वाळूचे वादळ, एक असेंही..
अरुण वडुलेकर रवि, १८/०२/२००७ - ११:०६. » कथा | अनुभव
मनोगतवर जयश्री अंबासकर यांचा ' वाळूची वादळे ' हा लेख वाचला आणि मीही असांच एकदा वाळुच्या वादळांत सांपडलो होतो त्या स्मृती जाग्या झाल्या. ती चित्तरकथा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यावेळी मी मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशांत नोकरी साठी गेलेलो होतो. आवासांमधील हवा थंड करणाऱ्या संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची वेळोवेळी देखभाल होत राहील अशी व्यवस्था लावणे ही माझी कार्यकक्षा होती.
तो १९८१ सालांतील मार्च महिना असावा. मी मुख्य शहराबाहेरील दूरच्या लहानशा गावातील एका शेखच्या निवासांतील संयंत्राची पाहाणी करून परतत होतो. त्या वास्तूल निवास म्हणायचे पण जणू कांही राजवाडाच होता तो. संयंत्रतांत कांही दोष नव्हताच पण शेख तसा चिकित्सकच होता. त्यच्या शंका कुशंकांना तोंड देता देता संध्याकाळ होत आलेली. परत निघालो तेंव्हा आकाशांत बऱ्यापैकी प्रकाश होता. मला आमच्या आस्थापनेकडून दिली गेलेली मोटार गाडी चालवत सुमारें ११० कि.मी. चा प्रवास करून माझा निवास गाठायचा होता.
परतीचा रस्ता प्रधस्त, रुंद व चांगला होता. पण एकाकी आणि निर्मनुष्य होता. संध्याकाळ असल्याने वाटेने रहदारी असण्याची शक्यता नव्हतीच. मागे किंवा पुढे एकही वाहन दिसण्याची शक्यता फार विरळ होती. पण मनांत त्याची काळजी नव्हती. कारण कधीं एकदां घरी जाऊन पडतो असें झाले होते.
अशांतच, साधारण तीसेक कि.मी. चा प्रवास झाला असेल नसेल तोंच वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. सहसा अशा वादळाची पूर्वसूचना सकाळी तेथील स्थानिक आकाशवाणीवर दिली जते. पण मी ती ऐकली नव्हती. वाळूही अशी की धड जाढी नाहीं आणि अगदी पीठही नहीं. साधारण बारीक रव्यासारख्या वाळुचे लोट समोरून येऊन पुढील कांचेवर आदळून पसार होऊ लागले. सुरुवातीचे कांही क्षण अचंभ्यात गेले. मग कांही क्षण मौजही वाटून गेली. जणू मी वळिवाची सर अंगावर घेत होतो. पण पुढच्या क्षणी सारा आसमंत त्या धुराळ्याने भरून गेला. रस्ताच काय पण आजूबाजूचे सारे दिसेनासे झाले. धुक्यांत हरवावं तसं झालं होतं. प्रतिक्षिप्त क्रीयेने गाडी बंद केली गेली. भय केवळ मनांतच नाही तर सर्वांगावर पसरू लागलं. गाडीच्या सर्वांगावर धूळ-वाळूचा थर दाट होऊ लागला होता. खिडकेची कांच खाली करून बाहेर पाहाण्याच प्रयत्न केला. तो एक मूर्खपणाच झाला. जराशी कांच खाली होतांच वाळूचा एक जोरदार फवारा आंत घुसला आणि नाकातोंडावरुन झरपटून गेला. झटकन कांच पुन्हा बंद केली. अशा वेळी वायपर्स वापरतात की नाही ? कोणस ठाऊक ! कांही सुचण्यच्या पलिकेडे मी गेलेलो. वायपर्स चालू केले तर कांचेवर वाळू पाण्याचे सारवण होऊन राडाच झाला. वादळ थांबे पर्यंत स्वस्थ बसणे क्रमप्राप्त होते.
