Thursday, January 27, 2011

बटाटा हाईट्‌स

बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत."
खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले. काल संध्याकाळी सिड्‌नी शेल्डन या लेखकाचे ' टेल मी युअर ड्रीम्‌स ' हे पुस्तक हाताशी लागले आणि त्यात इतका गढून गेलो की रात्र किती उलटून गेली ते समजलंच नाही. पण घड्याळाच्या लावून ठेवलेल्या गजराने त्याचे काम चोख बजावले. डोळ्यावरची झोप अगदी आनावर होत होती तरी पुढच्या कामावर जाण्याच्या तयारीच्या सगळ्या क्रिया प्रतिक्षिप्तपणे झाल्याच.
या क्षणी, आत्ताही स्टेशनात गाडी थांबली कधी, गाडीतून उतरणार्‍या माणसांच्या लोंढ्याने मला स्टेशनाबाहेर फेकले कधी, मी टॅक्सीत बसलो कधी आणि मुंबई महापालिकेतील या अतिक्रमण विभागातील माझ्या टेबलाशी येऊन बसलो कधी; कांही म्हणता कांही मेळ लागत नव्हता. नाही म्हणायला, लिफ्टमधून येतांना, एस्टॅब्लिशमेन्ट मधली एक पोरगी माझ्या झोपाळलेल्या चर्येकडे सहेतुकपणे पाहात, " हंऽऽ तिकडे बघा !" असं कांही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला," एन्क्रोचमेन्टला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय .......! (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इन्स्पेकशनला". अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्कारून हसलेली आणि... " वॉ‍ऽऽव्‌ लक्की गाय्‌ !"असं म्हणाल्याचं मला चांगलंच आठवत होतं.
" साहब, हमरी फाईलका क्या हुआ?" या आवाजासरशी मी धाडकन्‌ जागा झालो.
या गर्जनेचा उगम मझ्या ‍टेबलासमोर, डोळ्यावर काळा चष्मा आणि काळ्याच पण भरभक्कम देहयष्टीच्या विरोधाभासात हस्तिदंती रंगाच्या सफारी सूटमधला नरपुंगव उभा ठाकलेला होता. बटाटा हाईट्स या नावाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा तो बांधकाम कंत्राटदार होता. इमारतीचा आणखी कांही भाग तो बांधू पाहात होता आणि ते बांधकाम अनधिकृत असणार आहे अशी हरकत घेणारी याचिका त्या इमारतीत राहाण्यार्‍या एका पावशे नांवाच्या इसमाने दाखल केली होती. कंत्राटदाराला तो दावा अमान्य होता आणि त्या प्रकरणाची शहानिशा करण्याचे काम माझ्याकडे होते. हे सगळे मला तात्काळ आठवले.
" हां, वो सब देखना पडेगा. साईट व्हिजिट करनी पडेगी. मेझरमेन्ट लेने पडेंगे. तुम्हारा बांधकाम प्लॅनके मुताबिक है के नही वो सब देखना पडेगा. " मी वेळकाढूपणाचा प्रस्ताव मांडला.
" चलिये ना साहब. हम गाडी लाया हूँ. चलके देख लेते है. बाकी सब वहीं जमा लेंगे "
शेवटच्या वाक्यावर त्याने त्याचा एक डोळा बारीक केला होता. ते मात्र मला आवडले नाही. त्याचे ते वाक्य पलिकडच्या टेबलावरील पोंक्षाच्या कानावर तर गेले नाही ना? मी चापापून पोंक्षाकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हंसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा! ' अशा अर्थाच्या खुणाही करत होता. मला कसेसेच झाले. मला हे सारे नवीन होते. मी या खात्यात नुकताच बदलून आलो होतो. उमेदीची दोन वर्षं एस्टॅब्लिशमेन्टला काढून झाल्यावर माझी बदली इथे झाली होती. माझ्या आधी हे काम पाहाणारे सद्‌गृहस्थ अशाच एका भानगडीत निलंबित झालेले होते आणि 'क्लीन शर्ट' म्हणून माझी इथे नेमणूक झाली होती.
" गाडीकी कोई ज़रूरत नही. आप चलिये. मै पहुँच जाऊँगा वहाँ. थोडी देरसे." असं म्हणून मी त्याची बोळवण केली. मात्र ती इमारत मला पाहावीच लागणार होती. शिवाय बटाटा हाईट्स या कांहीशा विचित्र नावाने मनात कुतुहल जागे झाले होते. कांही तांतडीने पाहाण्याजोगे कागद पाहून मी बटाटा हाईट्सची फाईल काढली आणि साईट व्हिजिटची परवानगी घेऊन जाण्यासाठी जीप मागवली.
जीपमधे मी रात्री वाचायला घेतलेल्या कादंबरीचा आणि बटाटा हाईट्स या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींचा विचार करीत होतो. कादंबरीचे कथानक एका मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा विचित्र विकाराने ग्रासून लागोपाठ पाच खून करणार्‍या मुलीवर बेतलेले होते. प्रत्येक खुनाच्या वेळी तिचे तात्कालिक व्यक्तिमत्व तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अगदी निराळे असायचे. जणू एक दुभंग व्यक्तिमत्व! मी विचार करीत होतो, खरंच असं असूं शकेल? एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्व घेऊन जगू शकतो? निदान, कांही काळापुरता कां होईना, असा वावरू शकतो? डोक्यातली कादंबरी मी महत्‌प्रयासाने बाजूला सारली आणि बटाटा हाईट्सचा विचार करू लागलो. मला तो बटबटीत सफारीवाला आठवला. पण मला त्याच्याशी कांही घेणे देणे नव्हते. ते तसे असायलाही नको होते. कारण कुणा पावशे नावाच्या गृहस्थाने, आमच्या भाषेत भोगवटाधारक, अनधिकृत बांधकामाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मला त्याची आणि त्याचीच भेट घ्यायला पाहिजे असे मी मनाला ठासून बजावले. एवढ्यात ती बटाटा हाईट्स आलीदेखील.
