Thursday, May 14, 2009

मौन

अगदी ‘कृतान्‍तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेन्‍ट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादि इत्यादि. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला. योगासन वर्गाला मी तिसर्‍याच दिवशी रामराम ठोकला. ती कपालभाती केली की मिसळी बरोबर चार चार पाव हाणावे लागायचे. तरीही प्रभात फेरी, ज्याला जनरली मॉर्निंग वॉक असे म्हणतात, त्याला मात्र मी इमाने इतबारे जाऊ लागलो. याला कारणे दोन. एक तर तिथेही चार मित्र मिळवून एका कट्ट्यावर बसून वयाला साजेशा किंवा न साजेशा टवाळक्या करायाला मिळतात आणि दुसरे म्हणजे मग शेवटी घरी परतण्या आधी टपरीवरचा गरमागरम चहा. (चहाला गरमागरम भजी, वडा किंवा तत्सम कांही पदार्थाचे अनुपान दिले नाही तर मला चहा बाधतो).

परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्‍तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला,
कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.

" टूथ ट्रबल? ओह्‌ जीझस्‌ क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं ‘अरे देवा’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ!" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?

"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक) यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."
मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या.

" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्‍टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "

तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते. अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.

मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत, मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले.

" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच रम्या अमेरिकेत राहून बदलला होता.

"या!" या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली.

माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग्‌ वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो.

ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती.

पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.

मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले.

रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्‍या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो.

सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार
आणि त्यातून काय काय प्रसंग उद्‌भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.

" तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता.
" ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि....
" आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी,
" हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता.

मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती.

तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्‍याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्‍हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्‍याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्‌" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि..

इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्‍याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी ‘पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा’ म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्‍हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्‌कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मूक (सायलेन्ट) केला.

आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. ‘मौनं सर्वार्थ साधनम्‌’ असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो ‘कुणीसा’ जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता ‘सर्वार्थ’ साधणार होतो. एरवी मी ‘वट्टार वट्टार’ करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित्‌ गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती

अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी ‘ काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?’ असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं.

" बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला.निर्देश माझाकडेच होता. याचं मला आश्चर्य वाटालं.
" काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी.
" फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल.
" अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?"
इति सुभाष कीर्तिकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्‍याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि,
" अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्‌. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्‍या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले.

मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती.
त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता.

पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला,

" हां बोल. " दाभाडे
" बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो.
" मी काय केलं? तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो.
" ए! साला तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला.
" मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता.
" पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा!
" मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला.

सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले.

" पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं, पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?"
" च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." कीर्तिकर
" अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे.
" पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ
"कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं?" पुन्हा दाभाडे.
" पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढं भोसडायचं?" रवी सराफ
" ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ
" काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे
" मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ
" हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे
" आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया कोणाची?" रवी सराफ
" हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी
" घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला
" काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे
" ए, कुठाय्‌ रे हे वडुलं?" गजा कर्वे
" कुठं कां असेना. तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे
" च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा
" काय बरंय?"
"म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सराफ
" तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे
" ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" कीर्तिकर डोळे मिचकावीत.

ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन
तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं,

" ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!"

माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींनी याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच.
आणि मोठ्ठ्याने ओरडलो,

" बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?"

दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्‍यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?"

"मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला.

1 comment:

Nandan said...

Surekh lekh aahe, kaka. Atishay aavaDala.