आणि मग स्वस्थ बसण्यातली अस्वस्थता दाटूं लागली. हे वादळ कधी थांबणार ? की थांबणाराच नाही ?? नाही थांबलं तर काय होईल ? मी गाडीसकट वाळूत गाडला जाईन की काय ? गाडीचा एसी चालू असला तरी हवेचा वास बदलल्याचे जाणवत होते. प्राणवायू कमी होतोय की काय ? मी गुदमरून मरणार? मग एका एकी मायदेशातील माझी पत्नी, मुलं, घर, माझी वाट पाहात असलेली बहिण, सारं सारं आठवायला लागलं. रडू यावं, धाय मोकलून रडावं असं वाटत होतं पण रडू फुटत नव्हतं. एकदा वाटलं गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडावं.गाडीत गुदमरून मरण्यापेक्षां बाहेर मरावं. मृत्यु निदान लवकर तरी येईल.
असा शून्यमनस्क किती वेळ बसून राहिलो तें कळलंच नाही. वादळाची गाज कमी झालीशी वाटली तसा दरवाजा हंळूच उघडून बाहेर आलो. वादळ शमलं होतं. तरी वारा जोराचा झोंजावत होताच. दाट अंधारून आलेलं होतं. पुढच्या कांचेवरील वाळुचा कसाबसा साफ करून गाडी सुरूं करूं गेलो तर काय ! धक्काच बासला. गाडी सुरूं झालीच नाहीं; होणारही नव्हती. कारण मी इंजीन बंद करायला विसरलो होतो, शिवाय एसी आणि हेडलाईटस चालूच राहिले होते. बॅटरी साफ उतरली होती. काय करणार ! मोठी पंचाईत झाली होती. कुणाची मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपत्कालीन इशारा (hazzard signal) चालू करून ठेवला आणि बाहेर येऊन उभा राहिलो.
अचानक दूरवर आकाशांत एक लाल पिवळा दिवा लुकलुकूतांना दिसू लागला आणि पाहतां पाहतां तो माझ्या दिशेने सरकू लागला.तें एक खूप खालून जाणारे हेलिकॉप्टर आहे हें धान्यांत येईतो तें माझ्या डोक्यावरून घोंघावत निघूनही गेले. मी वेड्यासारखा त्याच्या मागे ओरडत हातवारे करत धांवलो. पण उपयोग झाला नाही. पुन्हा तोच अंधार, भयाण पोकळी, गलितगात्र असा मी !
त्यानंतर तासभर गेला असेल नसेल, अशांतच एक विलक्षण घटना घडली. पुन्हा दूरवर लाल निळे ठिपके चमकू लागले. यावेळी ते खूपसें खाली क्षितिजालगत होते. लांबून येणारे एखादे वाहन असावें असें वाटले. कीं तो एक भास होता ? या विचारांची तंद्री मोडली ती डोळ्यांवर आदळणाऱ्या प्रकाश झोतांनी.
तो प्रकाश अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मोटरीच्या दिव्यांचाच होता इतकेंच नव्हे तर त्या मोटारीवरही एक दिवा होता जो लाल निळ्या प्राकाशाचे झोत फिरवत होता. हर्षातिरेकाने मी एक आरोळीच ठोकली. ती गाडी पोलीसांची (अरबी भाषेत पोलीस = शुरता) होती. ती कां आली होती तें समजलं आणि तेथील शासनव्यवस्थेला मनोमन सलाम ठोकला.
मघाशीचं हेलिकॉप्टर अशा वादळानंतर आपद्ग्रस्तांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर होतं आणि त्याने दिलेलेल्या माहितीनुसार हे दोन पोलीस अधिकारी माझी सोडवणूक करण्यासांठी आलेले होते.
कसं कुणास ठाऊक आता मला रडूं फुटलं होतं.मी रडत रडत, मला येत असलेल्या मोडक्या तोडक्या अरबी भाषेंत " शुकरंद रफिक " (धन्यवाद मित्रा) असं एक सारखं म्हणत होतो. त्यांना माझी भाषा येत नव्हती आणि मला त्यांची येत नव्हती. पण तरी तेंव्हा जो संवाद झाला तो शब्दांच्या पलिकडचा होता. माझी गाडी तिथेंच सोडून दिली.(ती दुसऱ्या दिवशी कंपनीच्या तंत्रज्ञाने आणली)
मी त्यांच्यासोबतीने सुखरूप परत आलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेंच खरे.
Wednesday, April 18, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
chaan...
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
Post a Comment