एका सहा मजली सीमेंट कॉन्क्रीटने बांधलेल्या उत्तुंग इमारतीसमोर मी उभा होतो. प्रत्येक मजल्यावर आठ बिर्‍हाडे असावीत. खालचा मजला आतल्या बाजूने वाहनतळासाठी मोकळी जागा आणि बाहेरच्या बाजूने सलग ओळीने दुकानाचे गाळे. इमारत काटकोनात बांधलेली. म्हणजे चार बिर्‍हाडांच्या काटकोनात लगतची चार बिर्‍हाडे. इमारतीची रचना एकूणच थोडी चमत्कारिक वाटणारी. इमारतीच्या खालील उरलेली जागा विरुध्द बाजूला बांधलेल्या तटबंदीवजा भिंतीने बंदिस्त केलेली. कोपर्‍यात बांधलेले एक गणपतीचे मंदीर. त्याच्यासमोर, बहुदा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासेक माणसे बसू शकतील असा चबुतरा. मी मुबईत गेली दोन वर्षे होतो. अनेक नाविन्यपूर्ण आणि नव्या काळाशी सुसंगत इमारती मी पाहिल्या होत्या. पण नाविन्याचा फारसा लवलेश नसलेली ही इमारत पाहून मी जरा अचंभ्यात पडलो. आणि शिवाय ही इमारत किंवा हा परिसर मी या आधी केंव्हातरी पाहिलेला आहे असं वाटायला लागलं. कांही निराळीच कंपनं मला जाणवायला लागली.
मला पाहाताच मघाचा तो कंत्राटदार सामोरा आला. "आव, आव, साहब" म्हणत तो मला त्याच्या कार्यालयाकडे नेऊ लागला. पण मी साफ नकार दिला आणि त्या पावशेची चौकशी केली. तो आणखी कांही बोलण्याच्या आतच त्या पटांगणात क्रिकेट खेळणार्‍या मुलांपैकी एकाला पावशे कुठे राहातात म्हणून विचारलं.
" टॉक्क्‌! कोन्ते पावशे पायजेलेत तुम्हाला? आय मिन्‌, थर्टीन नंबर की थर्टीफोर?"" पावशेऽऽऽ! म्हणजे तेऽऽऽआपलंऽऽऽ ...!" मी गडबडलो. पण कां कुणास ठाऊक, आणि" थर्टीन! तेरा, तेरा... अण्णा....अण्णा पावशे" असा, जवळ जवळ, ओरडलोच
काय झालं होतं मला? कोण अण्णा पावशे? मी तेरा नंबरच कां सांगितला? एव्हाना ती सगळी क्रिकेटची टीम जमा झाली होती आणि खूक्क्‌ करून हंसायला लागला होती.
" कूऽऽल मॅन! तुमचं कॉय कुंडली दॉखवायचं आहे कॉ ? " पहिले दोन शब्द त्या टीमला उद्देशून पण पुढील सारे मला.
" नाही. अंऽऽ..कुंडली.... तसलं कांही नाही. माझं काम ... आय मिन्‌, खरं म्हणजे पावश्यांचं काम... सॉरी, मी कॉर्पोरेशन मधून एन्‌क्रोचमेन्ट्च्या चेकींगसाठी आलो आहे. "
"ओह्‌! म्हंजे मक्याचे पॉप्स्‌.. "
मला मक्याची कणसं माहिती होती. मक्याच्या लाह्या, पॉपकॉर्न्‌स माहिती होते. पण मक्याचे पॉप्स्‌ ??
पण मला फार विचार करू न देता इतकावेळ शांतपणे बाजूला उभा असलेला एक गोरटेला मुलगा पुढे आला नि म्हणाला," चला." मी त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. मध्येच मी त्याला विचारलं," कां रे, मक्याचे पॉप्स्‌.....?" " माझे वडील! मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना? चला "
तेरा क्रमांकाच्या घराचा दरवाजा उघडला जाताच चिरंजीव मकरंद ऊर्फ मक्याने सदरा पायजमा परिधान केलेल्या एका 'फॉर्टी प्लस' पुरुष व्यक्तीला केवळ " बाबा " अशी हांक मारली आणि अंगठयाने माझ्याकडे निर्देश करीत आतल्या खोलीकडे धूम ठोकली. मी, " अण्णा...," असे म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात श्रीयुत पावशे उद्गारले.
" गेले ते. सहा वर्षं झाली त्याला. पण आपण....? आण्णांना....ओळखता..? माझे वडील ते..!"" अरेरे, वाईट झालं. सॉरी हं. मला वाटतं खूप चांगले ज्योतिषी होते ते!"
माझ्या आतून कोणी तरी बोललं. तुला माहिती होतं ते? बापरे, काय होत होतं मला? मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो. त्या हस्तिदंती रंगाचा सफारीसूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले. त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते. आणि तेरा नंबर? काय आहे हे? घशाला कोरड पडत चालली होती.
" पा..णी! जरा पाणी देता का मला..." मी कसा बसा म्हणालो." हो नक्कीच. अहो, जरा पाणी आणता कां बाहेर" हॉल आणि स्वयंपाकघर यामधील पडद्याच्या रोखाने पावशे म्हणाले. पडद्याच्या मागे एक कुतुहल उभं होतं हे मला मघाशीच जाणवलं होतं. तशी बांगड्यांची किणकिण ऐकायला आली होती.
" पण आपण आपली ओळख सांगितली नाही अजून"" मी लिखिते. कॉर्पोरेशनमधून आलोय. एन्क्रोचमेन्ट डिपार्टमेन्ट.." मी भानावार येत म्हणालो." ओह्‌! बरं झालं तुम्ही आलात. नाईस टु मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली तेंव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत कांही काळ आम्ही रिहॅब कॅंपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेऊन होतो. आता हा बिल्डर..." " रामदुलारे तिवारी..." मला हे नाव कां घ्यावसं वाटलं? माझ्या कपाळाची शीर कां ठणकते आहे. असं वाटायला लागलं.
