीश, फ्रेंच इत्यादि भाषा लीलया बोलू शकणा-या या माणसाने माज्या डाळ-भात्या शरीरप्रकृतीकडे अतीव करुणार्द्र नजरेने पाहात, आस्थापनेच्या अशा बिनडोक निर्णयाबद्धल केवळ ’अफसोस’ या एकाच पण अत्यंत परिणामकार शब्दात नापसंती व्यक्त करीत मला कार्यभार दिला आणि याच्या कांही मौलिक सूचनाही दिल्या. त्याही विलक्षण होत्या. तो म्हणाला,
" हरून, (इथे माझ्या अरुण या नावाचा असा अपभ्रंश झालेला होता) त्या माणसांना माणूस म्हणशील तर खुदाही कदाचित नाराज हॊईल. अगदी राक्षस आहेत ते. तुला नवल वाटेल पण जुन्या इंग्रजी सिनेमात गुलामांना जसें हंटरने मार मारून कामाला लावलेले दाखवलेले असायचे तसें करावे लागते. तू तिथे गेलास की माझ्या टेबलावर तुला एक वेताची काठी दिसेल. ती तुला हातात घेऊनच फिरावे लागेल. तुझ्या हातात ती काठी नसली तर ते कदाचित संधी साधताच तुला मारायलाही कमी करणार नाहीत. परमेश्वर तुझं रक्षण माझ्या मित्रा !" असं म्हणून तो माझा नवा मित्र (!) माझ्या उरांत धडकी भरून गेला. त्या रात्री मी माझ्या पत्नीला जे पत्र लिहिले त्यात हे सारे लिहिले पण सकाळी पत्र फाडून टाकले आणि कामाला निघालो.
कार्यस्थळावर पोहोचलो तर तिथे आमच्या विभागाचा ’मुदीर’ (मॅनेजर) माझ्या आधी हजर झालेला. अदमासे चाळीसेक पठाणांचा जथ्थाही जवळच उभा होता. मुदीर मला कामाचा तपशील इंग्रजीतून् समजाऊन सांगत होता त्यावेळी हे पठाण आमचे संभाषण कुतुहलाने ऐकत होते, आपसात काहीं कुजबुजतही होते हे माझ्या ध्यानात् आले. मुदीरचा वेश, तोकडी तुमान-टीशर्ट असा कांहीसा अमेरिकन वळणाचा होता, भाषेचा लहेज़ाही तशाच वळणाचा होता.
मुदीर त्याचे काम आटोपून ताड्कन् गेला आणि मी ’सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुच्यति’ अशा अवस्थेत त्या आर्यावर्ती महाजनांना सामोरा गेलो. मी कांही शब्द उच्चारायचा क्षणाचाही अवधी न देता त्यापैकी एकान मला पुश्तु भाषेत एक भले मोठे वाक्य ऐकवले. तो माझा परिचय करून घेण्याला उत्सुक असावा, कदाचित तो माझ्या देशाबद्धल कांही विचारीत मला वाटले. कारण त्याच्या बोलण्यात एकदां ताजमहाल असा शब्द आला होता. भारताबाहेरील ताजमहालाबाबतचे कुतुहल मला माहिती होते. जरा संभ्रमित अवस्थेत मी ’ हैवा !’ (होय) असें म्हणून् गेलो मात्र, सगळे पठाण गडबडाटी हसायला लागले. कांहींना हसूं इतके आवरेनासें झाले की ते हात वर करून नाचू लागले. एक नक्की समजलं की त्यांनी माझी मस्त खिल्ली उडवली होती. भांबावून मख्ख उभे राहण्यापलिकडे मी कांही करू शकत नव्हतो. इतक्यात एका उंच माणसाने आपला उजवा हात उंच केला त्यासरशी बटण बंद केल्या नंतर विजेचा सिवा बंद व्हावा तसा तो हास्यकल्लोळ थांबला आनि तो इसम माझ्या रोखाने पुढे सरकला. माझ्या पुढ्यांत उभा ठाकून त्याने सवाल ठोकला,
"अन्ता अमरीकी ?" प्रश्न मला समजला आणि
"लॅ, अना हिन्दी ! " उत्तर निघून गेलं.
कां कोणास ठाऊक त्या म्होरक्याच्या चेह-यावर मघाशी कांहीसा तिरस्कार दिसलासा वाटल होता तो निवळल्या सारखा वाटला. किंचितसे स्मित मुद्रेवर उमलवीत त्याने
"अस्सलाम-व-आलेकुम !" म्हणत हस्तालोंदनासाठी हात पुढे केला. ती तेथील सर्वसामान्य प्रथा आहे हे मला माहिती होता आणि
"व-आलेकुम अस्सलाम" म्हणत मी त्याच हात हातात घेतला. त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला त्या वेळी समजला नव्हता. तो नंतर कळाला
क्रमश:
त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला समजला नव्हता. तो नंतर कळाला.
----------------------------------------------------------------------
त्यानंतर तो माणूस चक्क मला समजेल अशा भाषेत बोलू लागला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.
" मुआफ करना रफिक. पठानको अमरीकी बिल्कूल नापसंद. हरामी हमारा मुलुक बरबाद किया. तुम हिन्दी, या हबीबी ! हमारा दोस्त! इंद्रा (इंदिरा गांधी) हमारा दोस्त! मा फिकर." (काळजी करू नको)
जिवात जीव आला. पठाण मोडकं तोडकं कां होईना पण मला समजेल असं उर्दू बोलू शकत होता. त्यांचा अमेरिकेवर राग होता हेही लक्षात आलं. तो स्वाभाविक असावा. कारण आंतराष्ट्रीय राजकारण थोडेफार सामान्यपणे मला महिती होते. महासत्ता बनण्याच्या हव्यासापायी अमेरिकेने इराण. इराक, अफगाणीस्तान अशा अनेक मुस्लिमी देशांत हस्तक्षेप केला होता. त्या कारवाईमुळे तेथील जनतेला नाहक भीषण परिस्थीतीला सामोरे जावे लागले होते. कायमची युद्धसदृष परिस्थिती, अतिरेकी तालिबानींना आधी दिलेले प्रोत्साहन आणि नंतर त्यांचीच झालेली होरपळ हे मी वर्तमानपत्रातून वाचले होते. मी संभाषण वाढवायचं ठरवलं.
" मेरा नाम हरून. इधरका रब्बानी साब दूसरा कामपे गया. अब हम काम देखेगा. तुम हमारी मदद करेगा." नकळत मी त्याचीच भाषा बोलू लागलो.
"लाज़ीम,लाज़ीम रफिक" (अवश्य,अवश्य मित्रा) त्याने मला दिलासा दिला आणि नंतर बाकी पठाणांना संबोधून पुश्तु भाषेत कांहीतरी ओरडला. त्या सरशी तो जथ्था कामाच्या दिशेने सरकू लागला. पण तरीही बरेचसे पठाण मंद गतीने सरकत होते. मागे वळून वळून पाहात होते. आपसात कुजबुजत होते. जमीनीत चर खोदणारी चारचाकी ट्रॅक्टरसारखी यंत्रे सुरु झाली होती. भला मोठा केबलचा रीळ एका यंत्रावर ठेवलेला होता कांही पठाण ते यंत्र चालु करत होते. त्यावर स्वार होत होते. जवळच कार्यस्थळावरचे चाकावरचे कार्यालय होते.(मोबाईल पोर्टा कॅबीन) तिथे जाऊन मला रेडिओ फोनने मुख्यालयाला रिपोर्ट करावयाचा होता. मी त्या दिशेने वळणार इतक्यात असलेला प्यून माझाच दिशेने पळर्त आला आणि रेडिओ वाजत असल्याचे ओरडून सांगू लागला. मी धावतच केबीन गाठली आणि काम सुरु झाल्याची खबर देउ लागलो. ’कांही अडचण तर नाही ना?’ या पुन्हा पुन्हा विचारला गेलेल्या प्रश्नाला माझे ’नाही’ हे उत्तर मुदीरचे समाधान झालेसे वाटले नाही. पण मग ’सध्या तरी कांही समस्या नाही’ असे म्हणालो तेंव्हा रेडिओ बंद झाला. प्यूनने एव्हाना थंड पाणी आणि कॉफीचा कप समोर ठेवलेला होता.
कॉफी संपवून कामाच्या आखणी-आलेखावर(प्रोग्रॅम चार्टवर) नजर टाकू लागलो. तेथील सारी कामे फार सूत्रबद्ध असतात, आलेखाप्रमाणे आमलात आणावीच लागतात. इथे तर काम चार दिवसांनी मागे पडलेले दिसत होते. तो बाजूला सारून मी कामाच्या ठिकाणावर जावे म्हणून केबीनच्या बाहेर पडलो तर मघाचा तो पठाण म्होरक्या समोर हजर आणि तिकडे मंडळी काम सोडून निवांत गप्पा छाटत बसलेली तर कांही शिवाशिवासारखा खेळ खेळण्यात गढलेली. त्या म्होरक्याला मी कांही विचारणार इतक्यात तो तीरासारखा कॅबीन मधे शिरला, टेबलवरील ती वेताची छडी घेऊन त्या कामचुकार कामगारांवर धावत गेला आणि एकेकावर छडीचे वार करू लागला. मी सर्द होऊन पाहातच राहिलो. कांही पठाणांनी आपसात झोंबाझोंबी सुरु केली. मात्र कांही मिनिटातच, तो म्होरक्या पठाण मेंढपाळाने मेंढरं वळावीत असा आरडाओरडा करीत पळापळ करीत पठाण वळित होता आणि काम सुरु झालेलं होतं. सकाळपासून जे कांही पहिलं होतं, अनुभवलं होतं त्याने डोकं गरगरायला लागलं होतं.
क्रमश: -
आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?
------------------------------------
दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.
नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला,
" पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो,
" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे).
नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.
टळटळीत उन्हात मी कामाची देखरेख करू लागलो. डोक्यावर फेल्ट हॅट, कमरेला ती काठी तलवारी सारखी खोचलेली. त्या अवतारांत माझा फोटो काढला गेला असता तर करमणूकीला एक विषय झाला असता. मी, केबीन मधे न जाता कामाची पाहाणीच करीत राहण्याचे ठरविलेले होते.