" नाही. तो मेला कधीचाच. त्याचा खापर पणतू. कालीप्रसाद.... कालीप्रसाद तिवारी. तो तुम्हाला खाली भेटलाही असेलच."
हस्तिदंती सफारीसूट. काळा चष्मा. लाल डोळे... मी पाण्याचा सगळाच्या सगळा तांब्या घशाखाली रिकामा केला. पण सांवरण्याचा प्रयत्न केला.
" बरं मग?"" त्याने सगळा घोळ केला. एक तर, तुम्ही पाहिलेच असेल, खाली दुकानाचे गाळे काढले आहेत. ते ओरिजिनल प्लॅनधे नव्हते. पण आम्ही कोणी विशेष अशी हरकत घेतली नाही. कारण तसा कांही त्याचा आम्हाला त्रास झाला नाही. उलट आमच्या एका मेंबरला थोडा फायदा झाला. त्याच्या मुलाला तिथे मेडिकल स्टोअर्स काढता आले..... "समेळकाका?" मुकुंद गणेश समेळ... न्यू गजकर्ण औषधालय.....अरे देवा! मला कां हे माहिती होतं?" वंडरफुल्‌! यू नो इट. पण अ करेक्‍शन. समेळकाका नव्हे, त्यांचा मुलगा, जनार्दन. मुकुंद फार्मसी. तुम्ही खाली पाहिली असेलच. " मी पुढे कांही बोलणार इतक्यात शेजारून कुठूनतरी कानाचे पडदे फाटून जातील इतक्या कर्कश्श आवाजात कांही तरी संगीतमय गोंगाट कानावर आला. मी चमकून पावश्यांकडे पाहिले तर त्यांचाही चेहरा त्रासिक झालेला. "काय शिंची कटकट आहे.." म्हणत पावशे झटकन्‌ खिडकी लावायला धावले. दाराचा पडदाही हलल्यासारखा वाटला.
" कां...हो. काय झालं?" हे मी विचारायचं कांही कारण आहे कां असा विचार मनांत येण्यापूर्वीच मीबोलून बसलो.
" कांही नाही हो. हा दिन्या कय ते डीजे कि फीजे होणाराय म्हणे. त्याची कसलीशी प्रॅक्टीस घरातच करीत बसतो. सहा हजाराची म्यूझिक सिस्टीम आणून घरात बसवलीय. सूर्यापोटी शनैश्वर म्हणतात ना तसली गत आहे. सगळ्या बिल्डिंगला त्रास. ते जाऊ देत." पावशे ट्रान्स्मधे गेल्यागत बोलले." हा दिन्या कोण? आय मीन्‌ शेजारी कां?"" दिनेश हट्टंगडी..! ते जाऊ देत. आपण कामाचं बोलू."
दिनेश हट्टंगडी? म्हणजे मंगेश हट्टंगडींचा...... ते अजून तबला वाजवतात? आणि वरदाबाई.....?त्याही अजून गातात....?कपाळाचा ठणका वाढला.
"हां...तर मी म्हणत होतो की जन्याला मेडिकल स्टोअर्स साठी फायदा झाला.म्हणून आम्ही कांही ऑब्जेक्शन रेज केलं नाही पण आता कहरच झालाय. तुम्ही खाली गणपतीचं मंदीर पाहिलं असेलच. ती जागा आमच्या सोसायटीची आहे. प्लॅन आणि एफेसाय प्रमाणे तो एरिया पार्किंग आणि सोशल परपजसाठी ओपन ठेवला आहे. तसं कन्व्हेयनस्‌ डीडदेखील झालं आहे. पण या कालीप्रसादने कांहीतरी मखलाशी करून, तुमच्याच लोकांना पैसे चारून, सो सॉरी टु से, पण तसं झालंय खरं... तिथे त्याच्या मालकीचं बांधकाम करायचा घाट घातला आहे. तिथे तो दारुचा गुत्ता, आय मीन्‌, बार काढणार आहे असंही समजतंय. म्हणून मी, आय मीन्‌, आम्ही सगळ्यांनी हरकत घेतली आहे. इथे ही कामं आणि काळजी करणारा मी एकटाच आहे. सांगायला लाज वाटतेय मला, पण, आमच्यात एकी नाही हो."
" पण मग बाबा कांहीच म्हणत नाहीत?"
" कोण बाबा?"
" बर्वे! ते तर गांधीवादी विचारसरणीचे......." कपाळाची शीर! ठणका!!
" भले! तुम्हाला ते कसे माहित? अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजमधे होतो तेंव्हाच. कसला गांधीवादी! भंपक माणूस. त्यांची मुलेही जवळ राहिली नाही त्यांच्या."
हो, एक तर गेला मेक्सिकोला. कायमचाच. आणि दुसरा अलास्काला..... आई गं! पुन्हा ठणका!!
" बरं मग, आता काय करायचं?"
" ते तुम्हीच तर सांगायचं आहे. आपण असं करू, तुम्ही आलाच आहात तर, खाली गणपतीच्या कट्ट्यावर एक मीटिंग घेऊ. मी सगळ्यांना बोलावतो. तसे सगळेच घरी असतीलच असे नाहीच. आणि असूनही येतीलच अशी शाश्वतीही नाही. पण जे येतील ते येतील. निदान तुमच्या साक्षीने याला कांही तरी चालना तर मिळेल."
मला काय म्हणावे आणि काय करावे तेच समजेना. त्यांच्या 'अहो' ने कांदा पोह्याच्या बशा आणून समोरच्या टी-पॉयवर ठेवल्या. " घ्या. आलोच मी." म्हणून पावशे कपडे बदलायला आंत गेले.
मीटिंगला कोण कोण येणार होते? ग्रहगौरव श्री.अण्णा पावशे? महापंडित श्री. बाबूकाका खरे? कुशाभाऊ अक्षीकर? मंगेश हट्टंगडी? सौ. वरदाबाई हट्टंगडी? सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर? बाबलीबाय त्रिलोकेकर? प्रा. नागूतात्या आढ्ये? प्रा. कल्पलता फुलझेले? रघूनाना सोमण? आचार्य बाबा बर्वे? ? ? मी ओळखतो कां या सार्‍यांना?... आणि कां ओळखतो? ....ही नावे मला कशी माहिती झाली? ....ही सगळी मंडळी आज हयात असतील?
कसं शक्य आहे? ती तर कधीचीच गेली असतील!. मीटिंगला कदाचित्‌ आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते? त्यांची नांवे काय असतील? डोक्यावर कोणी तरी मणा मणाचे घण घालीत होते. मेंदूच्या चिंधड्या होऊन तो बाहेत पडेल की काय, असं वाटायला लागलं.
पुन्हा सिड्‌नी शेल्डन डोक्यात थैमान घालू लागला. ती पाच खून करणारी मुलगी. मनोरुग्ण होती ती. त्या मनोविकार तज्ज्ञाने तिच्या विकाराचे केलेले विश्लेषण!
'हा एक मनोविकार आहे. याला दुभंग व्यक्तिमत्वाच्या पुढची पायरी म्हणता येईल. बहुविध वक्तिमत्व दुष्प्रभाव (मल्टिपल पर्सनॅलिटी डिस्‌ऑर्डर) किंवा विलग्न प्रतिमा दुष्प्रभाव (डिसोशिएटीव्ह आयडेंटी डिस्‌ऑर्डर). या विकाराचे मूळ सर्वसाधारणपणे लहानपणी मनावर झालेल्या एखाद्या आघातात किंवा पौगंडावस्थेत झालेला असाच एखादा मानसिक आघात किंवा तारुण्यातील अत्यंत गूढ अशा स्वप्नरंजनातील संपृक्तता, यात असते. अशा अवस्थेतील माणूस किंवा असा विकार झालेला माणूस कधी कधी वास्तवाच्या अगदी विपरीत व्यक्तिमत्व धारण करून वावरतो. तर कधी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तींचा आभासी वावर त्याच्या भोवताली असतो. दीर्घकाळ चालणारी संमोहन उपचार पद्धति यावर मात करू शकते. त्वरित परिणामासाठी मात्र विजेचे झटके हाच एक पर्याय ठरू शकतो.'
मीही असाच मनोरुग्ण..?
कांदे पोह्याच्या दोन बशांमधील दोन चमचे हवेत तरंगू लागले. माझ्या दोन्ही कानशिलाला ते चिकटले आणि हजारो वोल्टस्‌ विजेचा प्रवाह माझ्या मेंदूच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडवू लागला. मी उठून उभा राहिलो आणि पळत सुटलो. जिन्याच्या किती पायर्‍या उतरलो मी? चाळीस? चारशे? चार हजार? पळता पळता कशाला तरी धडकलो. नव्हे कुणाला तरी धडकलो.
" साला लिखित्या तू ? वंडर फुल्‌! साला तू हल्ली बॅंकेमंदी ब्रॅन्चला दिसत नाय. काय बदली जाला की काय?"
सोकाजी त्रिलोकेकर...?
" नाही म..म..मी.. कॉर्पोरेशन....""करेक्ट. ते हरिराव लिखित्या, सांडगे बिल्डिंग.....यम्माय्‌ राईट्ट. ते तर कवाच ऑफ झाला. बट्‍ अ नाईस सोल हां. आय स्टिल रिमेम्बर..."
मी सोकाजीला ढकलून तसाच पुढे पळत सुटलो, ते दमछाक होऊन छातीत कळ येई पर्यंत. पाय पुढे चालेनात तेंव्हा श्वास एकवटून उभा राहिलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं.मागे बटाटा हाईटस्‌. वाचलो! तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल? मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. कांही तरी होतं तिथे.
पावशे, खरे, अक्षीकर, समेळ, हट्टंगडी, सोकाजी, नागूतात्या, कल्पलता... सगळे मीटिंगला येणार होते? कसे येणार. ते तर जिवंत नव्हते. कदाचित्‌ असतीलही. की त्यांचे........?
आता इथून धावायला पाहिजे. पण कसे धावणार. समोर एक काळा कुत्रा वाट अडवून उभा होता. लाल जीभ बाहेर काढून लहाकत, लाल लाल डोळे माझ्यावर रोखून! त्याने हस्तिदंती रंगाचा सफारीसूटही अंगावर चढवला होता. पण त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असतांना मला लांब उडीत नेहमी बक्षीसे मिळायची. लांब उडी? की उंच उडी?... मी उडी मारलीच. तोही झेपावला. त्याचा जबडा वासला, माझ्या विजारीचे टोक त्याने दातात धरले आणि खस्सकन्‌ ओढून तो आता भुंकूही लागला.
" उठा आता. बस्स्‌ झालं ते पसरणं. माणसाने मेलं झोपावं तरी किती !. दहा वाजायला आलेत. कामावर जायचंय की नाही? हज्जार वेळा सांगितलं त्या इंग्रजी कादंबर्‍या वाचत जाग्रण करत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय? बटाटाट्याची चाळ? पु.ल. देशपांडे? म्हणजे तो शेल्डन संपवून तुम्ही हे घेतलंत रात्री वाचायला?
कम्माल आहे गंऽऽ बाई तुमची!
कुत्रा बायकोच्या............ बायको कुत्र्याच्या..............अयाऽऽऽऽऽई..... ....... बायको बायकोच्याच आवाजात ओरडत होती.

कसं सांगू .....!

कसं सांगू .....!
तुला पटणारही नाही।
साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची,
तो निशिगंध....
अबोल झालाय !
तुला आठवतं.........?
त्या अनुरागी क्षणांवरती,
त्याच्याही गंधाची,
पखरण होतीच।
त्या कैफाचा स्पर्षवारा,
त्यालाही हवासा वाटला.