यंत्राच्या साहाय्याने जमीनीत चर खोदायचा, चराच्या तळाशी सीमेंटच्या विटांची ओळ मांडायची, त्यावर केबल ओढून घ्यायची, तिच्यावर आणखी एक विटांचा थर द्यायचा आणि बुलडोझरने वर माती (वाळूच) लोटायची. लोटलेल्या मातीवरून रोलर फिरला की झाले काम. ही सारे एका क्रमाने चालायचची. खोदकाम करणारे यंत्र पुढे चालायचे, त्या मागून केबलचा रीळ असलेली गाडी, तिच्यामागून तळाशी विटा मांडणारे मजूर, मांडलेल्या विटांवर गुरुत्वाकर्षणाने पडत जाणारी केबल, त्यावर दुसरा विटांची ओळ मांडणारे मजूर, त्यानंतर माती ढकलणारा बुलडोझर आणि सरते शेवटी माती दाबणारा रोलर. या क्रमात जराही खंड पडला तरी सारे काम ठप्प व्हायचे. कामचुकार पठाण ही सांखळी खंडित करण्याचा प्रयत्न करीत आणि सारे काम ठप्प झाले की आराम, मौज करीत.
जेवणाच्या सुटीला एक तास रहिला होता इतक्यात केबल सोडणारी/ओढणारी गाडी बंद झाली. चालवणारा इसम मोठ्या मोठ्याने ओरडा करत खाली उतरला. मातीत गडाबडा लोळू लागला. मी त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत गदारोळ झालेला. जो तो पुश्तु भाषेत आरडत होता. गडाबडा लोळणारा मजूर पोटदुखीने विव्हळत होता असे समजले. मी त्याला माझ्या केबीनमधें नेण्याचा हुकूम सोडला. इतक्यात नुरूल माझ्या कानाजवळ " जूठा तमाशा करता है हरामी" असें कांहीसे पुटपुटला. मी साईटवरच्या ट्रक ड्रावव्हरकडे माझा गाडीची चावी फेंकत त्या पोटदुख्या पठाणाला इस्पितळांत घेऊन जायला सांगितेल. आणि ’ चला कामाला लागा परत ’ अशा अर्थाने जोरात ओरडू लागलो. अचानक चेहरा पार उन्हाने करपलेला, आडदांड असा पठाण माझ्यासमोर उभा ठाकला. हातवारे करत तावा तावाने कांहीतरी सांगू लागला. मी चमकून नुरुलकडे पाहिले. नुरुल पुढे येऊन सांगू लागला, त्या पोट दुखी झालेल्या मोईनचा हा भाऊ आहे आणि त्याला इस्पितळात पाठवल्यामुळे तो संतापला आहे. इस्पितळात गेलेल्या माणसाचे नांव मोईन आहे इतके समजले, पण याला कां राग आला ते नाही समजले. पण माझ्या दृष्टीने योग्य वाटले ते मी केले यात मला तरी शंका नव्हती. मला तो वाद नकोच होता. मला काम पूर्ववत चालू कसे होईल याची काळजी होती. पण या गोंधळात जेवणाची सुटी झाली आणि सारा जथ्था ’ हैया हो ’ अशा गर्जना देत ट्रक मधे बसून जेवणासाठी लेबरकँपवर गेला. माझी त्यांनी टर उडवली हे नक्कीच. मोईनची पोटदुखी खोटी होती, काम टाळण्याचा बहाणा होता हे समजलं होतं. मी खजील झलो होतो. मुख्यालयाला हा सारा प्रकार कळवावा आणि काम पुन्हा सुरू होई पर्यंत विसावा घ्यावा म्हणून केबीनकडे वळलो आणि या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार करू लागलो.
केबिनमध्ये पोहोचतो न पोहोचतो तोंचा रेडिओ फोन घणघणला. फोन रब्बानीचाच होता. कामाची प्रगती विचारत होता. त्याचे बरोबर होते, खरा प्राधिकारी तोच होता. माझी नेमणूक तशी तात्पुरतीच होती. मी काम व्यवस्थित चालले आहे असे सांगितले. कारण त्याच्या विचारण्यात कांही खोच असावी असें वाटून गेले. त्याला लेबरकॅंपवरून कांही खबर लागली असण्याची शक्यता होती. पण त्याचे बोलणे इतर विषयाकडे वळले तसा मी सुस्कारा सोडला. त्या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार आता मागे पडला. कांहीही करून काम सुरळीत चालणे महत्वाचे होते.
तीन वाजतां कामगारांची गाडी येऊन दाखल झाली तसा मी त्यांना सामोरा गेलो. ते आपापसात बोलत उभेच होते. मी काम सुरू करण्याचा इशारा दिला त्यासरशी तो मोईनचा भाऊ माझ्या पुढ्यात येऊन गरजला,
" क्या काम करेगा ? मकिना क्या तेरा बाप चलाएगा ?"
(म्हणजे यालाही उर्दू येत होते) त्यासरशी नुरूल त्याच्यावर धांवला. बाकी पठाणांमधे हंशा पिकला होता. मी नुरूलला हातानेच शांत रहाण्याचा इशारा केला. शांतपणे त्या पठाणाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो,
" मकिना तेरा बाप चलाएगा! बर्रा (चालता हो)! जाव अपना काम शुरू करो" असें म्हणुन मी त्या यंत्राच्या दिशेने सरकलो. आता मी कुणाकडे पाहातही नव्हतो. सरळ त्या यंत्रावर चढलो, चालकाच्या जागेवर बसलो आणि यंत्र चालू केले. मगच वर पाहिले. भयचकित झालेले पठाण लगबगीने कामाला लागत होते. तो पर्यंत मी त्या यंत्राच्या आवश्यक त्या कळा दाबून ते मला नीट चालावता येते की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या सायंकाळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याने तोपर्यंत बिनबोभाट काम झालेले पाहिले.
काम संपवून लेबरकँपवर जाण्यासाठी गाडीवर चढण्यापूर्वी तो उग्र पठाण पुन्हा माझ्यासमोर ठाकला आणि म्हणाला,
"याद रक्खो, तुम पठानका बच्चाका चालीन किया. कल देखेगा. तुम क्या साबूत रहेगा और क्या काम करेगा. खुदा हाफीज़ !"
पण मी इतका थकलो होतो की तो नक्की काय म्हणाला त्याचे आकलन होण्या पलिकडे गेलो होतो.
ते मला उद्या कळणार होते. ' चालीन ' म्हणजे काय तेंही समजणार होते.
क्रमश:
--------------------------------------------
तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.
पठाणांचा जथ्था माझ्या स्वागताला उभाच होता. तो कालचा पठाण सामोरा आलाच." कैफ हालुक मुदीर ?" चेह-यावर एक प्रकारचे छ्द्मी हास्य ठेवीत त्याने विचारले." झैन ! अल हमदुल्लिलाह " मी कोणताही कडवटपणा न ठेवता म्हणालो."वल्लाह ! अस्सलाम-व-आलेकुम !" तो. त्याचा संस्कार जागा झाला असावा.
" व-आलेकुम अस्सलाम. लेकिन तुम अपना नाम नही बोला !" या माझ्या वाक्यासरशी
" हम कादर खान ! " तो उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर एक दिलखुलास हास्य पसरलेले दिसले. कालच्यापेक्षा आजचा दिवस कमी कटकटीचा असावा याची ती नांदी आहे की काय असे मला वाटून गेले. मी संभाषण पुढे चालू ठेवले.
'' कादरखान, कल हमने पाठानका बच्चाको चालीन किया ऐसा तुम बोला. वो चालीन का मतलब ?''
''चालीन का मतलब.....मतलब....'' तोही घुटमळलाच. मग मलाच सुचलं;
''चॅलेंज ??''
''वल्लाह ! दुरुस्त. एकदम दुरुस्त.'' त्याच्या या उत्तरासरशी कांही पठाण एकाएकी
फेर धरून नाचू लागले. मला एक शब्दही न कळणाऱ्या भाषेत गाऊ लागले.
एका एकी हे काय चालले आहे? मी हबकूनच गेलो.
हा काय प्रकार आहे, मी नुरूलला विचारले. तो हसत सांगू लागला, कादरखान मला धडा शिकवण्याचा चंग बांधून आला होता. सुरुवातच तो मारामारीने करणार होता. पण देव दयेने ती वेळ आली नव्हती. सुरुवात छान संवादाने झाली होती आणि कादरखान निवळला होता. राक्षसातील माणूस जागा झाला होता. मारामारी झाली तर ती कांही जणांना नको होती. ती झालेलीही नव्हती. त्यामुळे तो गट आता सुखावला होता. अशा वेळी आनंदाने गाण्याची, नाचण्याची त्यांची ती प्रथा होती.
मी अनेक प्रकारच्या माणसांत वावरलो. अनेक चित्रविचित्र अनुभव घेत गेलो. त्यांत ही आणखी एक भर. या माणसांना मी गुलामा सारखे वागवावे असा मला सल्ला देण्यात आला होता. तसेंच वागावे लागते की काय अशी परिस्थितीही समोर आली. पण कुठे तरी आंत, माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती. म्हणून मला माणसांबद्धल कणव होती. किंवा मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. एक मात्र निश्चित होते. ते म्हणजे माझ्यावर सोपविलेले काम मला व्यवस्थित झालेले पहायचे होते. मला दिलेले काम मी नीट करू शकलो नाही असे यापूर्वी कधी झालेले नव्हते आणि आताही तसें व्हायला नको होते.
साईटवर कामाची सुरुवात झाली होती. केबलच्या यंत्रावर स्वत: कादरखान बसला होता.
याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी तिथे येण्याच्या आधी फार पूर्वीपासून काम चालू होते. कादरखानच काय पण आणखीही चार सहा जणांना ती सगळीच्या सगळी यंत्रे चालवता येत असणारच.
’अथा तो ब्रह्मजिद्न्यासा’ हे काय फक्त हिन्दुस्थानीच म्हणू शकतात काय?
प्रत्येक काम मला आलेच पाहिजे हा अट्टाहास करणारा मी काय एकटाच असूं शकतो काय?