ताटातुटीच्या क्षणी........!
'पुन्हा येते' म्हणालीस,
आली नाहीस।
तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र,
कोमेजून गेलाय......!
माझं कांही नाही.....!
पण निदान त्याच्यासाठीं तरी,
तुला पुन्हा यायलाच हवं......!!

Monday, January 24, 2011

झुजू मुंजू

झुंजू मुंजू
"आई....! ए, आऽई!!लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. "सकाळ झाली की काय!" म्हणत नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला."काय गं? काय होतंय?""आईऽऽ, पोऽऽऽट....""दुखतंय?""हंऽ!!""बरं. थांब!"मंगलाबाईंनी उठून बसत उशालगतच्या कंदिलाची वात थोर केली आणि मनूकडे पाहिलं. तर मनूचा चेहरा कसनुसा झालेला. कंदिल हातात घेऊन त्या स्वैपाक घराकडे गेल्या आणि पाचच मिनिटात चिमुटभर ओवा आणि पाण्याचं भांडं घेऊन परतल्या."हं, हे घे. बरं वाटेल जरा वेळात."मनूने हातावर ठेवलेला ओवा तोंडात टाकला आणि पाणी पिऊन पाय पोटाशी घेऊन एका अंगावर कलंडली.
फटफटायला लागलं तशा मंगलाबाई उठल्या. तशीही झोप अशी लागलेली नव्हतीच. मनू झोपलेली होती. निदान तशी दिसत तरी होती. पण तिच्या कडे पहायला वेळ कुठे होता. आत्ता तिच्या शाळेची वेळ होईल, तिची तयारी होणं आधी महत्वाचं होतं. मंगलाबाईंनी न्हाणीत जाऊन तोंड धुतलं, स्वैपाक घरातल्या चुलीत लाकडं सारली आणि त्यांना पेटतं घालून अंघोळीच्या पाण्याचा गुंडा त्यावर चढवून त्या मनूकडे वळाल्या.
"मनू, ...मन्या बेटा... उठतेस ना? चल शाळेची वेळ आत्ता होईल बाळा, चल ऊठ."
मनू जरा वेळाने उठलीही. पण तिच्यात रोजची तरतरी नव्हती. तिच्या पोटात अजूनही तसं दुखत होतंच. पण तसं दाखवलं तर आईची किती तारांबळ होईल या विचाराने ती तसं दाखवत नव्हती. तिची अंघोळ, आवरून झालं. आईनं दिलेलं दूध बशीत ओतता ओतता तिनं ऊंचावलेलया भुवया वडिलांचा खोलीकडे वळवत डाव्या हाताचा पंजा 'त्यांचं काय?' अशा अर्थी वळवला.
"काऽय की! रात्री खूप वेळ कांही वाचन चाललं होतं बाई त्यांचं! केंव्हा झोपले कोणजाणे.कांही सभा-बिबा असेल. लगेच अंघोळ करून घे तू, आवर आणि पळ."
केस विंचरून झाले आणि मंगलाबाई वेणीचे पेड गुंफत होत्या. तोच,"आई...." मनूनं पुन्हा कण्हल्यासारख्या तशाच दबक्या सुरात साद घातली."हंऽऽ! बोल.""आज मी शाळेत नाही गेले तर...चालेल?""कां? काय झालंय?""कांही नाही! जरा कसंसच वाटतंय.""जरा पोटच तर दुखतंय ना? मी हिंगाचं चाटण करून देते. ते घे. बरं वाटेल.परीक्षा जवळ आलीय ना? शाळा बुडवून चालेल कां?""पण मी घरी आभ्यास करेन ना!""तू करशीलच गं. पण ह्यांचं काय? शाळा बुडवलेली आवडणारे का त्यांना? मलाच बोलणी बसतील.""बऽऽरं. जाते मी.""शहाणी बाई माझी ती!" आई मायेनें पाटीवर एक हलकासा धपका घालत म्हणाली.अंघोळ करून तयार झालेली मनू देवाला नमस्कार करून दप्तराला हात घालणार तोच बाहेरून तिच्या मैत्रिणीची, कर्व्यांच्या शकूची हांक आलीच. तशी, "आई निघाले गंऽऽ!" म्हणत ती घरा बाहेर पडली.
शाळेत जाणार्‍या पाठमोर्‍या मनूकडे मंगलाबाईंनी जरा काळजीनंच नजर टाकली. शाळेत जातांनाचा रोजचा उत्साह दिसत नव्हता तिच्यात. बळेच ओढत नेल्यासारखी चालली होती. सकाळच्या कामांना हात घालतांना मंगलाबाई विचार करीत होत्या. मनूने शाळेत न जाण्याबाबत पहिल्यांदाच विचारलं होतं. त्यालाही त्यांना नाही म्हणावं लागलं. नसती गेली एक दिवस शाळेत तर त्यांना कांही फरक पडत नव्हता. पण, तिच्या बाबांना, दिनकररावांना ते मुळीच चाललं नसतं. तशी ती त्यांची लाडकी होतीच. पण त्या मागचं खरं कारण मनू कमालीची हुशार होती. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नव्हता तिनं आजवर. आणि म्हणूनच तिच्या बाबतीत दिनकररावांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या होत्या. मनूनं झाशीच्या राणीसारखी एक दैदिप्यमान स्त्री म्हणून नांव करावं ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी काय लागेल ते करायला ते मागे पुढे पाहात नसत. ती तीन वर्षाची झाली तेंव्हा पासून तिला ते तिला क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगायचे. पण मनूवरच्या त्यांच्या प्रेमाला कडक शिस्तीचा आणि धाकाचा एक गडद मुलामाही होता.
दिनकरराव शहरातील एका दिवाणी वकीलाकडे कारकून म्हणून होते. पण १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि क्रांतिकारकांचा इतिहास हे त्यांचं मर्मबंध होतं. जशी संधी मिळेल तसे सार्वजनिक सभांमधून ते क्रांतिसंग्रामावर व्याख्याने देत असत. त्यांच्या अभ्यासिकेत क्रांतिकारकांच्या जीवनावरील अनेक पुस्तके होती आणि भिंतीवरही मंगल पांडे पासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत झाडून सार्‍या क्रांतिकारकांच्या तसबिरी लावलेल्या होत्या. रणरागिणी झाशीची राणी हे तर त्यांचं दैवतच होतं. तो सारा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. इतर कुणाचेही जन्मदिवस त्यांच्या फारसे खिजगणतीत नसायचे पण ११ नोव्हेंबर १८३५ हा कु.मनकर्णिका मोरोपंत तांबे या तेजशलाकेचा जन्मदिवस मात्र ते विजयादशमीच्या हिरीरीने साजरा करायचे.आणि म्हणूनच की काय आपल्या एकुलत्या एका मुलीचं नांवही त्यांनी ’मनकर्णिका’ ठेवण्याचा अट्टाहास केला होता. दिनकररावांचे वडील बेचाळिसच्या चवळवळीतले एक अग्रणी होते. तसे ते गेलेही. पण दिनकररावांच्या स्वरूपी भाबडी श्रद्धा आणि एक प्रकारचा कर्मठपणा मागे ठेऊन.
मंगलाबाईंनी केरवारे करायला हाती केरसुणी घेतली तोच "पेऽपऽऽर" अशी हांक कानावर आली म्हणून त्या पुढल्या दाराकडे वळाल्या. पेपरवाल्या पोर्‍याने टाकलेले वर्तमानपत्र घेऊन त्या दिनकरपंतांच्या खोलीकडे वळाल्या तोच "बघू‌ऽ!"म्हणत तेच दार उघडत पुढे झाले. मंगलाबाईंचे केरवारे झाले तरी मधल्या खोलीच्या दाराच्या चौकटीला ओठंगून उभे असलेले दिनकरपंत तसेच ताजे वर्तमानपत्र वाचत होते.
"अहो, तोंड धुताय ना? मी चहाचं बघते.""अहो, काय हे? यात आजही काही नाही.""कशा बद्धल म्हणताय? कांही खास आहे की काय?""खास म्हणून काय म्हणताय? अहो शंभर वर्षं झाली..... आणि यांना त्याचं कांहीच नाही! अगदीच तुरळक उल्लेख! काय म्हणायचं काय, याला? किती कृतघ्नता ही!"अगं बाई! कांही विपरीत का घडलंय का कांही?""छे, छे, तसं विपरीत नाही कांही. पण विपरीतच की!""तुम्ही काय म्हणताय ते कांही समजत नाही बाई. पण असेल तसंच काही तरी. ते जाऊ देत..तुम्ही चहाला येताय ना?""चहा? तुम्हाला चहाचं पडलंय पण इथे बघा काय चाललं आहे ते. अहो, त्या संग्रामाला या वर्षी पुरती शंभर वर्षं होताहेत आणि हे, हे, यांना त्याचं सोयरसुतकही नाही. आम्ही त्या वीरांचं नीटसं स्मरणही करू शकणार नाही आहोत कां? बसाऽऽ, बसा लेको टोप्या फिरवत आणि दोंद वाढवत!" दिनकररावांचं स्वगत चालूच होते. दिनकररावांच्या या अशा चिडखोर स्वभावाची मंगलाबाईंना नेहेमीच काळजी वाटायची.
मंगलाताईची नजर अभावितपणे भिंतीवरच्या कॅलेंडरकडे गेली. त्यातला १९५७ या आंकड्याने त्यांना ठळकपणे खुणावलं आणि छंदिष्ठ दिनकररावांच्या त्या असंबद्ध उद्गारांचा त्यांना अर्थ लागला. पण त्याकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नव्हती आणि दिनकररावांना टीका करायला आज एक आवडता विषय मिळाला त्यात कांही नवल नव्हतं म्हणून त्यांच्याकडेही फारसं लक्ष द्यायची गरज नव्हती. कारण ते नेहेमीचंच होतं.नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दिनकररावांची स्नान, देवपूजा, ध्यान ही सारी आन्हिके पार पडेतो भिंतीवरच्या घड्याळाने नवाचे टोले आणि ते त्यांच्या कचेरीकडे रवाना झाले. ते आता दीड-दोन वाजता जेवायला येतील तो पर्यंत घरातली नित्याची कामे आवरावी म्हणून मंगलाबाई पदर खोचून सरसावल्या. दिव्यांची आवस दोन दिवसावर आली होती. गौरी-गणपतीही अगदी टप्प्यावर आले होते. शाळेत जातांनाचा मनूचा चेहरा डोळ्यापुढून हलत नव्हता. तिला रवा-बेसनाचे लाडू फार आवडत. थोडे करून ठेवावेत म्हणून मनात आलं होतं. त्यासाठी थोडा रवा काढायला हवा होता. सकाळच्या मधल्या वेळेत गहू ओलावून ठेवले होते. ती पाटी घेऊन मंगलाबाई जात्यावर बसल्या.
जात्याने चार दोन गरके घेतले असतील नसतील तोच,."काकूऽऽऽ!" अशी हांक कानी आली आणि तिच्यातल्या आर्ततेने मंगलाबाईंच्या काळजात धस्स्‌ झालं.आवाज कर्व्यांच्या शकूचाच होता.."आले गऽऽ!" म्हणत मंगलाबाई ताडकन उठल्या आणि पुढच्या दाराकडे धावल्या. दार उघडून पाहातात तो, शकूच्या खांद्यावर हात टाकून मनू अवघडल्यागत उभी.
" अगं बाई! काय झालं गं? पडली बिडली की काय ही? आणि दप्तर गं तिचं....."" काकू, आधी आंत तर येऊ देत. सांगते सगळं..."