मी केबीनमधे जाऊन किती काम झाले, किती बाकी आहे याची उजळणी करून घेतली आणि सरळ कादरखान जवळ जाऊन बसलो. आजवर कोणी अधिकारी असा काम करणाऱ्याजवळ बसला नसावा. तो आधी थोडा संकोचला पण नंतर सैलावला. मग
'' यल्ला! यल्ला !! रफिक. यल्ला, जल्दी, जल्दी !'' असे इतर कामगारांवर ओरडून
कामाला चेव आणू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. मी मोईनची कांहीच खबरबात घेतलेली नव्हती. पण त्याने घेतलेली होती. सांगू लागला तो त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने काल नाटक केले होते. पण त्याला खरेंच पोटदुखीचा त्रास होता. दवाखान्यात जाण्याची परवानगी अनेकदां मागितली होती पण दिली गेलेली नव्हती. पठाण माणूस म्हणून वागवले जात नव्हते आणि म्हणून ते माणसांसारखे वागत नव्हते. हे दुष्टचक्र संपणार की नाही, हा त्याचा प्रश्न होता.
हे असे सुखेनेव चालले काम साधारण चाललेले काम पुन्हा अचानक थांबले तेंव्हा
जेवण्याच्या सुटीला जेमतेम एक तासच उरला होता. कालही काम याच वेळी बंद झाले होते. हा काय प्रकार आहे. यंत्र बंद करून मी आणि कादर खाली उतरून पहातो तो,
दूरवर, बुलडोझरपाशी पठाणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी लागलेली. एकाने दुसऱ्याची कांही खोडी काढली होती आणि मस्करीची कुस्करी झाली होती. प्रकरण नुसतेच हातघाई वर आलेले नव्हते तर दोन चार जण चांगले रक्तबंबाळ झाले होते.
मला आता मात्र वैताग आला. उद्वेगाने मी केबीनकडे कूच केले आणि हे असें याच वेळेला कां होते याच विचार करू लागलो.
कदाचित या वेळेला ऊन इतके तापते त्या मुळे माणसे प्रक्षोभक होत असावीत. कामाची वेळ थोडी बदलता येइल कां? सकाळी सहा वाजता काम सुरु केले तर कांही फायदा होईल का? मी कामाचा आंखणी-आलेख आणि झालेले काम पडताळून पाहिले. कामाच्या वेगात थोडी सुधारणा होती पण एकुणात काम मागेच होते. मी मुख्यालयाशी बोललो. पण कामाच्या वेळेत बदल करण्याची परवानगी मिळाली नाही.
दरम्यान कामगार जेवणाची सुटी संपवून परत कामावर आलेले होते. मी नुरुलखानला, त्याच्या जागी आणि कादरखानच्या जागी दुसरी माणसे लावून, आणखी दोन शहाणी माणसे घेऊन केबीनमध्ये येण्यास सांगितले. थोड्याच वेळात खरोखर चार डोकी केबीनमध्ये हजर झाली. जणू मी एक लहानशी बैठक घेत होतो.
सगळ्यात आधी मी त्यांचे काम छान चालले आहे, मला कांही तक्रार नाही असे
सांगून एकूण कामाची व्याप्ती, झालेले काम आणि राहिलेले काम याची माहिती दिली. उरलेले काम किती दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे हेही विषद केले आणि काय करता येईल या बाबत त्यांचेपाशी कांही सूचना असतील तर त्या द्याव्यात अशी विनंती केली. हा सारा प्रकार त्यांना नवीन होता. योजना प्रक्रियेत त्यांच्या सारख्या मजूरांनाही सहभागी करण्यात येत आहे याचे त्यांना नवल वाटत होते आणि कौतुकही.
कांही मिनिटे त्यांनी खालच्या आवाजात पुश्तुमधे कांही चर्चा केली ती मला समजली नाही. मात्र सरते शेवटी कादरखान म्हणाला,
"इन्शा अल्लाह, एक तरकीब हो सकती है. लेकीन हम सोचेगा. कबिलाके साथ बात करेगा. कल बताएगा. झैन ?''
मी म्हणालो
"झैन !" चालेल.
नियोजन प्रक्रियेत कामगार प्रतिनीधींना सहभागी करून घेण्याचा हा माझा मार्ग मला पुरोगामी वाटला तरी त्याचे परिणाम काय होतील याचा तो पर्यंत तरी मी नीट विचार केलेला नव्हता.
आता कादरखान उद्या काय ’तरकीब’ सुचवतो ते पहायचे होते.
ते मला उद्या कळणार होते.
------------------------------------------------------------------------
कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.
त्यानंतरच्या सकाळी मी कामावर दाखल झालो तेंव्हा ही अशी चलबिचल, काहूर मनांत घेऊनच. कादरखान मनात काहीं तरकीब घेऊन आला होता हे मला त्याच्या उजळलेल्या चर्येवरून दिसत होते. पण मात्र चर्चेसाठींसुद्धा एक मिनिटही वाया घालवण्याची माझी तयारी नव्हती. सर्वांना मी आधी कामाला लागण्याचा आदेश दिला. कादरखान तेवढ्यातही मला कांही सांगू पहात होता. पण मी त्याला ’शुई सबर’ (जरा थांब) असा इशारा दिला. सगळ्या जथ्थ्यामधे ती चर्चा झालीही असावी. कारण उत्सुकतेची अस्फुट रेषा मला जवळ जवळ प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मी पण मी कामाचाच 'यल्गार' केला आणि सारे बिनबोभाट कामाला लागलेही. आज मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळापळ करून कामावर देखरेख करणे पसंत केले. आज कुणी कालच्यासारखी गडबड करू धजावला तर त्याला वेळीच खीळ घालण्याचा माझा अंतस्थ हेतू होता. ठीक अकरा वाजतां (बरोबर जेवणाच्या एक तास आधी)मी काम बंद करण्याचा इशारा दिला. सारा जथ्था अचंभ्यात आणि मी, तोपर्यंत एकही मिनिट वाया न घालवता, जितके काम व्हायला हवे होते ते झालेले आहे या समाधानात!
कांही कामगार इकडे तिकडे पांगले. मात्र कादरखान, नुरुलखान आणि आणखी साताठ जण घोळका करून, दबक्या आवाजात चर्चा करीत उभे. त्यांना केबीनकडे येण्याचा इशारा देऊन मीही केबीन कडे वळालो. कालचे चार आणि आज अधिक दोघेजण असे सहाजण केबीनमधे आले. सर्व प्रथम मी शीत्कपाटातून एक पाण्याची बाटली काढून त्यांच्या रोखाने भिरकावली आणि दुसरी घेऊन मी खुर्चीत बसलो. माझी आणि सगळ्यांचे पाणी पिऊन झाल्यावर,
'' हां, बोलो खान '' म्हणत मी सुरुवात केली.
'' साब, धूपका बहोत तकलीफ. एक तरकीब ये के सुबह येक घंटा जल्दी छूटेगा. जो (जैसे) आज छूटा.. और शामको येक घंटा जियादा काम कुबूल.''
म्हणजे उन्हाचा त्रास होतो हा माझा अंदाज बरोबर होता.
'' लेकिन खान, ये नामुमकीन. मुदीर नही मानेगा. मकतब (मुख्यालय) नही मनेगा.''
'' तो फिर येक बाकल कम करो '' बाकल म्हणजे (ब्लॉक) सीमेंटच्या विटा.
'' मतलब? हम समझा नही !''
'' साब, जमीं कुल्लुश सखत. नीचे बाकल लाज़मी नही''
जमीन कडक असल्याने केबल खालील विटांची गरज नाही. असं त्याला म्हणायचं होतं. बरोबर आहे. ते काम कमी झालं तर वेळ वाचणार होता आणि एकूण कामाची गती वाढण्यासारखी होती. पण हा निर्णय मी कसा घेणार ? कामाची प्रमाणें (स्पेसीफिकेशन्स) बदलणे माझ्या अधिकारांत येत नव्हते. मी म्हणालो,
'' खान, येभी नामुमकीन. तुमको मालूम, ये सब गोरा (ब्रिटिश डिझायनर) मख्ररूर किया. हम के करेगा.''
'' साब ये सब पहले नही होता. रब्बानी चालु किया. ''
'' लेकिन ये सब यूं नही हो सकता. कागज़, फतुरा देखना होगा. हम दरख्हास्त करेगा. लेकिन तबतक तुम्हारा पहला तरकीब हो सकता.''
'' तो करो. हम तैयार. '' 'तो करो' म्हणण्याची त्याची लकब माजेशीर होती.
'' लेकिन मुदीरके साथ बात करना लाज़मीं है.''
'' तो करो.''
ते सगळे जेवणासाठी लेबरकॅंपकडे रवाना झाले. विटांचा तळाचा एक थर गाळणे हा उपाय मंजूर होण्या सारखा नव्हताच. कामाच्या वेळा बदलणे याचा विचार करणे शक्य होते. पण मुख्यालयाच्या गळी ही गोष्ट उतरवायची तर समक्ष जाणे गरजेचे होते. फोनवर बोलणे औधत्त्याचे मानले जाण्याची शक्यताच अधिक. मी मुख्यालयाला फोन करून अडचणीची त्रोटक कल्पना दिली आणि भेटीची वेळ मागितली. ते लगेच या म्हणाले. एव्हाना दोन वाजले होते. तीन वाजतां पठाण परत कामावर येणार आणि मी जागेवर नाही हे पाहून मौज मस्तीच करणार. कारण मी तीनच्या आंत परत येणे शक्यच नव्हते.
क्षणभर विचार केला, गाडी काढली आणि सरळ लेबरकँप गाठला. मी तिथे पोहचलो तों पठाण गाडीत (ट्रक) चढतच होते. मला पाहिल्याबरोबर जे खाली होते त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे केले. हा बाबा असा इथे कसा उपटला याचे नवल प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. कादरखान गाडीजवळ आलाच. मी मुख्यालयाशी बोलून परत येत आहे तोपर्यंत काम चालूच राहिले पाहिजे; ती जबाबदारी त्याची. असे बजाऊन मी मुख्यालयाकडे मोहरा वळवला. मुख्यालयात सर्वप्रथम मी साईट सोडून आलो त्याबद्धल खरडपट्टी झाली.
माझ्या आखातातील वास्तव्यात मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती. अधिकारी सहसा ब्रिटिश असत आणि आम्हां भारतीयांना झापायची, तासायची एकही संधी ते सोडीत नसत. मग कर्तृत्वाच्या नावाने ते स्वत: शून्य कां असेनात. हे देश एकेकाळी त्यांच्या वसाहतीत, त्यांच्या अधिपत्त्याखाली होते. पुढे इतका अवाढव्य व्याप सांभाळणे अशक्य झाले आणि भारतापाठोपाठ बहुतेक वसाहतीत स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे या देशांना स्वायत्तता द्यावीच लागली. तरी पराभवाचा तो सल प्रत्येक गोरा मनांत ठेऊन असे. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रभुत्व दाखवले होत. सिद्ध केले होते म्हणून ते जरा वचकून होते. पण एखादा कमकुवत दुवा दिसला की ते ’ब्लडी इंडियन, ब्लडी निग्गर्स’ म्हणून हेटाळणी करण्यात भूषण मानीत.
मुख्यालयातील चर्चा असफलच झाली. स्पेसीफिकेशनमधे तळाचा विटांचा थर पूर्वी नव्हता पण रब्बानीने, केबलला मातीत खाली झोळ (सॅग) अशी भलतीच भीती घालून ती सुधारणा आमलांत आणून शेखी मिरवलेली होती. हे तो स्टीव्ह मेकॅन्झी नावाचा गोरा मान्य करत होता पण मला पूर्ववत बदल करूं द्यायला तयार नव्हता. कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभाही नाकारण्यात आली.उलट काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली गेली. निराश मनाने मी साईटवर परतलो. वाटेत साईटवर तरी काय उजेड (!) पडला असेल या चिंतेत होतो.
साईटवर पोहोचतो आणि पाहातो तो काय !
क्रमशः
साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !
-------------------------------------
तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान मुद्रेने उभे.
मी आधी सगळ्यांना जरा दूर् एका जागी व्हायला सांगितले. एकजण काय़ झाले ते मला विषद करण्यासाठी जरासा पुढे सरकला. मी त्याला हाताच्या इशा़ऱ्यानेच थांबवले. सूर्य मावळतीला अजून बराच वर होता. सेनापती सैन्याच्या तुकडीला सुचना देण्यासाठी जसा संमुख होतो तसा मी त्यांच्या समोर सूचना वजा भाषण देण्यासाठी उभा राहिलो.
" दोस्तो, एक अज़ीबो-गरीब हकीकत सामने आयी है. कोई तूफान परश्त इन्सानकी ज़मीनमें गढी हुई लाश या लाशके हिस्से हम देख रहे है. ऐसे रेगिस्तानमें ऐसा हादसा कोई नयी बात नही है. जो हालात, इन्शाल्ला, सामने आये है, उसको वाज़िब अंजाम दें ये हमारा फर्ज़ ....." माझे बोलणे मध्येच तोडत एक पठाण ओरडला,
" लेकिन हम क्युं मुरदाफरोशी करे ? क्या पता कौनसी कौमका है बदनसीब. क्या अंजाम देगा इसको. और ये काम हमारा नही. तुम शुरताको (पोलीस) खबर करो. "
मी भानावर आलो. देवाशपथ, त्या पठाणानाने मला एका नव्या संकटातून वाचवले होते. मी भलअत्याच् उत्साहात त्या अवशेषांचे दफन किंवा अन्य कांही वासलात लावण्याच्या विचारात होतो. कायदेशीर बाबीचा मला विसर कसा पडला याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. तो पर्यंत सुटीची वेळही झाली होती. पठाण आपसुक त्यांना नेणा-या गाडीकडे परतले आणि मी माझ्या केबीनकडे. मात्र कादरखान आणि नुरुलखानला मी मागे ठेऊन धेतले. पोलिसांना खबर करण्यासाठी मी रेडिओ फोन सुरु करणार इतक्यात कादरखानने भिवया उंचावत पृच्छा केली,
" शुरताको फुन करेगा ?" मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
".........."
" लॅ. मकतबको (मुख्यालयाला) इतिल्ला करो "
अरे, किती खरं होतं ते. कां मी इतका भांबावलो होतो ? की अशा मूलभूत चुका होताहेत हे ध्यानातच आलं नव्हतं? किती खरं होतं कादरखानचं बोलणं. मी कोण पोलिसाना खबर देणारा ? ती जबाबदारी माझी नक्कीच नव्हती. ही साईट, ही जागा कंपनीच्या अखत्यारीतली होती. या जागेच्या आवारात अशी कांही घटना झाली तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही कंपनीची जबाबदारी होती. माझी नव्हे. किती योग्य सल्ला दिला होता त्याने. आणि आम्ही या लोकांना अडाणी समजत होतो. सारासार विचार करण्याची पात्रता आणि सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता काय केवळ पुस्तकी शिक्षणानेच येते कां! कादरखानचा सल्ला मला मनोमन पटला. मी मुख्यालयाला फोन लावला. आज जुम्मेरात (गुरुवार), उद्या शुक्रवारची साप्ताहिक सुटी, त्यातून आता संध्याकाळ म्हणजे मुख्यालयात कुणी असेल की नाही शंकाच होती. तरीही अगदी योग्य माणूस फोनवर मिळाला. तो म्हणजे कंपनीचे सर्व विधी-व्यवहार (लीगल मॅटर्स) सांभाळणारा अधिकारी, हुसैनी! हुसैनी पूर्वी पोलिसातच होता. त्याला झालेली घटना सांगितली. तो म्हणाला निश्चिंतपणे घरी जा मी उद्या पहातो काय ते. माझा जीव भांड्यात पडला. कादरखान जर तेंव्हा तिथे नसता तर मी भलतीच बिलामत अंगावर घेतली असती हे नक्की.
माझे आणि हुसैनीचे झालेले बोलणे मी कादरखानला सांगितले तेंव्हा त्याच्याही चेह-यावर समाधान दिसले. हा एक विषय मार्गी लागला तसा त्याने मुख्यालयात काय झाले याची विचारणा केलीच. मी जे झाले ते सांगताच तो म्हणाला,
" मा फिकर. कुच सोचेगा. परसो बताएगा "
" क्या करेगा खान? काम तो होना दूर यहाँ मुसीबतेंही खडी हो रही है"
" तो क्या मायूस बैठेगा? खान कुच ना कुच करेगा. चलो बेत रो (घरी चला)"
एव्हाना चांगलं अंधारून आलेलं होतं. मी दोन्ही खान माझ्या गाडीत घेऊन शहराकडे निघलो. त्यांना कामगार-तळावर (लेबर कॅंप) सोडून घरी जाणार होतो. पण त्यांना सोडल्यावर खान जाऊ देई ना. थोडा पहुणचार घ्या. निदान सरबत तरी घ्या म्हणून हटून बसला. म्हणाला,
"वै (अहो) पठानका मेहमान लाखिदमत (पाहुणचार न घेता) जा नहीं सकता. जाएगा तो बिरादरी हमपर थूकेगा "
मी थक्क झालो. आणि आम्ही यांना जंगली, राक्षस समजत होतो. त्यांनाही संस्कृती असू शकते आणि तिचा त्यांना अभिमानही असूं शकतो याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती, म्हणून मला माणसांबद्धल कणव होती की मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. ही माणसे अडाणी आहेत हे दिसत होतेच. अफगाणीस्तानातील युद्धांमुळे, तालीबानी चळवळीची सुरुवात असली तरी, त्यांनी केलेली नासधूस, जनतेची झालेली ससेहोलपट मी टीव्हीवर, डॉक्युमेंटरीतून पाहिली होती. मुळात हा समाज मूलतत्ववादी, कर्मठ असला तरी ही माणसे बदलत्या, पुढारलेल्या जगाबरोबर कां चालत नाहीत? त्यांनाच इच्छा नाही की सत्तेवरील राजवट अशा सुधारणा घडूच देत नाही? या माणसांना असे रासवट वागण्यातच मौज वाटते की काय? ही खरीच राक्षसें आहेत कां? या माझ्या चिंतनाला इथे छेद जात होता. मी सरबत घेण्याचे मान्य केले तेंव्हा त्यांना झालेला आनंद पाहिला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो.
सरबत घेऊन झाले तर खान जेवून जा म्हणून आग्रह करू लागला. त्याला मात्र मी शक्य तितक्या नम्रपणे नकार दिला. खरी भीती निराळीच होती. मी शाकाहारी माणूस. ते मांसाहारा शिवाय दुसरं काही खात नाही असं ऐकलेलं. पण खानानं माझ्या मनांतली ती भीतीही हेरली असावी.म्हणाला,
" कोई बात नहीं हुजूर. कलकी दावत कुबूल करो. साग-खबूस (भाजी-भाकरी) खिलाएगा. कल जुम्मा. शामको तुम्हारा इंतजार रहेगा."
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?
क्रमशः
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?--------------------------------------------------------
शुक्रवार उजाडला.
जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली, अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच. साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते.
पठाणांचे सेनापतित्व स्वीकरल्यापासून झालेल्या शारिरीक आणि मानसिक श्रमाने गळाठा आल्यासारखे झाले होते. पण दूरध्वनीची घंटा घणघणली तसा पांघरूण भिरकावत उठावेच लागले. कोण तडमडला आता, म्हणत फोन घेतला तर दोनच शब्द ऐकायला आलेले. " येऊ कां? " लहान पणी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकतांना त्यातले एखादे भूत असेंच विचारायचे. त्यावेळी आजी खर्जातला असा कांही आवाज काढायची की काळजाचा एक ठोका चुकलाच म्हणून समजा. हा आवाजही तसाच होता. पण टरकी बिरकी वाटण्यातला नव्हता. उलट आज तरी वैतागायला लावणारा होता. " ये " म्हणण्याखेरीज गत्यंतर नव्हते. तो आवाज वश्या डोंगर-याचा होता.
लौकिकात या आसामीला वसंत गडकरी असें नामाभिमान होते. तो एकटाच येणार नव्हता सगळी ’परदेशस्थ सडेफटिंग युनियन’ माझ्याकडे धुडगूस घालायला येणार होती. वश्या त्या युनियनचा आद्य प्रवर्तक होता. त्याचं काय झालं की मी नवीनच जेंव्हा या देशांत आलो तेंव्हा फार हुरहुरल्यासारखं (होमसिक) झालं होतं. जागा, वातावरण, माणसे सगळंच नवीन. मुलांची, पत्नीची, घराची आठवण सतत मनांत जागती असायची. कुठून ही परदेशी येण्याचे अवदसा आठवली असं वाटत रहायचं. एकतरी मराठी माणूस बोलाचालायला मिळावा असं वाटायला लागलं. मी जरा तशी चौकशी केली तर एका केरळ्याने एका नॅशनल हॉटेल नावाच्या जागेचा पत्ता दिला.