शकू आंत आली तशी, मनू मटकन्‌ खाली बसली आणि दोन्ही गुडघ्यांत चेहरा लपवून हमसाहमशी स्फुंदू लागली. मंगलाबाईंना कांही कळेना. शकूने त्यांना डोळे मोठे करत कांहीसं खुणेनेच कांहीतरी सांगितलं आणि,
"अगऽऽऽ बाई. हे असंऽऽ.....माझ्या लक्षांत यायला हवं होतं गंऽ..... सकाळी ती तशी कुरकुरत होतीच बाई..... अरे देवा.....बरं झालं बाई जवळ तू होतीस म्हणून....केवढे उपकार....."" काकू, ते उपकाराचं र्‍हाऊ द्यात. तुम्ही शांत व्हा. तिला बघा. मला शाळेत परत जायला हवं. मी निघू?"" हो! जा बाई जपून. पण एक मिनिट, याचा.....शाळेत,....... वर्गात कांहीऽऽ .....?"" नाही. तसं कुणालाच कांही कळालेलं नाही. मधल्या सुटीत आम्ही एकीला गेलो तेंव्हा हे असं झालं. मी हेडबाईंना सांगूनतिला इकडे घेऊन आले. तिचं दप्तर शाळेतच आहे. संध्याकाळी घेऊन येते."" बऽरं. जा. जपून जा होऽ."
मंगलाबाई मनूच्या शेजारी येऊन बसल्या आणि मायेने तिच्या मस्तकावरून हात फिरवू लावल्या." उगी बाळा. हे असं होतंच असतं. मोठी झालीस ना! बाईला हे सोसावंच लागतं बाळा. तू न्हाणीकडे जा. मी आलेच."
मनू न्हाणीघराकडे जायला निघाली तशी मंगलाबाईनी बाजूच्या कोठीघरातल्या फळीवरून ट्रंक खाली काढली आणि त्यातल्या एका मऊसूत लुगड्याचे मोठाले धडपे फाडले. ते घेऊन त्या न्हाणीघराकडे गेल्या. न्हाणीघराकडून सगळं आवरून पुन्हा माजघरात आली तेंव्हा मनू बरीच सांवरली होती तरी रडणं पुरतं थांबलेलं नव्हतं. हुंदके चालूच होते. काय झालं आहे याची पुसटशी कल्पना एव्हाना तिला आली होती. पण मनाची अवस्था भोवंडल्यागत झाली होती.
'लाल काळ्या पंखांचा एक भला मोठा कावळा कुठूनसा झेपावतो आहे, तो त्याच्या भल्या मोठ्या पंखात गुरफटवून अलगद उचलून आपल्याला घेऊन जातो आहे आणि भुताच्या टेकडीमागील अंधार्‍या दरीत ढकलून देणार, तिथून रांगत रांगत आपण पुन्हा घरी येणार,...कधी?.....किती दिवस?.....एक?...दोन?.....कदाचित चारही !...’
मनातल्या वावटळीसारख्या घोंघाव्यानं घशात आवंढा अडकला होता; स्वत:वरच चिडली होती. माजघराच्या बाजूच्या सोप्यालगतच्या चिंचोळ्या खोलीकडे ती आपसुक गेली आणि अवघडून बसून राहिली. एरवी फारशी वापरात नसलेली ती खोली कधी वापरली जायची हे तिला ठाऊक होतं. मंगलाबाई पुन्हा तिच्या समोर आल्या आणि कोठीघरातून आणलेली घोंगडी आणि एक धुवट परकर-पोलके मनूकडे भिरकावले, तेंव्हा त्यांचेही डोळे झरत होतेच. ते पाहून तर मनूला पुन्हा उमाळा आला. एक मोठी किंकाळी पोटातून बाहेर येते आहे की काय असं वाटायला लागलं. पुन्हा तोच आवंढा घशात अडकून राहिला.
" पुरे. तू जरा पड आता. दमली असशील. स्वैपाकाचं बघायला हवं मला. हे जेवायला येतीलच तासाभरात. त्याआधी व्हायला हवं सारं. नाही तर पुन्हा शंखनाद होईलच..... तो कांही चुकणार नाही..." आईचे तुटक तुटक शब्द तिला ऐकू आलेही आणि नाहीही.
मंगलाबाई पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाच्या ओट्याकडे वळाल्या तशी मनूने फारसा आवाज होणार नाही अशा बेताने तिची खेळाची ट्रंक पुढे ओढली आणि उघडून बसली. काय नव्हतं त्यात! कचकड्याचे वाघ सिंह, जपून ठेवलेले गेल्या पोळ्याचे मातीचे बैल, पसा भर कवड्या, ओंजळभर सागरगोटे, जवळपास तितक्याच कांचेच्या बिल्लोरी गोट्या, एक काचेचं भिंग, एक तुटकी हस्तिदंदी फणी, भातुकलीची भांडी, भावलीच्या लग्नाचा पसारा, त्यातले इवलाले कपडे, दागीने, सजावटीच्या झिरमोळ्या, कलाबतू, मोरावर बसलेली पण आता रंग उडालेली मातीची शारदा, आणि बरंच बरंच कांही. या सार्‍यावरून पुन्हा पुन्हा हात फिरवतांना मनू जराशी गुंगली. अचानक कांहीतरी आठवल्य़ागत मनू एकदम दचकली. भितीवरल्या फळीकडे नजर गेली. 'ती' तिथेच होती. ताडकन्‌ उठत मनूने कोपर्‍यातली घडवंची पुढे ओढली, तिच्यावर उभे राहात तिने फळी वर ठेवलेली दीड-दोन वितीची एक लाकडी ठकी खाली काढली. तिच्यावरली धूळ परकराच्याच शेवाने झटकली आणि तिला उराशी कवटाळत तिथेच घडवंचीवर बसून राहिली. शांत, चुपचाप डोळ्यातले पाणी न खळवता. जणू ती भावली आता दूर गांवी जणार होती, कदाचित पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. तशी मनू ठकीला बिलगली होती.