परदेशस्थ भारतीयांचे एकमेकांची भेंट घेण्याची ते एक मेलनस्थळ (त्या केरळ्याच्या शब्दांत ’रान्देवू’) होते. एका शुक्रवारी मी अधिरतेने तिथे गेलो तर, एका रस्त्याला दोन फांटे फुटून इंग्रजी वाय आकारात झालेल्या रस्त्यांच्या बेचकीत एक टपरीवजा हॉटेल आणि त्याच्या बाहेर अनेक माणसें घोलक्या घोळक्याने गप्पा छाटीत उभी असलेली. मी जत्रेत चुकलेल्या माणसासारखा उगीचच इकडून तिकडे भटकू लागलो. इतक्यात, " काय मुंबईकर कधी आल्ले कतारले ?’ असा एक घणाघाती वैदर्भीय आवाज कानावर आदळला. आवाजाचा उगम, सदरा-तुमानीत बळेंच कोंबून बसवलेली असावी अशी एक देहयष्टी होती. मी मुंबईकर आहे हे या सदगृहस्थाला कसे कळाले असावे हा प्रश्न मला पडला पण भांबावण्या पलिकडे माझी दुसरी कोणतीही अवस्था होणे शक्य नव्हते. आणि मग ’ या इकडे ’ म्हणत त्या इसमाने माझा हातच धरला आणि एका घोळक्याकडे घेऊन गेला.
जवळपास माझ्याच वयाचे सहा सात तरूण गप्पा मारीत उभे होते. आम्ही जवळ जातांच एकाने विचारले, " काय गडकरी, पाहुणे कोण ?" " जांवय शोधायले आल्ले. पोट्टीये थ्यांची लग्नाची, करतोस ?" आणि त्यापाठोपाठ एक हास्यक्ल्लोळ. (इथे मला पुलंच्या रावसाहेबांसारखं ’हांग अस्सं’ असं ओरडावसं वाटलं) आपली नाडी, गण, गोत्र, प्रवर इथे बरोबर जुळणार याची खात्री झाली. पण मग विनोदाचा तास संपला आणि रितसर ओळखीचा कार्यक्रम झाला. पुढें अनेकदा नॅशनलपाशी गांठीभेटी आणि मग माझे निवासस्थान शुक्रवारी सहसा रिकामे असतें म्हणून ’अड्डा’ इथे जमायला लागला. त्यांतही त्यांनी सामग्री आणायची आणि पाकसिद्धी मी करायची असा कबुलिनामा होता. कारण त्यातले त्यांत सुगरणीचा स्वयंपाक मीच करू शकत होतो.
त्या जमावात नागपूरचा हा वश्या-वसंत गडकरी (त्याच्या आकारमानामुळे त्याला ’डोंग-या’ ही संज्ञा लाभलेली होती) होता, सोलापूरचा किशा-किशोर करपे होता, कुडाळचा पेशवा-माधव महाबळ होता, मुंबईचा श-या-शरद गांगल आणि कोण कोण होते. आता सगळी नांवे आठवतही नाहीत. पण त्या मित्र मंडळीनी मला जें कांही दिलं त्या आधारावरच मी तो तीन वर्षांचा वनवास सुखेनेव भोगला हे मात्र नक्की. एक एक करत अड्ड्याचा कोरम पूर्ण झाला. मी किती दमलो आहे ते न सांगताही कळत होते. भटारखानाचा ताबा वश्याने घेतला. वडाभात करतो म्हणाला. किशोर कोशिंबीरीच्या पाठीमागे लागला. आणि मग सगळेजण कांही ना कांही करू लागले. शरदने तर माझे कपडेसुद्धा धुतले. या सा-या करामातींच्या पार्श्वभूमीवर माझ्या गेल्या कांही दिवसांतल्या अनुभवाचं कथाकथन. अगदी थेट पठाणांच्या दावतनाम्यापर्यंत. त्यात मधून मधून त्यांची टिप्पणी चालूच. किशा तर एकदा उसळून कडाडला, " तुलाच लेका नसती कुलंगडी गळ्यात बांधून घ्यायची हौस. ही हिरोगिरी करायची काय गरज होती ? चार पाट्या टाकायच्या आणि गप पडायचं. नाही तरी तो रब्बानी का फब्बानी, काय वेगळं करीत होता !" पेशवा म्हणाला " ते जेवायला बिवायला मुळीच जायचं नाही हां, सांगून ठेवतो."शरदने तर माझ्या त्या हाडाच्या सापळ्याला मूठ माती देण्याच्या कल्पनेची कल्पनेची यथेच्च टिंगल केली. म्हणाला. " च्यामारी, या भोटमामाला (हे माझं टोपणनांव) आपण एवढं ग्रेट मानतो पण हे येडं असा कधी कधी बावळटपणा काय करतं रे. बरं झालं त्या पठाणाने याची शेंडी उपट्लीन तें !" " पेशव्या, तू काय सांगतं बे याले जेवाले जाऊ नको म्हणून? तुला काय वाटते, हा जाणार नाही? हा भोटमामा काय सांगतो बे, थे पठाण याच्या वास्ती भाकरी गिकरी करतीन म्हणून.मी सांगतो, लिहून ठेवा बाप्पाहो, हा तिथे हड्डी गिड्डी चघळाले मिळन म्हणून चाल्लाहे, लाळ गाळीत. याचा काय भरोसा नै भौ!" इति वसंतराव गडकरी.
तेंव्हा पठाणांच्या वसतीवर जेवायला जाण्याचा माझा विचार बहुमताने धिक्कारला गेला.मी माणुसकीची, विश्वबंधुत्वाची भलामण निकराने केली. पण एकही हरीचा लाल माझ्या बाजूने उभा राहीना. संध्याकाळचे चार वाजायला आले तसें हें चित्रविचित्र पक्षी आपापल्या कोटरी परतण्यास सिद्ध झाले. मात्र मी गनीमी काव्याने पठाणास फितुर होईन या आशंकेने, मशारनिल्हे वसंत गडकरी आमचे अंगरक्षक म्हणुन नेमले गेले. त्या भोजनाला जाण्या पूर्वी मला एक काम करावयाचे होते. त्याची वाच्यता मी अद्याप केलेली नव्हती. ती केली असती तर या माझ्या मित्रमंडळींनी मला खाटेला बांधूनच ठेवले असते. ते काम म्हणजे सरकारी रुग्णालयात जाऊन आजारी मोईनखानचा समाचार घेणे. त्यालाही वसंतरावांनी कडाडून विरोध केलाच. पण अखेर तयार झाला.
कतारमधे त्यापूर्वी खाजगी वैद्यकांना वैद्यकी करण्याची मुभा होती. पण तिथे राजेशाही होती आणि राजेशाहीचा एवंगुण विशेष लहरीपणा याला अपवाद नव्हता. आले राजाजीच्या मना तेथें कुणाचे चालेना, असा खाक्या तिथेही होताच. कोणत्याही गोष्टीला मज्जाव करावयचा झाला, तर एक फतवा काढला की झाले! एके काळी भारतीयांना वाहन चालवण्य़ाचा परवाना, त्यांचा भारतीय वाहन चालवण्याचा परवाना ग्राह्य मानून लगोलग दिला जात असें. पण असाच एक फतवा निघाला आणि भारतीयांना तेथील शासकीय संस्थेतून एक महिना वाहन चालविण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य केले गेले. खाजगी वैद्यक असेंच एका फतव्यानिशी बरखास्त केले गेले. इतकेच नव्हे तर भारतीय भिषग्वर्यांना केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुद्त देऊन हद्दपार करण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयाला पर्याय नव्हता.
मोईनखान ज्या रुग्णालयात दाखल केला होता तेथील अवस्था शासकीय रुग्णालयात जशी असावी तशीच होती. ब्रिटीशांच्या प्रभावाने बाहेरील जग झकपक झाले होते. कारण ते मूळ, प्रथमश्रेणी देशवासियांच्या उपभोगासाठी होते. त्यांचे एवढेसें दुखले खुपले तर सरळ विमानांत बसून भारत गांठणे त्यांना शक्य होते. मुंबईला पंचतारांकित रुग्णालयात मोठ्या मिजाशीने उपचार घेणारे अरब आम्ही पहात होतोच. द्वितीय, तृतीय श्रेणी आणि विशेषत: अनिवासी परदेशियांसाठी अशी शासकीय रुग्णालये निर्माण केली गेली हेंच पुरेसे होते. येमेन, युगांडा, झिम्ब्वाब्वे, आर्मेनिया, अशा देशांतुन आयात केलेले सुमार अकलेचे नीम-हकीम असे वैद्य (डॉक्टर्स) आणि अत्यंत अल्प वेतनावर काम करावयास तयार झालेले केरळी, फिलिपिनी परिचारक आणि परिचारिका. तेथे बरें होऊन घरी सुखरूप गेलेल्या रुग्णांपेक्षा, एखाद्या सांसर्गिक रोगाचा शिक्का मारून हद्दपार (डी-पोर्ट) केले गेलेल्या रुग्णांचेच दाखले अधिक. काविळीचा किंवा पीतज्वराचा शिक्का बसला तर मग विचारायलाच नको. आपल्याकडे कुष्ठरोग्याच्या वाटेला येणारी निर्भत्सना कितीतरी सौम्य वाटवी अशी निर्भत्सना तशा रुग्णांच्या वाट्याला येई. पन मोईनखानला उपचार देणारा वैद्य गोव्याचा होता. डेरिक अलेमाव त्याचे नांव होते. फतव्या नंतर या गृहस्थाने नाईलाजाने सरकारी नौकरीचा पर्याय स्वीकारला होता.
मोईनखानला घरीच घेऊन जा असा त्याने आग्रह धरला.नाही तर तोही हद्दपार केला गेला असता. नाईलाजाने मी तो मान्य केला. वसंताला आधी हें सारे अजिबात आवडले नव्हते. मी अजूनही कांही तरी अगोचरपणा करतो आहे अशीच त्याची धारणा होती. पण मोइनखानची असहाय्य अवस्था पाहून तोही द्रवला. खानाला घेउन मी वसंतासह वर्तमान पठाण वसाहतीवर दाखल झालो तेंव्हा मोईनखानला माझ्यासोबत पाहून त्यांनी जो जल्लोष केला तो पाहून वसंता सर्दच झाला. त्या आसंमंतातून शिजू घातलेल्या खाद्यपदार्थाचा दरवळ येत होता. पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.क्रमश:
पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.
------------------------------------------------------------------
पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका
मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध
एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी
एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर
संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले.
" कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे, भ++ ! तुलेच फाडून खातीन ते. पैन लाव."
वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती.
" कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.
" मरहब्बा या हबीबी " म्हणत कादरखानाने पुढे होत आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी.
तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.
या कामगारांच्या निवासासाठी एक भली मोठी खोली, प्रत्येक खोलीत सहा दुमजली खाटा (बंकर बेड), म्हणजे बारा असामी एका खोलीत.खोलीला एक वातशीतक आणि वसाहतीच्या मागे सामाईक स्वच्छतालये. अशी सोय केलेली असें. त्यापैकी एका खोलीतील सामानाची थोडे हलवाहलव करून
दावतीसाठी जमीनीवर एक भली मोठी चटई अंथरलेली. सगळे कडेने बसले. कादरखान आणि नुरुलखान बाहेरून खाद्यपदार्थांची भांडी आणून मधल्या जागेत मांडू लागले. मुसलमानात साळे एकाच थाळीत जेवतात असें मी ऐकले होते आणि आपण भारतीय तर वेगळी थाळी घेऊन जेवतो. आता कसें काय होणार या विवंचनेत वश्या तर असणारच होता पण मीही तशी वेळ आली
तर कसें तोंड द्यायचे याचा विचार करू लागलो. पण जेंव्हा पदार्थांच्या हंड्या मधें मांडून झाल्यावर प्रत्येकासमोर एकेके थाळी मांडली आणि दोन दोन कटोरे आले तेंव्हा जीव भांड्यात पडला. केलेले सगळे पदार्थ एकाच वेळी पण भरपूर वाढले गेले आणि सगळे जेवायला बसले. जेवणाची सुरुवात जरा दाटसर सूप असावे अशा पदार्थाने झाली.त्याला शोरबा म्हणतात असें समजले. गांवी आई निरनिराळ्या डाळींच्या भरड्याचे (कळण्याचे) कढण करीत असें तसा तो प्रकार होता. पण फार चविष्ट
होता. दोन प्रकारच्या भाज्या, एक कोशिंबिरीसारखा प्रकार त्यात सफरचंदाचे तुकडे आणि सुक्यामेव्याचेही तुकडे होते. लुबनानी खबूस म्हणजे लांबट आकाराची मैद्याची खरपूस भाजलेली आपल्या नानसारखी जाड रोटी. ती इथे बेकरीत तयार मिळे. तिचे दोन तुकडे करून लोण्यावर (बटर) जराशी शेकलेली. आणि तुपावर परतून पाकात घोळवलेले खजुराचे काप असा एक गोड पदार्थ. असा एकूण बेत होता. भाज्या मात्र जरा तिखटच आणि तेलच तेल असलेल्या. वश्या मात्र सुरुवातीला जरा धास्तावलेला. मी खातोय की नाही हे पहातच जेवत होता. भाजीची एकेके तुकडा बोटाने दाबून पाही. जेवतांना कांही हलके फुलक्या गप्पा चाललेल्या. मात्र एक गोष्ट मला आवडलेली. गप्पा मोडक्या तोडक्या होईना उर्दूतून चाललेल्या. कांहींना बोलता येत नसले तरी दाद देत होते. त्याअर्थी त्यांना बोलणे समजत होते. तेथील चालीरीती, हुकुमतीची राजवटीचे कांही एककल्ली विनोदी मासले. अनिवासी परदेशियांना, मग तें मुस्लिमी देशंतुन आलेले असले तरी, मिळणारी दुय्य्म दर्जाची वागणूक असें कांही बाही विषय होते. इतका वेळ वश्या गप्पच होता. शेवटी कादरखान म्हणाला
" शाजी, ये मेहमानको बुत क्युं बनाके रक्खाए. इस्को बोलनेकी जुबान हय के नही. के तारीफ है तुम्हारे दोस्त की "
खरच एक चूक झालेली होती. खरं म्हणजे ज्याची त्याने स्वत:च ओळख करून द्यायची हा इथला प्रघात. वश्या आधीच भांबवलेला त्याला हे सुचणार नव्ह्तंच. आणि सुचलंच तो काय म्हणणार होता !
" ही तरकारी कायची केल्ली हो भौ. थे आलु गिलु घातले वाट्टे. लेकिन थे अदरक गिदरकचा ज़ायका काई येऊन नही राह्यला बाप्प्पा. अन थे सांभारचाही काही ठिकाना लागला नाही. काऊन हो भौ ?"
आता वश्याची ही रसवंती ऐकल्यानंतर त्या पठाणाची काय अवस्था झाली असती ते एक अल्लाच जाणे. कारण वश्याला फक्त दोनच भाषा येतात असा माझा समझ होता. एक इंग्रजी आणि ही असली मराठी. त्याचं इंग्रजीही फक्त शेक्स्पिअरलाच समजलं असतं. ’ मला माहित नाही ’
या वाक्याचं भाषांतरही तो ’ आय डझ्नॉट नो ’ असं करीत असे. मात्र त्या नंतर वश्या उर्दूतून असा कांही ’पेश’ आला की, तें अमीर खुश्रो, मीर, गालिब बिलिब नागपूरला धंतोलीत याच्या शेजारीच राहत होते आणि रोज पान खायला वश्याच्या घरी येत होते.
" बंदेको वसंत केहते है. वसंतका मतलब है बहार. आपने जो खातिरदारी पेश की वो काबिले तारीफ है. ता कयामत हम आपके शुक्रगुज़ार रहेंगे " वगैरे वगैरे.
वश्याची ही रसवंती माझ्या तर पार डोकयावरून गेली. पण पुढे आश्चर्य असें की त्या बैठकीचा वश्याने ताबाच घेतला. त्याच्या भौगोलिक सामन्यज्ञानाचे अद्भुत दर्शन आम्हा सर्वांनाच घडले. त्याला कज़गिस्तान, अफगाणिस्तान,तुर्कमेनिस्तान, इराण, इराक, या देशांबद्धल बरीच माहिती होती. हे पठाण बहुतांशी पाकिस्तानच्या सरहदी लगतच्या गांवतून आलेले होते हे त्याला माहिती होते. तुर्कमेनिस्तानामधून वहात अफगणिस्तानमधें येणा-या मर्गब, अमन्दर्या सारख्या नद्यांची त्याला माहिती होती. त्याला अबेस्तादा सरोवर, हिंदुकुश पर्वताच्या रांगा, सिन्काई हिल्स जवळील ज़बुक, मध्य अफगाणिस्तान मधील गज़नी, तिच्या उत्तरेकडील काबूल,कंदाहार सारखी शहरे, ख्वाजा मोहम्मद नांवाचे धर्मस्थळ, असं आणि यापेक्षा कितीतरी अधिक माहिती होती. बापरे. मी तर थक्कच झालो. पठाणांचे तर विचारायलाच नको. या तिनशे पौंडाच्या ऐवजाला त्यांनी डोक्यावर घेउन नाचायचेच बाकी ठेवले होते.
अखेर हात तसेंच खरकटे ठेऊन रंगलेल्या गप्पांना आवर घातला गेला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरा रस्त्याने घरी जाणे सोपे नव्हते. गस्त घालणारे पोलीस किती ’प्रेमळ’पणें वागतात याची कल्पना होती. वश्याला त्याच्या ठिकाणावर सोडून आलो ते मनोमन त्याची तारीफ करतच.
या मस्त रंगलेल्या मेजवानीची कुणकुण दुसऱ्या दिवशी मुख्यालयाला लागेल आणि तो गुन्हा समजला जाऊन मला चौकशीसाठी बोलवलं जाईल असं स्वप्नही त्या रात्री मला पडलं नाही. मस्त झोप लागली. वास्तवाला तोंड देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळ पर्यंत.
क्रमश:
वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.
-------------------------------------------------------
दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो. आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी
दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून
एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.
मुख्यालयात मार्स्टर्न साहेबांच्या कक्षापर्यंत पोहोचलो तर त्यांच्या स्वीय सहायिकेने सांगितले की साहेब मजकूर माझी वाट पहातच आहेत. तिने ज्या चर्येने सांगितले ती पाहून मी आधीच एक ग्लास पाणी पिऊन घेतले आणि साहेबांच्या कक्षात गेलो साहेबांच्या कक्षाच्या दरवाजावर टक टक केले. साहेबाने परवानगी दिल्यावर आंत गेलो आणि त्याच्यासमोर उभा राहिलो. साहेब सुमारे अर्धातास बोलला. तो बहुदा आयरिश असावा. त्याचे इंग्रजीचे उच्चार समजणे महा कठिण. त्याने
उच्चारलेल्या एका शब्दाचा उच्चार समजाऊन घेऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत हा पाठ्ठ्या चार वाक्ये पुढे गेलेला असायचा.
गोष्ट अशी होती की मी काल लेबर कॅंपवर पठाणांनी दिलेल्या मेजवानीला गेलो ही गोष्ट षट्कर्णी झालेली होती आणि ती जेंव्हा साहेबमजकूरांपर्यंत गेली तेंव्हा ते आवडलेले नव्हते. मुळातच वर्णभेदाचा अंगिकार आणि पुरस्कार करणाऱ्या या गोऱ्यांना माझें बहुजनांत मिसळणे मान्य होणारे नव्हते. समाज श्रेणींतील भेदाभेद कटाक्षाने जपणाऱ्या ही पाश्चिमात्य संस्कृतीत माणुसकीचा लवलेशही नसणे स्वाभाविक होते. हें मला ज्ञात नव्हते असें नाही. पण त्या विचारसरणीला
इतक्या क्षुल्लक पातळीवर आणून ठेवले जाईल असें मला कधी वाटले नाही. उलट हुकुमशाही प्रवृत्तीच्या या माणसांना माझे माणुसकीला धरून वागणे द्रोहाचे वाटणेच शक्य होते. त्यात साम्यवादाची भीती शोधू पाहणारी भीरुता नक्कीच होती. अगदी साध्या भाषेंत सांगायचे तर पायातली वहाण पायातच ठेवली पाहिजे या तत्वज्ञानाची भलामण त्यांच्या पथ्थ्यावर होती.
मार्स्टर्न साहेबांच्या बौद्धिकाचा सरळ अर्थ असा होता की, मी पठाणच काय पण इतर कोणाचीही वागतांना पायरी सोडून वागू नये. कामगारांना मी कामगारासारखेंच वागवले पाहिजे. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक मान आणि सवलती देउ नये. हा खटला एकतर्फी होता. त्यात मला माझी बाजू माझी बाजू मांडण्याची मुभा असण्याचा प्रश्नच नव्हता. तूर्तास तोंडी समज दिली गेली. तिचे उल्लंघन म्हणजे गंभीर परिणाम! कदाचित् निरोपाचा नारळ. मी खिन्न मनाने कार्यस्थळावर परतलो.