" काय करतेयेस गं ताईऽ? जेऊन घेतेस बाळा..?" मंगलाबाईंचा स्वयंपाक होत आला होता.आईचा आवाज मनूला आज नेहेमीपेक्षा अधिकच मधाळ वाटला." कांही नाहीऽऽऽऽ! अशीच बसलेऽऽय" मनूचा स्वर अजून कातरच." जेऊन घेतेस? भूक लागली असेल ना गं?"" नाही. नको. बाबा येतीलच ना एवढ्यात. त्यांच्या बरोबरच......."
मनूचा स्वर चढा आणि कडवट झालेला आणि क्षणभर एक भयावह स्तब्धता त्या घराच्या पोकळीत भरून राहिली. मनू एकटक हातातल्या ठकीकडे पाहात होती पण तिच्या डोळ्यात नेहेमी असायची तशी ममता, मार्दव नव्हतं. उलट एक प्रकारची कृद्धता, चीड त्यातून बाहेर पडू पाहात होती.
मंगलाबाईंनी मनूचं सगळ्या जेवणाचं ताट वाढलं. एका हातात ताट, दुसर्‍या हातात पाण्याचं लोटी-भांडं घेतलं आणि त्या मनूच्या खोलीच्या दारापाशी आल्या.
"चल. ऊन ऊन जेऊन घे.""नकोय मला." मनूच्या आवाजात हा असा उद्धटपणा पूर्वी कधी दिसला नव्हता."अगं असं काय करतेस. भूक लागली नाही? हेही येतीलच एवढ्यात. त्यांचा आणि काय तमाशा होतोय देवजाणे हे पाहून. तू जेऊन घे आणि ताट-वाटी मागल्या दारी घेऊन जा. मी पाणी घालते......." मंगलाबाईंचं वाक्य अजून पुरं झालंही नाही तोच,
"नक्कोय म्हणून सांगतेय नाऽऽऽऽ! नक्कोय मला ते जेवण बिवण" म्हणत मनूनं पुढे होत त्यांच्या हातातले ताट हाताच्या फटकार्‍याने उधळून लावले.
"काऽऽर्टेऽऽऽ!" असं किंचाळत मंगलाबाई मनूच्या अंगावर धावल्या आणि उगारलेला हात तिच्यावर टाकण्यापूर्वी शिळा झाल्यागत थबकल्या, एक हंबरडा फोडत मटकन्‌ खाली बसल्या. दोघींच्याही मनावरच्या ताणाचा कडेलोट झालेला होता.
"अरे, काय चाललं आहे हे? काय प्रकार आहे हा?"
मधल्या दारातून आत येणार्‍या दिनकररावांच्या, दिवाळीतला सुतळी फटाका फुटावा अशा गर्जनेने दोघींचाही श्वास आतल्या आतच अडकला. भयचकित झालेल्या हरिणी-पाडसागत दोघींचे डोळे दिनकरावावर खिळून राहिले.
पलिकडल्या भिंतीपाशी ते रिकामे ताट पालथे पडलेले, त्यात कांहीवेळापूर्वी वाढलेले अन्न जमिनीवर इतस्तत: विखुरलेले, घरंगळत गेलेल्या लोटीतील पाण्याचा थारोळा मधल्या खांबापर्यंत गेलेला, मनू उभी असलेली ती खोली, रडून रडून लाल झालेले डोळे पलथ्या मनगटाने पुसू पहात असलेली मनू, खोलीच्या दारात अजूनही मटका मारून बसलेल्या आणि गुडघ्यात मान घालून स्फुंदणार्‍या मंगलाबाई या सार्‍या चित्राचा अर्थ उमगायला दिनकरावांना पांच एक मिनिटे लागली. आणि जसा मनात तो उलगडा झाला तसे तरा तरा मनूजवळ गेले. छातीशी गट्ट कवटाळत तिला घेऊन ते बाहेर आले आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"तुमचा हा बावळटपणा पुरे झाला आता. घ्या ते आवरून घ्या आणि जेवणाची पाने घ्या. हे असे डोळे फाडून माझ्याकडे बघत राहू नका. मी पाने म्हणालो. पान नाही. आमची दोघांचीही पाने घ्या. तुम्ही नंतर बसा हवं तर. आणि होऽऽ जिकडे तिकडे डंका वाजवत फिरू नका याचा. निव्वळ निसर्ग आहे हा. जेवणं झाल्यानंतर दुपारी तुम्ही त्या प्रीतिपाखर मध्ये घेऊन जा मनूला आणि येता येता त्या पारापसल्या कापडाच्या दुकानात जा. ओळखतो तुम्हाला तो. मनूसाठी चार दोन चांगल्या वॉयलच्या साड्या आणि काय पोलक्याची छिटं बिटं घेऊन या."
"अहो,....पण......त प्रीतिपाखर......म्हणजे......."
"म्हाईताय मला. तुम्ही ज्याला मिशनरी मडमांची शाळा म्हणता तीच. तिथे डागदर कावस नावाच्या बाई आहेत. त्या तिथे प्राथमिक सेवा केंद्र चालवतात. मनूला घेऊन जा. त्या तिला नीट समजाऊन सांगतील काय सांगायचे ते. गोरे असले तरी चांगली माणसे आहेत ती. आमचा लढा होता तो राज्यकर्त्यांशी. जे चांगलं आहे ते आहेच. मनूलाही मी अशीच डागदर करणार आहे. होशील ना गं मनू!!......आणि हो. ते शिवाशिव, बाजूला बसणं ते तसलं कांही करू नका. मला आजिबात चालणार नाही ते. निसर्गनियम असतो. फार कांही जगबुडी होणार नाही ती तसली भाकडं पाळली नाहीत तर."
अजूनही बाबांच्या मिठीच्या दुपट्यात उबावलेल्या मनूच्या अंगावरून मोरपिसं फिरत होती.ती मोरपिसं, सकाळी शाळेत पहिल्या तासाला बाई शिकवीत असलेल्या कवितेतल्या झुंजु-मुंजू या शब्दाचा आणखी एक अर्थ समजाऊन सांगत होती.