कार्यस्थळावर आल्यावर मात्र खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. पठाण अत्यंत जोमाने काम करीत होते. कामाचा मागील अनुशेष जवळ जवळ भरून निघाला होता. कालच्या मेजवानीचा हा परिणाम असावा वाटून गेले. ते एक कारण होतेच पण आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जिथे
तो अस्थिपंजर सांपडला होता तेथपासून पुढे जमीन भुसभुशीत लागलेली होती. पण पठाणांची तर्कमिमांसा निराळीच होती. कादरखान म्हणाला,
" अच्छा हुवा जो उस मरहूमकी साया निकाल बाहर हो गई. वो सखत
जमीन उस सायाका अंज़ाम. अब सारा काम मुकम्मल होगा. "
ही भुताखेताची भीती हास्यास्पद नक्कीच होती. पण ती तशीच राहू देणे हिताचे होते. त्या भीतीनें कां होईना. काम भराभर होत होते.
जेवणाच्या सुटीला थोडा अवधी बाकी होता. एवढ्यात कादरखान माझ्या जवळ आला. विचारू लागला,
" क्या हुवा मक्तब में ? "
मुख्यालयात झालेला प्रकार खरा खरा सांगून टाकावा असें एकदा वाटले. पण मी एक लोणकढी ठेऊन दिली.
" हमारा काम इन्शाल्ला, बाअंदाज अच्छा चल रह है खान! मुदीरको बहुत खुशी है. ये काम जल्दी जल्दी तमाम करो. आगे दूसरा काम करना है. हुकूमतका ज़दीद (मोठें) कलोनी (निवासी आवास संकुल) बनानेका काम मिला है. हमारा कारवॉं उधर जाना होगा. सुकून मिलेगा."
खान खुश झाला. उड्या मारीतच जेवायला पळाला.
गोरे कांही म्हणोत पण माझ्या पद्धतीने मी कामगारांशी जवळीक साधत होतो. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येत होते. साहेबांचा धर्म निराळा होता. त्यांचे तंत्र निराळे होते. माझ धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा श्री कृष्ण माझा आदर्श होता.
सहनाववतु सह नौ भुनक्तौ सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वीना वधितवमस्तु मा विद्विशावहै ॥
हा माझा मंत्र होता.
क्र्मशः
माझा धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा
श्री कृष्ण माझा आदर्श होता.
--------------------------------------------
त्यानंतर लागोपाठ तीन दिवस काम सुखेनेव चालले. जमीन भुसभुशीत लागली होती ही एक जमेची बाजू होती. शिवाय कांही अपवाद सोडले तर बहुतेक पठाण सरळ वागत होते. मध्येच कधी तरी दोन पठाणांमध्ये एखादी ठिणगी उडे, मग बाचा बाची ही आलीच. पण कादरखान ती समस्या परस्पर हाताळत असें. एक कादरखानच काय पण बाकी बहुतेक पठाण समजदारीने आणि सामंजस्याने वागत होते. त्यांच्यातील जे वाद कादरखानाला हाताळता येत नाहीत असें त्याला वाटले, त्यांचा निवाडा करणे माझ्यापर्यंत पोहोचले.
प्रक्षोभक झालेले कामगार माझ्याकडे आले की मी त्यांना केबीनमधें पाचारण करी. कांही बोलणे सुरूं करण्याआधी त्यांना एक पेलाभर थंड पाणी दिले की प्रक्षोभाची धार जरा बोथट होते हे माझ्या लक्षांत आले होते. मग त्यानंतर त्यांचा आवेश आपसुकच जरा मंदावलेला असायचा. त्यांच्या समस्याही तशा वैयक्तिक आणि बऱ्याचदा अगदी पोरकट असायच्या. त्यांचे त्यांच्या गावाकडची किंवा कौटुंबिक भांडणे हेही एक कारण असायचे. कारण बरीचशी मंडळी एकाच गांवातून आलेली असायची. तसेंच ते एकमेकांचे नातेवाईकही असायचे. जसें आपल्या कोकणातून एखादा चाकरीसाठीं म्हमईला गेला की तो संधी मिळतांच आणखी चारदोन गांववाल्यांना म्हमईत कुठे ना कुठे तरी चिकटवून देण्याच्या प्रयत्नांत असतोच. तसाच प्रकार या पठाणांच्या बाबतीत घडलेला दिसायचा. त्यांत एक सासरा-जांवईही होते. सासऱ्याने कबूल करूनही (मेहेर) हुंडा दिलेला नाही म्हणून इथें हें असले कष्टाचे काम करायला आलो हा जांवयाचा दावा. तर या नालायक जांवयाला देण्याचा पैसा कमवण्यासाठीं घरदार सोडून वाळवंटात आलो हे सासऱ्याचे गाऱ्हाणे. हे दोघे तर नेहेमी भांडायचे. कधी कधी तर मामला मुद्यावरून गुद्यावरही यायचा. बरं या दोघांचेही समर्थक त्याच घोळक्यात असणार आणि मग त्यांचेही शक्तिप्रदर्शन. मी आपला कधी दादा पुता करून तर कधी हद्दपारीची शिफारस करण्याचा धांक दाखऊन ती भांडणे मिटवीत असें.
माझें हें उपद्व्याप मी एकदा आमच्या सडेफटिंग युनियनच्या सदस्यांना सांगितले तर मी ’घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे तात्काळ बंद करावे’ हा ठराव सर्वानुमते पास झाला. डोंगऱ्या तर ’ आ बैल मुझे मार ’ नांवाचा चित्रपट काढणार होता आणि त्या चित्रपटाचा नायक अर्थात् मीच असणार होतो. या त्याच्या विनोदामागे एक तिरकसपणही होता हे जाणवत होते. हें असें करण्यात मी एक प्रकारें आत्मप्रौढी, शेखी मिरवत आहे असा त्याचा आरोप होता.
पण तसें कांही मी बुद्ध्याच करीत नव्हतो. कामगारांत मित्रत्वाच्या नात्याने मिळून मिसळून वागण्याची माझी जुनी संवय होती. मी लहानपणा पासूनच कांहीसा मवाळ होतो. जरा हळवा आणि भाबडाही असेन कदाचित. मात्र माणसे जोडूनच कांही साध्य करतां येतें या विचारावर माझा भरवसा होता. आमचा पेशवा मात्र म्हणाला, " जें कांही करायचे असेल तर कर पण सेन्स ऑफ प्रपोर्शन सोडू नकोस आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वत:चा ’पोपट’ होऊ देऊ नकोस". या माधव महाबळला आम्ही दिलेली पेशवा ही उपाधी तो अशी सार्थ करीत असे.
असाच एकदा पठाणांचा एक वाद मिटवीत होतो इतक्यात एक मोटार आल्याची चाहूल लागली. पठाणांना कामाकडे पिटाळून मी सामोरा झालो. एक अलिशान अमेरिकन मोटार जवळ येऊन थांबली आणि संपूर्ण अरबी वेशातली काळा चष्मा लावलेली एक असामी गाडीतून बाहेर पडली. मोटारीला स्वतंत्र चालक होता हे माझ्या ध्यानात आले. म्हणजे ती व्यक्ती कोणीतरी उच्च दर्जाची अधिकारी होती हे नक्की. कारण सहसा मोठमोठे अधिकारीही इथें आपली मोटार स्वत:च चालवीत. मी पुढें होत अभिवादन केले. माझ्याशी हस्तांदोलन करीत त्या व्यक्तीने अस्खलित आङ्ग्ल भाषेत आपला परिचय दिला. आमच्या आस्थापनेचा तो ’अल् मुदीर’ म्हणजे जनरल मॅनेजर होता. क्षणभर हा महाभाग इथें कां अवतरला असेल याचे मनांत आश्चर्य वाटले आणि थोडी भीतिही. हे साहेब कामाची पाहणी करण्यासाठीं आलेले होतेच पण मी कामगारांशी फालतू जवळीक करीत आहे अशी तक्रार त्याच्या पर्यंत पोहोचली होती. मेजवानीची खबरही त्याला मिळाली होती. आणि त्याची चौकशी करण्यासाठीं दस्तुरखुद्द जातीने आले होते. त्यांनी आधी मी तिथें येण्यापूर्वीच्या आणि माझ्या अखत्यारीत झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्या तूलनेत माझे काम समाधानकारक असल्याचे पाहून तो बराच निवळला. माझ्याबद्धल त्या गोऱ्या अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती तिच्यातील फोलपणा त्याच्या लक्षांत आला असावा. कारण त्यानंतर तो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही गेला आणि पठाणांशीही बोलला. काय बोलला हे मात्र मला समजले नाही कारण तें संभाषण अरबी भाषेंत झालें. अखेर जातांना मला शुभेच्छा देऊन गेला तेंवढे मात्र मला समजले.
तो गेल्यानंतर कादरखान माझ्याजवळ आला. त्याचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी त्याला कारण विचारले तर म्हणाला,
" मुदीर बोला, तुमारा काम बिल्कूल मुश्तमाम. खराब काम किया तुम. तुम पठानको मारा पीटा. तुमको मुदीर इंडिया वापस भेजेगा. "
असं म्हणून दोन्ही हात वर करून आकाशाकडे पहात ओरडला " रहेम या खुदा, रहेम !" आणि गडगडून हंसायला लागला.
त्याच्या पहिल्या दोन वाक्यांनी मी चक्रावलो होतो पण त्याचा पुढचा तमाशा माझ्या लक्षांत आला. त्याच्या पोटांत एक जोरदार ठोसा लगावीत मी पण ओरडलो,
" बर्रा, वै शैतान बर्रा !" (चालतो हो, राक्षसा चालता हो!)
सगळे पठाण हात उंचावीत मला कांहीतरी सांगू इच्छित होते. काय तें मला कांही समजत नव्हते. मात्र ते आनंदात असावेत असें दिसले. मीही आनंदात होतो पण थकवाही जाणवत होता. आता कामाचा वेगही वाढला होता. या वेगाने झाले तर काम, फार फार तर चार दिवसांत पूर्ण होणार होते. किती दिवस झालें मी हें काम सुरू करून? कांही समजत नव्हते.
जणू हा एक कबड्डीचा डाव चालला होता. त्यांत मी कधी हरत होतो तर कधी जिंकत होतो. मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
क्रमश:मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.
--------------------------------------
मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,
"मेहमाननवा़ज़ी हा प्रत्येक सच्च्या मुसलमानांचाच काय पण साऱ्या जगाचा आद्य धर्म आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ असला पहिजे. एक माणूस म्हणून तुमचा नवा साहेब कसा आहे तें तुमचे तुम्हीच ठरवा. तो माणूस असेल तर तुम्ही माणूस बना. नाही तर तुम्ही राक्षस तर आहातच. तुम्ही केलेले कामही उत्तम आहे. हे काम लवकर संपवा. मी तुम्हा सर्वांना खास बक्षीश देणार आहे."
हे सारे मोईनखानने सांगितले. तें ऐकून माझ्या मनांत मुदीरबद्धल आदर निर्माण झाला. आखातातील आतापर्यंतच्या मुशाफिरीत मी पाहिलेला तो पहिला सहृदय माणूस होता. शिवाय त्याला कामगारांचे मानसशास्त्र चांगलेच अवगत असावे. कामगारांना प्रोत्साहित (motivate) करण्याची त्याची हातोटी मला फार आवडली. त्याने बक्षीश देण्याचे कबूल केले त्याचे मात्र मला नवल वाटले नाही. मुदीर किंवा शेख खुश झाला तर कांही ना कांही बक्षीस नक्की देत असें. इथें तशी पद्धत होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि आजही इथे सरंजामशाही होतीच. देशाला राजा होता आणि संस्थानिकही होते. बक्षीसे देणे हे राजेशाही औदार्याचे आणि मिजाशीचे लक्षण होते. बक्षीस सहसा रोख रकमेंतच असायचे. ते सामुदायिक असेल तर सहसा त्याचा विनियोग जल्लोषी मेजवानीसाठीं केला जाई.
मोईनखान आताशा तो माझ्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न करीत असे. त्याची प्रकृती आता बरी होती. जी कांही औषधयोजना त्याला सरकारी दवाखान्यातून मिळाली होती त्यामुळे त्याला बरें वाटत होते. खरें तर यांत मी कांहीच केले नव्हते पण तो उगीचच माझे आभार मानीत असे. या पठाणांना वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असूनही ती त्यांना दिली जात नव्हती. इथें कष्ट करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस तंदुरुस्त असायलाच पाहिजे हे तत्व बरोबर होते. पण वेळ कांही सांगून येत नाही. त्याला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे असें मला वाटें. पण त्याचा काय उपयोग होता. इथें कामासाठीं येणाऱ्या सर्वच माणसांना कमीअधिक प्रमाणांत गुलामासारखेंच वागवले जात होते. सगळेंच कांही मुदीर सारखे नव्हते. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग इतरांना छळण्यासाठी वापरण्याची हौसच अधिक दिसून येते आणि या विकृतीला बळी न पडणारा विरळाच.
वीज वाहिनी जमीनीतून टाकण्याचे काम जसजसें संपत आले तसतसा कामाचा जोश वाढत गेला. कांही अडचण आली तरच मी कामाच्या ठिकाणी असावे. एरवी मी केबीनमधें निवांत वसावे, आराम करावा असा आता पठाणांचा आग्रह असें. पण माझा बहुतेक वेळ त्यांच्या वरोवरच जात असें. कारण कांही काम न करता बसून राहण्याची संवय नव्हती. तो माझा स्वभाव नव्हता. काम जसें एक दिवसावर येऊन ठेपले तसे कामगारांची गडबड वाढली आणि वातावरणच बदलले. ज्या गांवासाठी ती वीजवाहिनी टाकली जात होती तें गांवही जवळ आल्याने कांही गांवकरीही आता कुतुहलाने कामाच्या ठिकाणी घोळक्याने फिरकत. त्यांत पोरेटोरेच अधिक. आपल्याकडेंही असेंच चित्र अनेकदा दिसते. खेडेगांवात अगदी पोस्टमन जरी बटवड्यासाठी गांवात आला तर चिल्ली पिल्ली त्याच्या सायकलच्या मागे पळणारच आणि शहरांतही एखादी जरा वेगळी विदेशी असामी दिसली की भल्याभल्यांनाही आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहाण्याचा मोह आवरत नाही. माणसाच्या नाविन्याच्या या नैसर्गिक कुतुहलाचे मला नेहमीच नवल वाटत आले.
अशाच एका संध्याकाळी. कांही कामागार राहिलेले काम उरकण्याच्या मागे आणि कांही शेवटी न लागणाऱ्या साहित्याची आवरासावर करण्यात मग्न. सगळ्यांनाच कधी एकदा हे उघड्यावरचे उन्हातान्हातले काम संपवतो असें झाले होते. कारण त्यानंतरचे काम इतके जिकिरीचे असणार नव्हते. तसें कुणालाच कांही माहिती नव्हते. पण पण यापुढील वीजवाहिन्या आरोहित्राला (transformer) जोडणे, गांवात त्या आधीच विस्तारलेल्या कमी दाबाच्या वाहिन्या आरोहित्राला जोडणे अशी कांमे सुरु होणार होती. श्रम त्या मानाने कमी होणार होते. शिवाय कामांत विविधता असणार होती. कामातील विविधताही मनोरंजक असते आणि श्रमांचा ताण जाणवत नाही. सगळेच पठाण त्यासाठी लागणार होते असें नव्हते. पण कोण कुठे जाईल याची उत्सुकता होती. अशा रितीने सारे कांहींना काहीं व्यवधानात होते. एवढ्यात कामाच्या शेवटच्या टोकाशी कांही तरी अघटित घडले असावा असा कोलाहल झाला. सगळे हातातले काम टाकून तिकडे धावले. मीही कामाच्या गस्तीसाठी मिळालेली जीप तिकडे पिटाळली.
शेवटच्या टप्प्यातली धांदल, बघ्यांची झालेली गर्दी. त्यातून अति उत्साही कार्टी चरावरून इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. त्यांना हांकारताना पठाणांची दमछाक झालेली. अशातच एक कार्टं चरांत पडलं. त्याला वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या भरांत एक पठाण माती ढकलणाऱ्या यंत्राच्या चाकाखाली आला. चाक कसले ते! चाक म्हणायचे पण रणगाड्याला असतो तसा तो कांटेरी चाकावर फिरणारा पोलादी पट्टाच असतो. आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ते यंत्र तात्काळ थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यांत ते एकाबाजूने चरांत घसरले. बघे घाबरून पळाले. मात्र काम ठप्प झाले.
कांही क्षण कोलाहलात गेल्यावर कोलाहल थांबला आणि शांतता पसरली. जो तो एकमेकाकडे पहात होता, यदृच्छयेने झालेल्या अपघाताचा विचार करू लागला. माती-ढकल्या (बुलडोजर)चा एक भाग घसरून चरांत टाकलेल्या वीज वाहिनीवर पडला होता. वीज वाहिनीवर विटांची रांग होती म्हणून तिला सध्यातरी कांही इजा पोहोचलेली नव्हती. तो पुन्हा चालू करून बळाने वर काढता येणे शक्य होते पण विटा चक्काचूर होऊन वीज वाहिनीला चांगलीच इजा पोहोचणार होती. आता ते धूड उचलून सरळ करणे भाग होते. त्यासाठी क्रेन लागणार होती. क्रेन खूप दूरच्या एका दुसऱ्या साईटवर होती. तिला निरोप देऊन ती येई पर्यंत कदाचित् दीड-दोन दिवस लागणार होते. साऱ्यांचा हिरमोड झाला होता. क्रेन येईपर्यंत बाकी आवरासांवर करून घ्यावे म्हणून कामगार बेसकॅंपवर पिटाळले आणि मीही फोन करून अपघाताची खबर मुख्यालयाला द्यावी म्हणून केबीनकडें वळालो.
मी केबीनामधे जातांच आधी दोन पेले पाणी घटाघटा प्यालो आणि खुर्चीत बसलो. खरं म्हणजे मी अगदी चिडून गेलो होतो. अडचणी माझी पाठ सोडीत नव्हत्या. आता हे क्रेन मागवण्याचे प्रकरण म्हणजे वैताग होता. काय झालें, कसें झालें याचा जाब जबाब देणे, चौकशी झालीच तर तिलाही तोंड देणे. या सगळ्या तपशीलाची नोंद करणे. अहवाल तयार करणे. मला ही असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण ’ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा’ या म्हणीचा प्रत्यय येणार होता. मुख्यालयाला खबर देण्यासाठी फोन लावणार इतक्यात एक आडदांड पठाण केबीनमधे घुसला आणि अरबी भाषेंत तावाने कांही तरी सांगू लागला. मी आधीच इतका वैतागलेला, त्यात हा माझ्या वैतागात भर टाकायलाच जणू आलेला. मी त्याला हाकलून देण्याच्या विचारात असतांनाच पाठोपाठ कादरखान अवतरला आणि सांगू लागला,
" शाबजी ये महंमदखान! कुच तर्कीब ले के आया है. "
हा आता आणखी काय दगडाची तरकीब सांगणार होता कुणास ठाऊक! पण म्हटले, सांग बाबा ! त्याच्या तरकीबीने क्रेनचा द्राविडी प्राणायाम वाचणार असेल तर तो मला हवाच होता. मग त्या दोघांचा अरवी भाषेत एक लडिवाळ संवाद झाला आणि कादरखान मला ती तरकीब सांगू लागला. ती अशी होती की, केबल ओढणारे यंत्र सुटे करून घ्यायचे. साईटवरच्या भांडारात एक भली मोठी पोलादी दोरी (sling) होती ती या यंत्राच्या आणि अपघातग्रस्त यंत्राच्या मधे बांधायची आणि या यंत्राने ते यंत्र (बुलडोजर) ओढून धरायचे. ते पुरेसे वरती उचलले गेले की निर्माण होणाऱ्या सांपटीत विटांचा केबलवर संरक्षक थर टाकायचा आणि नंतर ती पोलादी दोरी काढून घ्यायची. केबलवर विटांचा संरक्षक थर दिला तर बुलडोजर चालू करून बाहेर काढून घेता येणार होता. मी जरासा विचार केला, कल्पना चांगली आहे, पण जरा धाडसाची आहे. केबल ड्रम उतरवणे आणि पुन्हा वर